रिक्षाचालक व रिक्षा प्रवासी यांच्यामध्ये नेहमीच भाडे नाकारणे, जादा भाडे घेणे, मीटरप्रमाणे भाडे न घेणे आदी कारणांवरून शब्दिक चकमकी होतात. रिक्षाचालकांच्या या अरेरावीची तक्रार नोंदवता यावी म्हणून आरटीओने सुरू केलेली हेल्पलाइन गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे आडमुठय़ा रिक्षाचालकांची तक्रार कुठे करायची, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. लवकरच नवीन हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे.
रिक्षाचालकांविरोधातील तक्रारी नोंदवण्यासाठी आरटीओचे ९९६९८५४५५५, १८००२२५३३५ हे क्रमांक आहेत. पण त्यावर कॉल केला असता क्रमांक संपर्क कक्षेच्या बाहेर असल्याचा संदेश दिला जातो. काही वेळा फोन लागला तरी तो उचलला जात नाही. त्यामुळे प्रवासी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावरच संपर्क साधतात.
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात असणारे टोल फ्री क्रमांक बदलण्यात येणार असून नवीन क्रमांक लवकरच सुरू करण्यात येणार आहे. नवीन क्रमांकासाठी एमटीएनएलची सेवा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
– संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी