नवी मुंबई : नवी मुंबईत रिक्षाचालकांच्या मनमानीचा फटका प्रवाशांना वारंवार बसत असतो. कधी भाडे नाकारणे तर कधी मीटर न टाकता सरसकट भाडे आकारणे अशी प्रकरणे नेहमीच घडत असतात. नवी मुंबई उप प्रादेशिक कार्यालयाकडून एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ पर्यंत एकूण १८८१ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे, घणसोली, वाशी, नेरुळ, इत्यादी ठिकाणी रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा सुरू असतो. रिक्षा चालकांच्या मनमानी आणि आडमुठे पणामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रेल्वे स्थानकावर असलेल्या किंवा रिक्षा शिवाय इतर पर्याय उपलब्ध नसलेल्या विभागात रिक्षा चालक हे प्रवाशांचा फायदा घेऊन मनमानीपणे भाडे आकारतात तर कधी भाडे नाकारले जाते. तर काही भागात मीटर डाऊन न करता मनमानी भाडे आकारणी केली जाते.

अशा मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली असून जादा भाडे आकारणी करणाऱ्या ७७ तर जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या ३६, जलद मीटर चालवणाऱ्या ३३, भाडे नाकारणाऱ्या ४४ तसेच उद्धट वर्तन करणाऱ्या ३४ आणि इतर १७५ रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उघडला आहे. एकूण ४३५८ वाहने तापसली असून १८८१ रिक्षा दोषी आढळल्या आहेत.

या कारवाईत ३४ लाख ४७हजार ५०० रुपये दंडवसुली केली आहे अशी माहिती उपप्रादेशिक परिवहनअधिकारी गजानन गावंडे यांनी दिली.

Story img Loader