नवी मुंबई : ऑनलाईन आर्थिक फसवणूक गुन्ह्याची उकल फार क्वचित होते. मात्र नवी मुंबई सायबर शाखेने एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे.  या प्रकरणी मुख्य आरोपी, त्याला सिम कार्ड परवाना, तसेच पैसे हस्तांतरण करणारा अशा सर्वांना अटक करण्यात अली आहे.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रशांत चमोली, परवेज मोहम्मद शरीफ, रणजीत ब्यास तिवारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील प्रशांत हा मुख्य आरोपी असून परवेज सिम कार्ड परवाना तर रणजित हा पैसे हस्तांतरण (मनी  ट्रान्स्फर) करणारा आहे. कामोठे येथे राहणाऱ्या फिर्यादी यांना इन्शुरन्स बोनसचे आमिष दाखवून त्यांच्याकडून तब्बल २ कोटी २४ लाख ९३१ रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. त्यांनी प्रशांत याने सांगितलेल्या विविध खात्यांत रक्कम टाकली होती. त्यातील एक खाते प्रशांत याचे स्वतःचे होते. त्यात १ कोटी ८० लाख रुपये टाकण्यात आले होते. हा पूर्ण व्यवहार ११ ऑगस्ट २०२० ते २० जुलै २०२३ दरम्यान झाला होता. या प्रकरणी सायबर शाखेने तपास सुरू केल्यावर प्रशांत यांच्या खात्यावरून त्याचा पत्ता शोधला तो राहणारा गुरुग्राम येथील असल्याने पोलीस पथकाने या ठिकाणी जाऊन स्थानिक पोलिसांची मदत घेत त्याला अटक केले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडे आढळून आलेले ०५ मोबाईल व ०५ सिमकार्ड, ०१ व्हिजा कार्ड, ०१ पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. तसेच सिम कार्ड पुरवणारा परवेज आणि पैसे हस्तांतरण करणारा व्यास यांनाही अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांच्या मार्गदर्शखाली सुरु आहे. 

हेही वाचा – नवी मुंबई : उष्म्याने पालेभाज्या होतायेत खराब

या गुन्ह्याचा क्लिष्ट तपास गुन्ह्याची विशेष तांत्रिक तपासाची कामगिरी ही नवी मुंबई पोलीस आयुक्तलयातील पहिली सायबर गुन्हे विश्लेषण करणारी महिला पोलीस पुनम गडगे यांनी केली आहे.

फिर्यादी याची विमा पॉलिसी केवळ सात लाख रुपयांची होती. ती करोना काळात पैसे न भरल्याने बंद पडली. याबाबत फिर्यादी यांनी कुठेतरी ऑनलाईन माहिती घेत एका साईटवर स्वतःची वैयक्तिक माहिती भरली. त्यांनी शोधलेल्या साईटवरून आरोपींनी त्याचा क्रमांक मिळवला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना फोन करणे सुरू केले. अडीच लाख भरा १२ लाख मिळतील असे आमिष दाखवत हे पैसे वाढवत गेले व फिर्यादी भरत गेले. यासाठी फिर्यादी यांनी गावाकडील जमीन विकली, स्वतःची बचत संपवली, मुलीचे दागिने विकले तरीही पैसे न मिळाल्याने शेवटी पोलीस ठाणे गाठले मात्र तोपर्यंत त्यांची तब्बल २ कोटी २४ लाख ९३१ रुपयांची फसवणूक झाली होती. 

हेही वाचा – गोव्याहून मुंबईत नेण्यात येणारा मद्य साठा जप्त

हे पैसे वसूल कसे करावे असा प्रश्न पोलिसांच्या समोर आले. आरोपी हे मद्यपी असून पैसे उडवणे, ऑनलाईन जुगार खेळणे असे अनेक व्यसन त्यांना आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील पैसे संपले असून इतर कुठलीही मालमत्ताही त्यांच्या नावे नसल्याने पैसे वसूल कसे करावे, असा प्रश्न पोलिसांसमोर पडला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online fraud of 2 crore 24 lakh for an insurance policy of 7 lakh ssb