उरण: सुरक्षेची जबाबदारी ही सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची असल्याचे मत नवी मुंबई परिमंडळ – २ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी व्यक्त केले. सोमवारी उरणच्या भोईर गार्डन हॉटेलच्या सभागृहात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा व सुरक्षा कायम रहावी याकरिता विविध विभाग व उरण मधील नागरिकांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उरण, उलवे आदी विभागातील सामाजिक, राजकीय व सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते आणि उरण नगरपरिषद, महावितरण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नागरिकांनी प्रामुख्याने रस्त्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि विजेचा लपंडाव या समस्या मांडल्या आणि त्या गणेशोत्सव काळात सोडविण्याची मागणी केली. तर उपयुक्तांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी एकेरी मार्ग,वाहनतळ तसेच कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले. त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी सीसीटीव्ही बसविण्याची सूचना केली. तर ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी त्याच्या मानवी परिणामाची जाणीव करून देत सामाजिक भान ठेवण्याचे आवाहन केले.

हेही वाचा… उरण: डिजिटलच्या काळातही कापडी मखरांची मागणी कायम; टिकाऊ आकर्षक व नैसर्गिक मखर

तसेच मुस्लिम समाजाने गणेशोत्सवासाठी ईद संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी बंदर विभाग सह पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर, उरण नगरपरिषद मुख्याधिकारी राहुल इंगळे, नायब तहसीलदार बी. जी. धुमाळ, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम,न्हावा शेवाचे सतीश धुमाळ,मोरा पोलीस ठाण्याचे दीपक इंगोले, वाहतूक चे मधुकर भटे सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील,जितेंद्र म्हात्रे,सत्यवान भगत, चंद्रकांत घरत,नरेश रहाळकर आदीजण उपस्थित होते.

Story img Loader