उरण: शेकडो वर्षांपासून उरणच्या मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान जलप्रवास सुरू आहे. मात्र या प्रवासात प्रवासी जेट्टी, वाहनतळ, वीज आणि सुरक्षा यांचा अभाव गाळाची समस्या कायम आहे. किंबहुना या समस्यात दिवसेंदिवस वाढच झाली आहे. त्यामुळे या मार्गाने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडथळ्यांची शर्यत पार करीत प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे प्रवाशांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यात जादाचे तिकीट दर आकारूनही सुविधांचा मात्र अभाव कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याच्या धकाधकीच्या आणि प्रदूषणयुक्त कंटाळवाण्या प्रवासात जलप्रवास सुखकारक ठरू लागला आहे. कमीतकमी वेळेत आणि विना अडथळा हा प्रवास करता येत आहे. यामध्ये सध्या सुधारणा होऊ लागल्या आहेत. मात्र शेकडो वर्षे सुरू असलेल्या मोरा ते मुंबई दरम्यानच्या जलसेवेतील समस्या आणि अडथळे दूर झालेले नाहीत. उलटपक्षी त्यामध्ये भर पडली आहे. याचा त्रास येथील प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

हेही वाचा… भाडेकरू देताय ? पोलीस ना हरकत प्रमाणपत्र नसेल तरी चालेल मात्र भाडेकरूची माहिती, फोटो पोलिसांना कळवणे अनिवार्य

वर्षाला एक ते दीड लाख प्रवासी या मार्गाने प्रवास करीत आहेत. उरणच्या मोरा बंदरातून मुंबई हे अंतर अवघ्या पाऊण ते एक तासात पार करता येते. दर तासांनी एक बोट या मार्गावरून ये जा करीत असते. त्याकरीता प्रवाशांना उन्हाळ्यात ८५ रुपये तर पावसाळ्यातील चार महिन्यासाठी १०५ रुपये (एकेरी) प्रवासासाठी मोजावे लागत आहेत. या मार्गाने प्रवास करताना उरण शहरातून रिक्षाने व त्यानंतर पायी जेट्टीने जवळपास अर्धा किलोमीटर अंतर पार करावे लागत आहे. त्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने बांधलेल्या जेट्टीची दुरावस्था झाली असून जेट्टीला भगदाड पडले आहे. तर जेट्टीच्या फारशा अनेक ठिकाणी उखडल्या आहेत.

हेही वाचा… सकाळी ७ वाजता सुरू होते उरण शहरात वाहतूक कोंडी, शालेय विद्यार्थी, चाकरमानी त्रस्त

त्याचप्रमाणे सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले कठडे तुटले आहेत. तर याच कठड्यावर मासेमारीसाठी वापरण्यात येणारी मोठं मोठी जाळी टाकण्यात आली आहेत. या जाळ्यांच्या अडथळ्यांतून मार्ग काढीत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. तर रात्रीच्या वेळी अनेकदा या जेटीवरील पथदिवेही बंद असतात त्यामुळे अंधारातून प्रवास करावा लागत आहे. या मार्गाने प्रवास करणारे अनेक प्रवासी हे आपल्या दुचाकीवरून प्रवास करतात. त्यांच्या दुचाकीसाठी वाहनतळाची असलेली सुविधा अपुरी पडत आहे. त्यामुळे प्रवासी बोटी लागणाऱ्या जेट्टीवर ही दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. तसेच ओहटीच्या वेळी किनाऱ्यावरील गाळाची समस्या ही ऐरणीवर आहे. त्यामुळे प्रवाशांकडून कोट्यवधी रुपयांचा कर आकारला जात असताना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून या प्रवाशांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. जेट्टी दुरुस्ती आणि सुविधांसाठीचा प्रस्ताव मेरिटाईम बोर्डाच्या बांधकाम विभागाला पाठविण्यात आले असल्याची माहिती मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली आहे.