मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी खाडीपुलावरील तिसऱ्या खाडीपुलाचे काम वेगात सुरु आहे. याच खाडीपुलांच्या कामामुळे वाशी टोलनाक्यावर सातत्याने होणाऱ्या वाहतूककोंडीचा फटका लाखो प्रवाशांना बसत आहे. याच वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी मुंबई वाशी मार्गावर सध्या सुरु असलेल्या टोलनाक्याच्या पुढे वाशीच्या दिशेला १० लेनचा नवा टोलनाका तयार करण्यात येत आहे. या १० लेनच्या नव्या टोलनाक्याच्या कामला रस्ते विकास महामंडळाकडून सुरवात करण्यात आली आहे. तसेच हे काम मार्च पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष असल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाने लोकसत्ताला दिली आहे.
हेही वाचा- १४ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उरणकरासाठी आशेचा किरण; उरणच्या उपजिल्हा रुग्णालय भूखंडाची पाहणी
वाशी येथील सध्या सुरु असलेल्या टोलनाक्यावर एकाच ठिकाणी टोल प्लाझा असल्याने दोन्ही मार्गावर वाहतूककोंडी होते. परंतू वाशीच्या दिशेला होणाऱ्या नव्या टोलनाक्यामुळे एका ठिकाणी वाहनांची गर्दी कमी होऊन वाहने दोन टोल नाक्यावर विभागली जाणार आहे. कारण सध्या सुरु असलेला टोलनाका हा नव्या टोल प्लाझा नंतर फक्त मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी वापरला जाणार आहे. नव्याने होणारा टोलनाका हा फक्त मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे नव्या टोलनाक्यामुळे वाहतूक कोंडीची सुटका होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- नवी मुंबई: अंमली पदार्थ बाळगणाऱ्या नायझेरियन नागरिकाला अटक
वाशी टोलनाक्यावर सातत्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. सध्या वाशी खाडी पुलावरील वाहनांची गर्दी नव्या टोलनाक्यामुळे फुटेल अशी शक्यता आहे. या ठिकाणच्या वाहतूक कोंडीमुळे सातत्याने छोटे अपघात होत असतात. मुंबईचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वाशी खाडीपुलावरील पहिला पूल मुंबईकडून नवी मुंबईकडे येणाऱ्या फक्त हलक्यावाहनांच्या वाहतूकीसाठी वापरला जात होता तर दुसरा खाडीपुल सध्या वाहतूकीसाठी वापरण्यात येत आहे. दुसऱ्या खाडीपुलावर मुंबईकडे जाण्यासाठी ३ तर मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी ३ लेन आहेत. वाशी खाडीपुलावर व सध्याच्या टोलनाक्यावर प्रचंड वाहतूककोंडी होते. तिसऱ्या खाडीपुलाच्या कामामुळे पुणे व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकांवर टोलनाक्यावर पहाटेपासूनच गर्दी पाहायला मिळते. मार्चपर्यंत नवा टोलनाका झाल्यास वाहतूककोंडी फुटेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा- नवी मुंबई: नको असलेल्या वस्तू हवे असलेल्यांपर्यंत पोहचविणारी योजना बारगळली
नव्या टोलनाक्यामुळे गर्दी विभागणार……
सध्या वाशी टोलनाक्यावर ९ मुंबईकडे तसेच ९ पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी लेन वापरल्या जातात.परंतू १० लेनचा नवा टोलनाका वाशीच्या दिशेने झाल्यास एकाच ठिकाणी येणारी वाहनांची गर्दी कमी होणार आहे.तसेच जुन्या टोलनाक्यावरील सर्व लेन मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वापरल्या जाणार असल्याने वाशी गावापासून महामार्गावर सु होणारी वाहतूककोंडी फुटेल.
हेही वाचा- मोरा- मुंबई जलसेवा तीन तास बंद राहणार; बंदरातील गाळामुळे प्रवाशांचा खोळंबा
नवा टोल नाका हा मुंबईहून वाशीच्या दिशेला सध्या सुरु असलेल्या टोलनाक्याचा पुढे होत असून मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचा रस्ते विकास महामंडळाचा प्रयत्न आहे. त्यामुळे लवकरात लवकर नवा टोल प्लाझा तयार करून वाहनांची विभागणी होऊन वाहतूकोंडीतून प्रवाशांची सुटका करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता एस. एस. जगताप यांनी दिली.
,