लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : भारतीय शेतकरी कामगार पक्षाने पनवेल, उरणसह नवी मुंबईतील विविध विधानसभा मतदारसंघाच्या मतदारसंख्येत ८५,१२९ मतदारांची दूबार नावे तातडीने रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील यांनी याबाबत पहिल्यांदा पनवेलच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी केली. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती दिली.

माजी आ. पाटील यांनी पनवेल विधानसभा १८८ मतदार संघात नोंद असलेले आणि आजुबाजुला हाकेच्या अंतरावर असलेल्या इतर उरण, नवी मुंबईतील विधानसभा मतदारसंघात ही नोंद असलेल्या मतदार तसेच संशयास्पद पत्ते नसलेले अणि पनवेल मतदारसंघातील मतदार यादीत दुबार नावे असलेली रद्द करावी अशी मागणी १० सप्टेंबरला पनवेलच्या उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांकडे केली होती.

आणखी वाचा-नवी मुंबईतील दौऱ्यात अमित शहांची ‘संघ’वारी

राज्यातील सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या विधानसभा क्षेत्रात पनवेल विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. सध्या या मतदारसंघात ६ लाख ४२ हजार ५७ मतदार आहेत. विविध औद्योगिक वसाहतींसह माथाडी कामगार पनवेलमध्ये राहतात. त्यामुळे परराज्यातील कामगार वर्ग येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. सध्या पनवेलमधील दूबार नावे असलेल्यांची मतदारांची संख्या २५ हजार ७७२ एवढी असून पत्ते व दोषयुक्त असलेले ५८८ नावे आहेत असे असल्याने माजी आ. पाटील यांनी संशय व्यक्त केला आहे.

आणखी वाचा-अमित शहांचा दौरा गणेश नाईकांसाठी फलदायी ?

उरण विधानसभा मतदार संघात देखील २७ हजार २७५ मतदार तसेच बेलापूर विधानसभा मतदार संघात १५ हजार ३९८ मतदार आणि ऐरोली विधानसभा मतदार संघात १६ हजार ९६ मतदारांची नोंद असल्याचे निदर्शनास आल्याने माजी आ. पाटील यांनी पनवेलचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदनाव्दारे प्रत्यक्ष दुबार व दोषयुक्त मतदारांच्या नावांची यादीसह नावे कमी करण्यासाठी लेखी तक्रार दाखल केली. परंतू अधिकारी वर्गाकडून दिरंगाई होण्याची शक्यता असल्याने व मतदार संघात बोगस मतदान होऊ नये म्हणुन न्याय मिळणेसाठी उच्च न्यायालयात (Wpst no28080/2024) याचिका देखील दाखल केली आहे.