शहरी भागातील रहिवाशांना ३०० युनिट पर्यंत मोफत वीज द्यावी या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवी मुंबई तर्फे महावितरणला निवेदन देण्यात आले आहे. हे आंदोलन आता राज्यभर केले जाणार असल्याची माहिती सेना नेत्यांनी दिली आहे. राज्यात वीज मुबलक असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आता मध्यमवर्गीयांना ३०० युनिट पर्यत वीज देयक माफ करावी अशी मागणी महावितरणाचे कार्यकारी अधिकारी संजय पाटील यांना  निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पनवेल: पायी चालणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र चोरले

आज वाशी येथील महावितरण कार्यालयावर शिवसेनेने या मागणीसाठी आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे वाढत्या महागाईत मध्यमवर्गीयांना दिलासा देणे आवश्यक असल्याने सदर मागणी करण्यात आली आहे. महायुती सरकार शहरी भागातील मध्यमवर्गीय व गोर गरिबांच्या कडे दुर्लक्ष करीत आहे. विजेचे  प्रचंड वाढते दर हि चिंतेची बाब असून अशी सेवा निदान मध्यमवर्गीय व गरीब लोकांच्या कडून पैसे कमावण्यासाठी नव्हे तर सेवा भाव जपण्यासाठी दिली पाहिजे असे शिवसेना जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांनी सांगितले. या शिवाय नवी मुंबईत बहुतांश ठिकाणी सुरु असलेल्या विजेच्या लपंडाव विषयी ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.