नवी मुंबई : मागील आठवड्यात पडलेल्या पावसाचा भाज्यांच्या दर्जावर परिणाम होत आहे. भिजल्याने भाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात आवक वाढूनही भाज्यांच्या दरात वाढ होत आहे.

राज्यसह नवी मुंबई, मुंबई उपनगरात मागील आठवड्यात पडलेल्या पावसाने भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. वाशीतील भाजीपाला बाजारात भाज्यांची १००-१५० गाड्यांची आवक वाढली असून ७१२ गाड्या दाखल झाल्या होत्या. परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणावर भिजलेल्या भाज्या दाखल होत आहेत. त्यामुळे भाज्यांचा दर्जा घसरत आहे.

आणखी वाचा-सिडको हस्तांतरण शुल्क रद्द करण्याच्या निर्णयाकडे नवी मुंबईकरांचे लक्ष

वाटाणा, फरसबी, टोमॅटो, आणि मेथीच्या दरात वाढ झाली आहे तर शिमला आणि हिरवी मिरचीच्या दरात घसरण झाली आहे. फरसबी अवघी ८ क्विंटल तर वाटाणा २४८ क्विंटल , टोमॅटो २०३३क्विंटल, मेथी २८३००क्विंटल दाखल झाली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात भाज्यांची १००-१५०गाड्यांची आवक वाढलेली आहे. परंतु पावसामुळे भाज्या खराब झाल्याने शेत मालाची प्रत घसरल्याने काही भाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे, अशी माहिती एपीएमसीमधील घाऊक व्यापारी बाळासाहेब बडदे यांनी दिली.