उरण : ऐन पावसाळ्यात तालुक्यातील दहा गावांतील २५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना पाणीपुरवठा करणारे पाटबंधारे विभागाचे पुनाडे धरण आटले आहे. त्यामुळे या दहा गावांची पाणीटंचाईकडे वाटचाल सुरू आहे. प्रशासनाने या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करण्याचे अहवाल मागविले आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्षे टँकरमुक्त तालुका म्हणून रायगड जिल्ह्यात मान मिळविलेल्या उरण आता टँकरग्रस्त बनण्याच्या वाटेवर आहे.

उरण तालुक्यातील दहा गावांना पुनाडे धरणातून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सुरुवातीपासूनच गळती लागलेल्या या धरणातील पाणी सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व त्यानंतर येथील आठ गाव कमिटीच्या सहकार्याने पुरवठा केला जात आहे. मात्र या धरणाची साठवणूक क्षमता न वाढल्याने आणि जोडीला पावसानेही दडी मारल्याने अखेरीस धरणाने तळ गाठला आहे. तर दुसरीकडे येथील २३ ग्रामपंचायती, उरण नगर परिषद व नौदल, ओएनजीसी, भारत पेट्रोलियम, जेएनपीटी, वायू विद्युत केंद्र त्याचप्रमाणे तालुक्यातील छोट्या- मोठ्या औद्याोगिक विभागाला रानसई धरणातून एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. या धरणाची पातळीही खालावली आहे. बुधवारी धरणाची पाणी पातळी ८५ फुटांवर होती. दोन दिवसांत पावसाचे आगमन न झाल्यास ही पातळी खालावल्यास नागरिकांना धरणातील मृत साठ्यातील पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा…नवी मुंबई: सीवूड्स वाहतूक शाखेला १५ वर्षांनंतर हक्काची जागा

घटत्या पाणीपातळीमुळे पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीला मंगळवार व शुक्रवार अशी आठवड्यातील दोन दिवसांची पाणीकपात नोव्हेंबर महिन्यापासूनच करावी लागली आहे.

उरणसारख्या वाढत्या शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच औद्याोगिक विभागासाठी एकमेव रानसई धरण आहे. १९६० च्या दशकात करंजा येथील नौदलाला पाणीपुरवठा करण्यासाठी उरणच्या पूर्व विभागातील रानसई येथे हे धरण महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)ने उभारले आहे. त्यावेळी धरणाची १० दशलक्ष घनमीटरची पाणी साठवणूक क्षमता होती. ती मागील सहा दशकांत कमी होऊन अवघी ७ दशलक्ष घनमीटरवर आली आहे. मात्र या ६२ वर्षांत एकीकडे धरणातील पाणी साठवणूक क्षमता कमी झाली, दुसरीकडे उरणमधील वाढते औद्याोगिकीकरण व नागरीकरण यामुळे पाण्याची मागणी वाढली. धरणाची साठवणूक क्षमता कमी झाली आहे .

हेही वाचा…नवी मुंबई: बहुउद्देशीय इमारतीचा तिढा सुटण्याची चिन्हे, दोन वर्षांनंतर भोगवटा प्रमाणपत्र मिळणार

उसनवारीची वेळ

उरणमधील ग्रामपंचायती, नगर परिषद व औद्याोगिक विभागाला पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीला सिडकोच्या हेटवणे धरणातून १० एम.एल. डी. पाणी उसने घ्यावे लागत आहे. मात्र तेही १० ऐवजी ५ एम.एल.डी. एवढेच मिळत असल्याने पाणीटंचाई तशीच राहिली आहे. उरण तालुक्यात सद्या:स्थितीत दोन छोटी धरणे आहेत. मात्र या धरणांचे पाणी या तालुक्याला पुरेसे नाही. उरण तालुक्याला सध्याच्या स्थितीत रोज ५० ते ६० एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र रानसई धरण आणि पुनाडे धरणाची क्षमता तेवढी नाही.

हेही वाचा…खंडणी प्रकरणी कथित पत्रकार आणि त्याच्या महिला साथीदार अटक 

पुनाडे धरणातील पाणीपुरवठा बंद झाल्याने येथील आठ गावे कमिटीने गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. उरण पंचायत समितीच्या वतीने ग्रामसेवकाकडून अहवाल मागवून टँकर सुरू करण्यात येतील. – समीर वठारकर, गट विकास अधिकारी, उरण पंचायत समिती