लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : शहरात पावसाने श्रीगणेशा केल्यानंतर मागील काही दिवस दडी मारली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने खबरदारी म्हणून आठवड्यातून विभागवार दोन दिवसांऐवजी आठवड्यातून तीन दिवस सायंकाळचा पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय मागील आठवड्यात घेतला आहे. परंतु नवी मुंबई शहर व मोरबे धरण परिसरात पावसाने दडी मारल्याने पालिका प्रशासनाची चिंता आणखी वाढवली आहे. त्यामुळे पालिकेने नागरिकांना जपून पाण्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. यंदा मात्र पालिकेला पाणीकपातीला सामोरे जावे लागले असून फक्त ३८ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा मोरबे धरणात शिल्लक आहे.

जून महिन्यात पावसाने श्रीगणेशा केल्यानंतर दडी मारल्याने चिंता वाढली आहे. शहराला होणारा दररोजचा पाणीपुरवठा व नियोजनाबाबत बारीक लक्ष ठेवून असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

आणखी वाचा-कर्नाळा किल्ल्यावर नवे भुयार सापडले

महापालिकेच्या आठही विभागांत आठवड्यातून दोन दिवस सायंकाळच्या पाणीपुरवठ्यात वाढ करून तीन दिवस विभागवार सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. सद्या:स्थितीत मोरबे धरणात फक्त २५.२८ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून फक्त ३८ दिवस पुरेल एवढाच म्हणजेच २५ जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. सरासरी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मोरबे धरण परिसरात पावसाला सुरुवात होते. आता मात्र पावसाने दडी मारल्याने पुन्हा चिंता वाढली आहे.

आणखी वाचा-पनवेल : करंजाडेवासियांचे पाणी प्रश्नासाठी आंदोलन

मोरबे धरणातील जलसाठासन २०२३-२४सन २०२४-२५
जूनचा पाऊस१८.२० मि.मी.८०.६० मिमी.
पाणी पातळी६९.०९ मी.६९.०५ मी.
पाणीसाठा४८.४६३ दलघमी ४८.२५९ दलघमी
पाणीसाठा (टक्क्यांत)२९.५० टक्के२५.२८ टक्के

पावसाने दडी मारल्याने खबरदारी म्हणून शहरात पाणीकपात सुरू आहे. मोरबे धरणातील पाणीसाठ्याबाबत पालिका प्रशासन मात्र बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. -अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता, नमुंमपा