दोन डिसेंबर, १९८४ च्या मध्यरात्री मध्य प्रदेशातील भोपाळ येथील ‘युनियन कार्बाइड’च्या कारखान्यात मेथिल आयसोसायनाइट ऊर्फ मिक वायू वातावरणात सुटून जो प्रचंड अपघात झाला, तो औद्योगिक क्षेत्रातील जगातला आजवरचा सर्वात मोठा अपघात असे समजले गेले. कारण त्यानंतरच्या आठ-दहा दिवसांत अडिच हजारांच्या वर माणसे मृत्युमुखी पडली आणि त्यानंरच्या गेल्या ३० वर्षांत किती माणसे अपंग झाली अथवा जिवास मुकली त्याची गणनाच नाही. मिक वायूचा वापर करून सेविन हे कीटकनाशक त्या कारखान्यात बनविले जाई. पण अपघाताच्या पूर्वी दीड महिना अगोदरपासून सेविन बनविणे बंद असल्याने तेथील दोन टाक्यांत असलेला अनुक्रमे ४५ टन आणि १५ टन वायू टाकीमध्येच पडून होता. हा वायू +१५ ते शून्य अंश सेल्सिअस तापमानाला आणि दर चौरस सें.मीटरला ०.५ ते ०.७ किलोग्रॅम एवढय़ा दाबाखाली साठवला जातो. या वायूचा पाण्याशी संपर्क आला तर वायूचे तापमान आणि दाब वाढतो. या टाकीवर बसवलेल्या व्हाल्व्हच्या पुढे बसवलेला पाइप पाण्याने धुण्यासाठी तेथील कामगाराने पाण्याची नळी व्हाल्व्हपुढच्या नळीला जोडून दिली होती. व्हाल्व्ह गळका असल्याने त्यातून पाणी टाकीत गेले आणि आतील मिक वायूचा दाब तीन किलोग्राम एवढा वाढला व तापमान तर एवढे वाढले की टाकी लाल बुंद झाली. त्यामुळे तिच्यावरची सेफ्टी व्हाल्व्ह उघडली जाऊन वायू बाहेर सुटला. असा वायू धुरांडय़ात जाळून हवेत जायला हवा, पण धुराडे सफाईसाठी काढून ठेवल्याने वायू सरळ हवेत जाऊन वातावरणात पसरला.
या अपघातानंतर जगभर रासायनिक कारखाने किती सुरक्षित आहेत याची पाहणी सुरू झाली. मग भारत सरकारने दिल्ली, बडोदा आणि ठाणे या तीन जिल्ह्यांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी आपत्कालीन यंत्रणा बनवली. दिल्ली हे राजकीयदृष्टय़ा संवेदनशील आणि बडोदा व ठाणे येथील रासायनिक कारखाने लक्षात घेऊन या जिल्ह्यांची निवड झाली. नंतर भारतभरच्या सर्व जिल्ह्यांसाठी ही योजना लागू झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा