आपल्याकडच्या बहुसंख्य शेतकऱ्यांचं उत्पन्न जेमतेम कसंबसं जगण्याइतकंच असतं. त्यातच अलीकडे वाढलेले उत्पादन खर्च, शेतमालाला मिळणारे कमी भाव, यामुळे शेतकऱ्यांची आíथक स्थिती अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचलेली दिसते. साहजिकच शेतकरी व त्याच्या कुटुंबीयांना आधुनिक आहारपद्धतीत तज्ज्ञांनी शिफारस केलेले अन्नघटक तसेच पोषणमूल्येही मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी कुटुंबांत कुपोषण वाढून त्यांचे आरोग्यमान दिवसेंदिवस ढासळत चालले आहे.
शेतकरी कुटुंबांच्या या स्थितीवर कुटुंब समृद्धी बागेचा प्रयोग एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो. नेमकी किती जमीन यासाठी वापरायची, यावर या प्रयोगाचे यश अवलंबून आहे. यासाठी कुटुंबाचा आकार (माणसांची संख्या), जमिनीचा प्रकार, जमीन बारमाही आहे की हंगामी, घरच्या माणसांना सवड किती आहे हे लक्षात घ्यावे लागेल.
कुटंब समृद्धी बागेत आपण गरजेच्या धान्याबरोबरच भाज्या आणि फळेही लावणार असल्याने त्या चोरीस जाण्याची फार मोठी शक्यता असते. त्यासाठी आपल्या शेतातील वस्तीजवळच बागायतीचा सर्वोत्तम जमिनीचा तुकडा या कामासाठी निवडावा. म्हणजे त्यावर कुटुंबीयांची देखरेख चांगली राहील. सवडीने त्यांना वरचेवर कामही करता येईल. जमीन उत्तम असल्याने उत्पादनही चांगले मिळेल. मात्र वस्ती नसेल तर मजबूत कुंपण करणे योग्य ठरेल.
या तुकडय़ात आपल्याला कुटुंबाच्या गरजेची जास्तीतजास्त पिके तीसुद्धा सेंद्रीय पद्धतीने पिकवायची आहेत. कारण या पद्धतीने पिकवलेले अन्नधान्य आरोग्यदायी असते, असा विचार अलीकडे वाढला आहे. सुरुवात करण्यापूर्वी ही जमीन भरपूर (हेक्टरी किमान ५० गाडय़ा) शेणखत घालून खतावून घ्यावी. हंगामापूर्वी वेळ असेल तर ती हिरवळीच्या खतानेही खतावून घ्यावी. एक तृणधान्य, एक हिरवळीचे पीक, एक कडधान्य पीक, एक मसाला पीक आणि एक तेलधान्य असे हेक्टरी १०० ग्रॅम धान्यमिश्रण घेऊन उथळ पेरावे किंवा विस्कटून बी जमिनीत मिसळावे. सुमारे ४०-५० दिवसांनी हिरवळ जमिनीत गाडावी.
यामागचे विज्ञान असे की, वेगवेगळ्या पिकांत वेगवेगळी पोषकद्रव्ये असतात. त्यामुळे पिकांना सर्व तऱ्हेची पोषकद्रव्ये मिळून ती निरोगी आणि उत्तम वाढतात. मात्र हे सूत्र सांभाळत असताना जमिनीला भरपूर सेंद्रीय पदार्थ मिळाले पाहिजेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा