निसर्गातील विविध पदार्थाचा पाण्याशी संपर्क आल्याने त्या पदार्थाचे मूळ गुणधर्म बदलतात. विशेषत: लाकूड, धातू आणि इमारतीतील अनेक पदार्थाच्या बाबतीत असे होत असते. लाकूड हे सच्छिद्र असल्याने त्यामधील छिद्रांमध्ये पाण्याचा शिरकाव होऊन लाकडाची कुजण्याची प्रक्रिया चालू होते आणि त्यास कीड लागते. धातूचा पाण्याशी संपर्क आल्याने तो गंजू लागतो. त्यात पाण्यातील आणि हवेतील ऑक्सिजनचा धातूशी संपर्क आल्याने ऑक्सिडेशन (गंजणे) सुरू होते. खारट आणि आम्ल पाण्याशी धातूचा संपर्क आल्यास धातूचे ऑक्सिडेशन अधिक वेगाने होते. परिणामी धातू गंजू लागतात. इमारतीत छत, टेरेस आणि बाल्कनी यांची पावसात गळण्याची सुरुवात होते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा पाण्याशी कमीत कमी संपर्क असणे आवश्यक असते. पाण्याशी येणारा संपर्क कमी करण्यासाठी जलरोधक पदार्थ वापरतात.
जलरोधक पदार्थ गरजेनुसार निवडले जातात. लाकूड, काँक्रिट आणि विटा या सर्व वस्तूंना जलरोधक बनवावे लागते. त्यांच्या पृष्ठभागावर योग्य रसायन वापरले असता ते जलरोधक बनतात. उदा. विटांच्या व इतर बांधकामात (विशेषत: जमिनीच्या वरील बांधकामात) सिलिकॉन संयुगांच्या पातळ थराचा जलरोधक म्हणून उपयोग करतात. बांधकामाच्या पृष्ठभागात शोषल्या गेलेल्या पाण्यामुळे बऱ्याच वेळा त्याचा रंग उडून जातो. सिलिकॉन संयुगांमुळे पाण्याचे शोषण कमी होऊन रंग टिकण्यास मदत होते.
जलरोधकाचा प्रकार आणि पद्धत ही त्याच्या उपयोगानुसार ठरते. सर्वसामान्यपणे बऱ्याच पदार्थावर जलरोधक आवरण दिले असता ते जलरोधक बनतात. तसेच काही वेळेस ते त्या पदार्थाच्या तयार करण्याच्या प्रक्रियेत मिसळले असता तो पदार्थ जलरोधक बनतो. जलरोधक म्हणून वापरले गेलेले रसायन असे हवे की त्यामुळे वनस्पती, प्राणी यांना त्रास होणार नाही. तसेच घरातील वस्तू जलरोधक बनवायच्या असतील तर त्यातील रसायने ही मुलांना, पाळीव प्राण्यांना आणि वनस्पतीला सुरक्षित असून ती आपल्या बजेटमध्ये बसणारी असावी. तरच त्याचा उपयोग मोठय़ा प्रमाणावर होऊ शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा