सूर्या आचार्य हे मुळातले ओरिसा राज्यातले आहेत. कॅनडातील सस्काचुन (saskatchewan) राज्याच्या विद्यापीठातून १९७९ साली त्यांनी शेतीशास्त्रातील पी.एचडी. मिळविली. तेव्हापासून ते गेली ३४ वष्रे अॅग्रिकल्चर अॅण्ड अॅग्रिफूड, कॅनडा या संस्थेत संशोधक म्हणून काम करीत आहेत. आज ते गुरांच्या खाद्यासाठी उपयोगी पडणाऱ्या ‘फोरेज’ या वनस्पतीचे संशोधक म्हणून ओळखले जातात.
रवंथ करणाऱ्या आणि गुरांना ‘फोरेज’ गटातील वनस्पती खाद्य म्हणून उत्तम ठरते. त्यामुळे गुरांना भरपूर मांस धरते व दूधही भरपूर मिळते. या दोन्ही गोष्टींच्या सेवनाने मनुष्याला प्रथिनांचा पुरवठा होतो. इतर पिके ज्या जमिनीत होत नाहीत अशा जमिनीत फोरेज वनस्पती उगवतात. एवढेच नव्हे तर अशा वनस्पतींच्या लागवडीमुळे जमिनीचे वाळवंटीकरण व्हायला अटकाव बसतो आणि जमिनी परत लागवडीखाली आणता येतात.
‘फोरेज’ गटात अनेक वनस्पती मोडतात. त्यांची लागवड केल्याने जैवविविधतेत भर पडते. फोरेजच्या काही जाती मनुष्य खाद्यासाठीही उपयोगी पडतात. या जाती पौष्टिकतेच्या बाबतीत किती सकस आहेत यावर सध्या संशोधन चालू आहे. फोरेज गटातील वनस्पतींना बाजारभाव चांगला मिळतो, त्यामुळे त्यांची गणना नगदी पिकात होते. ज्या देशातील जमिनी उपजाऊ नाहीत त्या देशातून अशा वनस्पतींना प्रचंड मागणी आहेत.
जगात सगळ्यात जास्त जनावरे भारतात आहेत. भारतात गुरांच्या खाद्यावर पुरेसे लक्ष पुरविले जात नाही. त्यामुळे भारतातील गुरे हडकुळी दिसतात. ती दूध व मांसही कमी देतात. या दृष्टिकोनातून गुरांना चारा मिळण्यासाठी ‘फोरेज’ वनशेतीचे महत्त्व भारतात अधिक आहे.
सूर्या आचार्य, त्यांच्या संस्थेत सध्या ‘अल्फा’ या गवतावर प्रयोग करीत आहेत. कॅनडाच्या -२ ते +३ अंश सेल्सियस तापमानात ‘अल्फा’ गवताबरोबरच मेथी, तुळस वाढविण्याचे प्रयोगही ते करीत आहेत. उष्ण कटिबंधातील गवत कॅनडात वाढविण्यासाठी हरितगृहे वापरली जातात. गवतावर रोग पडला तर कोणत्या अळ्या, किडे यांची वाढ होते याचाही अभ्यास ते करीत आहेत.
जे देखे रवी.. मनोविश्व
माणसाला मुख्यत: फक्त तीनच भावना असतात किंवा होतात किंवा प्रभावित करतात.. हे वाक्य जेव्हा मी तेराव्या अध्यायात ज्ञानेश्वरांमार्फत वाचले तेव्हा मी आश्चर्यचकित झालो होतो. त्या भावना म्हणजे सुख, दु:ख आणि द्वेष. मी मनात म्हणालो, एवढे माझे भावविश्व आणि तीनच भावना कशा? मग मी एकेक प्रसंग आठवू लागलो, आठवणी रचू लागलो. अनुभवताना पृथक्करण करू लागलो आणि हळूहळू असे शाबीत होऊ लागले की, या त्रिसूत्री सिद्धान्ताला काही अर्थ आहे.
जीवनात जे हवे असते ते आपल्याला मिळाले नाही, पण दुसऱ्याला मिळाले तर द्वेष निर्माण होतो. या द्वेष शब्दाची मत्सर, असूया, राग अशी निरनिराळी रूपे आहेत. दु:खालाही ‘मीठा मीठा दर्द’ असे एक स्वरूप आहे. हे मुख्यत: गज्मल या काव्यप्रकारात दिसते. कोठे तरी एक वाक्य वाचले होते, When you are not mine, my every thought is haunting you, but when you are mine, I miss the wistfullness of wanting you. या वाक्यात हुरहुर दडली आहे. नातवंडे दूर असली की हुरहुर वाटते. आपल्याला नातवंडे आहेत, या आनंदाचा हा आविष्कार आहे.
हे त्रिसूत्र कपिल नावाच्या एका द्रष्टय़ा माणसाने दोन हजार वर्षांपूर्वी मांडले असे म्हणतात. कपिल मुनींनी देवाचे अस्तित्व नाकारले. हे विश्व निसर्गाची (प्रकृतीची) देणगी आहे, हे त्यांनी ठासून सांगितले आणि हा देणगीरूपी वारसा टिकवून ठेवण्यासाठी चैतन्य उपयोगी पडते असे म्हणून ठेवले. देवाचा कुठेच पत्ता नाही. या परिभाषेत पुढे अडचणी येऊ लागल्या म्हणून वेदान्तात (म्हणजे मुख्यत: उपनिषदांत) निसर्ग हा चैतन्याचाच आविष्कार आहे असे म्हणून ती परिभाषेतील अडचण मिटवली गेली.
पुढे दोन हजार वर्षांनंतर एक वैज्ञानिक उपनिषदकार जन्माला आला, त्याचे नाव आइनस्टाइन. हाही वेदान्तीच. याने चैतन्याचे रूपांतर वस्तुमानात किंवा वस्तूत होते असे नुसते म्हटले नाही, तर गणित मांडून सिद्ध केले. या वस्तुमानाचा खापर खापर खापर पणजोबा म्हणजे हल्लीचा हिग्ज बोसॉन. या बोसॉन शब्दात बोस असे एक भारतीय आडनाव आहे ज्याने आपल्या मनोविश्वात या मूलवस्तुमान असलेल्या कणाचे गणिती चित्र मांडले आणि ते आइनस्टाइनने स्वीकारले. चैतन्यातून प्रकट होणाऱ्या वस्तूंमधून पुढे जेव्हा माणूस जन्माला आला तेव्हा पहिल्यांदा निसर्गाची आणि नंतर देवाची पूजा सुरू झाली. नंतर गेल्या शतकात निसर्गात अनिश्चितता आहे असे कोणी तरी सिद्ध केल्यावर आइनस्टाइनसुद्धा रागावले आणि म्हणाले, ‘देव काय जुगार खेळतो की काय?’
-रविन मायदेव थत्ते lthatte@gmail.com
आजचे महाराष्ट्रसारस्वत २९ जानेवारी
१२७४ > संत निवृत्ती विठ्ठलपंत कुलकर्णी तथा श्री निवृत्तीनाथ यांचा जन्म. ‘निवृत्तीसार’, ‘निवृत्तीबोध’, ‘उत्तरगीता’ आदी ग्रंथ त्यांनी लिहिले. ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व सोपान यांचे हे थोरले बंधू नाथपंथीय होते. त्यांचे अभंग उत्कट आणि रसाळ आहेत.
१८७१ > कवी चंद्रशेखर गोऱ्हे (राजकवी चंद्रशेखर) नाशिक येथे जन्म. तेथील गोदावरी नदीवर गोदागौरव हे स्तोत्रकाव्य त्यांनी लिहिले. पंडिती काव्याच्या अखेरच्या दुव्यांपैकी ते एक होते आणि इंग्रजी दीर्घकाव्यांची संस्कृतप्रचुर मराठीत रूपांतरे करण्याचा छंद त्यांनी जपला. मिल्टनच्या ‘एल् पेन्सरोझो’ व ‘ल अलेग्रो’ या कवितांची रूपांतरे अनुक्रमे ‘चिंतोपंत उदास’ आणि ‘रंगराव हर्षे’ म्हणून प्रसिद्ध झाली. ‘स्वदेशप्रीती’, ‘धनगर’, ‘चैतन्यदूत’ आदी दीर्घकाव्ये तसेच ‘चंद्रिका’ हा स्फुट रचनांचा संग्रह ( प्रकाशन १९३२) अशी त्यांची काव्यसंपदा. बडोदे संस्थानच्या वैद्यकीय विभागात काम करणाऱ्या गोऱ्हे यांना पुढे ‘राजकवी’ होण्याचा मान मिळाला.
१९६३ > संपादक, संशोधक व कथाकार सदाशिव आत्माराम जोगळेकर निधन. ‘गाथा सप्तशती’चे संपादन स.आं.नी केले. जोसेफ मॅझिनीचे चरित्र, संयुक्त महाराष्ट्र व महागुजरात ही माहितीपर पुस्तकेही त्यांनी लिहिली
संजय वझरेकर
वॉर अँड पीस उपदंश- गरमी : पुरुष विकार
गरमी, परमा किंवा अनुक्रमे उपदंश व फिरंग या नावाने ओळखले जाणारे विकार आयुर्वेदाच्या मूळ संहितेत नाहीत. ते पुढे माधवनिदान, भावप्रकाश, या ग्रंथांत आढळतात. सामान्यपणे गरमी हा पुरुषांचा व परमा स्त्रियांचा विकार समजला जातो. आयुर्वेदीय ग्रंथाप्रमाणे फिरंग हा दोघांनाही होणारा विकार आहे. उपदंश हा फक्त पुरुषांना होणारा विकार समजला जातो.
दंश म्हणजे चावणे, तशा प्रकारच्या वेदना ज्या विकारात होतात त्या विकारास उपदंश म्हणतात. विकारांची नावे वेगवेगळी असली तरी दोन्ही रोग शरीरसंबंधातून कोणा एकाचा संसर्ग दुसऱ्यास होऊन निर्माण होतात. दोन्हीही रोग तसे आगंतुकच आहेत. उपदंश हा शारीरिक कारणांनी होतो. इंग्रजीत व्ही. बी. या नावाने ओळखला जाणारा हा विकार पुरुषाने रोगपीडित योनी असलेल्या स्त्रीशी संबंध आल्यामुळे होतो. ‘असंगाशी संग’ किंवा ‘रेड लाईट एरिया’मध्ये हा रोग पुरुषांना केव्हा ना केव्हा होतोच. काही पुरुषांना खूप तिखट, आंबट, खारट पदार्थानी अथवा चुकीच्या वैद्यकीय सल्ल्यामुळे पारदादि कच्ची रसायने खाण्याने होतो. स्त्री-पुरुषांचे मूत्रेंद्रिय हा सर्वात नाजूक व कोमल अवयव आहे. या अवयवाला किंचितही उष्णता वा घाणेरडा संपर्क चालत नाही. या अवयवाला अगदी नाजूक, नवजात अर्भकासारखे जपले तर लवकर आराम पडतो.
शिश्नाच्या जागी जखम होणे, कातडीची आग, चुरचुरणे, टोचणी, कंड, पुटकुळी व सूज येणे, शिश्न लहान होणे, पिकलेल्या उंबरासारखे लाल व मृदू होणे, दरुगधीयुक्त स्राव व पू, मूत्रेंद्रिय झडणे, नपुंसकता अशी लक्षणे असतात. गुहय़ भागाच्या स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. नियमितपणे त्रिफळा काढय़ाने शिश्न धुवावे, एलादि तेल लावावे. रात्री शतधौत घृत लावावे. दशांगलेपाचा गार पाण्यातील पातळ लेपही उपयोगी पडतो. प्रवाळ, कामदुधा, चंदनादि वटी प्रत्येकी ३ गोळय़ा दोन वेळा, उपळसरी चूर्ण सकाळी व त्रिफळाचूर्ण रात्री एक चमचा घ्यावे. मौक्तिक भस्म, चंदनखोडाचे एक चमचा गंध, महातिक्त, शतावरीघृतही उपयोगी पडते.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले