अन्नधान्य उत्पादनात खताचा वाटा मोठा आहे. पण शेती उत्पादनाच्या साधनांपकी ते एक महागडे साधन आहे. शेतकऱ्यांना खते वेळेवर व योग्य दरात मिळावीत म्हणून केंद्रसरकारने अत्यावश्यक साधनसामग्री कायदा (अधिनियम) १९५५ अंतर्गत खत नियंत्रण आदेश (एफसीओ) १९८५ लागू केला. या आदेशाच्या तरतुदीनुसार, खत उत्पादक, खत विक्रेते, खताची आयात आणि त्याचे पॅकिंग करणाऱ्या सर्व संबंधित व्यक्तींना नोंदणी व परवानापत्र धारण करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना खताचा कुठलाही व्यवहार करता येणार नाही.
खत प्रत-नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्य़ात खत निरीक्षक आणि खत तपासनीस नेमले आहेत. हे अधिकारी कुठल्याही खत कारखान्यातून, खत विक्रेत्याकडून गरज भासेल तेव्हा खताचा नमुना प्राप्त करू शकतात. त्यांनी घेतलेल्या नमुन्याची तपासणी खत प्रत-नियंत्रण प्रयोगशाळा पुणे, नाशिक, औरंगाबाद व अमरावती येथे केली जाते. अशा नमुन्यात जर अन्नद्रव्याचे प्रमाण त्या खतासाठी निर्देशित केलेल्या निकषापेक्षा कमी किंवा जास्त आढळले तर ते खत शेतकऱ्यांना विक्री करण्यास बंदी घातली जाते. विक्रेता व उत्पादकावर कायद्याप्रमाणे कारवाई केली जाते. वितरकांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करून योग्य ती शिक्षा दिली जाते. खतामध्ये भेसळ किंवा खताच्या पिशवी(पोते)वर चुकीची माहिती छापली असेल तर गुन्ह्य़ाच्या तीव्रतेप्रमाणे अपराध्यास तीन महिने ते सात वर्षांपर्यंतचा कारावास होऊ शकतो. या कायद्याखालील अपराध हा अजामीनपात्र असतो.
खताच्या गुणवत्तेवर नियंत्रण राहावे म्हणून केंद्रसरकारतर्फे खतनिर्मिती व वितरण प्रमाणपत्र, खताचे निश्चित स्वरूप, ग्रेड्स व किंमत ठरवून दिली जाते. ही खते कुठे व किती प्रमाणात विकावीत याचे निर्देशदेखील शासन देते.
कारखान्यात खत तयार करून ते ५० किलो वजनाच्या पोत्यात भरून मशीन शिलाईने बंद करणे उत्पादकावर बंधनकारक आहे. खताच्या पिशवीवर खताचे नाव (ग्रेड/ ट्रेड मार्कसहित), त्यातील अन्नद्रव्याचे शेकडा प्रमाण, खताचे वजन, किंमत, बॅचक्रमांक, उत्पादनाची तारीख, उत्पादकाचे नाव, बोधचिन्ह छापणे बंधनकारक आहे. पुनरुत्पादन वा नूतनीकरणासाठी कृषी अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. हा आदेश शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे देखे रवी..      
प्रकृती
प्रकृतीसोबतच येणारा दुसराही शब्द आहे. तो म्हणजे विकृती. मानसिक आजारांना विकृती म्हणण्याची पद्धत आहे. किंवा शारीरिक आजारांनाही तो क्वचित लावतात;  परंतु मुळात विकृती हा शब्द निसर्गाचे नाव आहे. एक ब्रह्म-चैतन्य नावाची गोष्ट होती त्यातून जी ‘विशेष’ कृती प्रसूत झाली ती विकृती आणि म्हणजेच निसर्ग. निसर्गाच्या आपल्या मनात असलेल्या चौकटीतून आणखी काही नेहमी नसलेली कृती दृष्टीस पडली तर ती आपल्या दृष्टीने विकृतीच ठरते म्हणून आजारांना विकृती हे नाव पडते. कपिल मुनींनी निसर्गाला प्रकृती हेही नाव ठेवले होते. ‘अरे मठ्ठय़ा बसून काय राहिलास हातपाय हलव, तुझे पुढे कोण बघणार आहे? अरे जरा थांबशील का, घरात तुझे पाऊल टिकत नाही, अभ्यास कधी करणार? आणि भलत्याच गोष्टी वाचत बसतोय, काय साधू-संत व्हायचंय की काय, मग तुझा संसार कसा होणार?’ या घरातल्या आरोळ्या सगळ्यांनाच परिचित आहेत. हल्ली काही घरांतून त्या इंग्रजीत दिल्या जात असल्या तरी मथितार्थ तोच असतो. तो थंड प्रकृतीचा आहे, त्याच्या जिवाला चैन नाही किंवा विचार केल्याशिवाय एक पाऊल टाकणार नाही हे वर्गीकरण कपिल मुनींचीच देन आहे. निरुत्साही, अतिउत्साही आणि शांत, मूर्ख, चतुर आणि विवेकी ही त्रिकुटेही तिथलीच. कपिल मुनी आकडे मांडून बोलत म्हणून संख्या या शब्दावरून सांख्य तत्त्वज्ञान हा शब्द रूढ झाला.
 हे तमरज सत्त्व गुण आपल्या आत कसे खेळ खेळतात ते बघ आणि अलिप्त राहून माझ्या मगदुरांप्रमाणे जीवन जग, असा एक नारा गीतेत ठिकठिकाणी आढळतो. हे अलिप्तपण जोपासण्यासाठी आणि चित्ताला स्वयंस्फूर्त उभारी देण्यासाठी पातंजलींनी योगाभ्यास सांगितला. चित्त हे मनाचीच सुधारून वाढवलेली आवृत्ती असल्यामुळे त्याला मानसशास्त्र हे नाव पडले. खरे तर गीतेची सुरुवातच मुळी सांख्य योगाने होते. गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या ३९ व्या श्लोकात बरेचसे सांगून झाल्यावर मी तुला सांख्ययोग सांगितला, असे दस्तुरखुद कृष्णानेच म्हटले आहे. सांगण्याचा मुद्दा असा की, भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया कपिल मुनींच्या सांख्य या विश्लेषणावर आणि पातंजली मुनींच्या योग या विलक्षण कल्पनेवर आधारित आहे.
 हे दोघेही वैज्ञानिकच. सांख्य आणि योग या दोन भक्कम पायावर उभे राहिलेले हे तत्त्वज्ञान पुढे एका श्रीकृष्ण नावाच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने सांगितले आणि आपण त्याला देवपण देऊन टाकले आणि कपिल आणि पातंजली मागे पडले. माझे काही श्रीकृष्णाचे वैर नाही आणि असले तरी मी थोडाच कंस आहे, की त्याने माझ्याकडे लक्ष द्यावे आणि कंसालही वैरामधून मुक्ती मिळाली अशी परंपरा आहे. तेव्हा मी सेफ आहे.
– रविन मायदेव थत्ते – rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस
कफविकार : विविध औषधे
आयुर्वेदीय औषधी महासागरात कफविकारावर शेकडो औषधांचे ग्रंथोक्त पाठ आहेत. शास्त्रकारांनी कफविकारांची संख्या वीसच सांगितली आहे. पण शरीरातील कफविकारांची व्याप्ती खूपच मोठी आहे. कफविकारांकरिता औषधी योजना करताना वय, भूक, जेवणखाण्याच्या वेळा, झोपण्याची वेळ, व्यवसाय, प्रवास, आवडीनिवडी व रुग्णांचे राहणीमान या सगळय़ांचा विचार करायला लागतो. शास्त्रकारांनी समस्त कफविकाराकरिता, बलवान व्यक्तींकरिता वमन किंवा उलटीचे औषध हा ठोस उपाय सांगितला आहे. पण तो सगळय़ांनाच शक्य व व्यवहार्य नाही. कृश व पांडुता असणाऱ्यांना उलटीचे औषध देऊ नये. सुंठ, मिरे, पिंपळी ही औषधे चूर्ण किंवा गोळय़ा स्वरूपात वापरली तर काही प्रमाणात कफविकारावर लगेच आराम मिळतो. त्याच्या जोडीला लवंग, दालचिनी मिसळल्यास लवकर गुण येतो. भुईरिंगणीचे पंचांग हे फुफ्फुसातील कफावरचे अप्रतिम औषध आहे. रिंगणीच्या बोंडाचे बी व वरील पाच सुगंधी द्रव्यांच्या मिश्रणापासून केलेल्या दमा गोळीमुळे कफविकारात लगेच छुटकारा मिळतो. सुंठ, पुष्करमूळ, गुळवेल व रिंगणीपंचांग यापासून तयार केलेला नागरादि कषाय, कफविकारावरचे टॉप औषध म्हणून प्रसिद्ध आहे. दालचिनी, वेलदोडा, पिंपळी, अस्सल वंशलोचन, पत्रीखडीसाखरयुक्त सितोपलादि चूर्ण जगप्रसिद्ध आहे. वेलची, तमालपत्र, दालचिनी पिंपळी, खडीसाखर, ज्येष्ठमध, खजूर, मनुका व मधयुक्त एलादि वटी कफ मोकळा करणे, आवाज सुधारणे, क्षय विकारांतील विविध कफसमस्या याकरिता तत्काळ गुण देतात. नाक खूप वाहणे, कंटाळवाणी सर्दी व कफविकार याकरिता कडूजिरे, ओली हळद किंवा आंबेहळद व कोरफडगरयुक्त रजन्यादि वटी लहानथोरांना मोठाच दिलासा देते. लवंग, मिरे, बेहडा, टाकणखारलाही, ज्येष्ठमध व डाळिंबसाल चूर्ण असे एकत्रित मिश्रण सोपे सुटसुटीत औषध आहे.  कोरफडीपासून बनविलेले कुमारी आसव, आडुळशापासून बनविलेला वासापाक किंवा खोकला काढा ही औषधे  योगदान देतात.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत        
१ फेब्रुवारी
१८९४ > अथर्ववेदाचे मराठी भाषांतर (१९७२), ऋ ग्वेदाचे मराठी भाषांतर (१९६९) यांसह संदर्भमूल्य असलेली अनेक मराठी पुस्तके लिहिणारे महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा जन्म. ज्ञानकोशकार (श्री. व्यं.) केतकरांच्या ज्ञानकोशाचे चित्राव हे सहसंपादक. प्राच्यविद्याप्रसार हे कार्य मानून त्यांनी भारताबद्दल मराठीखेरीज हिंदी व संस्कृतमध्येही लिखाण केले. अनेक ग्रंथांची इंग्रजी भाषांतरेही झाली. पातंजलीचे महाभाष्य आणि पाणिनीचे अष्टाध्याय व गणपाठ या ग्रंथांचे सटीक शब्दकोष चित्राव यांनी तयार केले. ‘चरित्रकोश’ तीन खंडांत (प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन) तयार करणाऱ्या चित्राव यांचे ‘प्राचीन भारतीय स्थलकोशा’चे कार्य मात्र निधनामुळेच (१९८४) थांबले. ‘संस्कृत पंडित’ म्हणून राष्ट्रपतींकडून गौरव, तसेच पद्मश्री असे मान त्यांना मिळाले.
१९९५ > नाटककार मो. ग. रांगणेकर यांचे निधन. आशीर्वाद (१९४१), कुलवधू (१९४२), भटाला दिली ओसरी (१९५६) आदी नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली व रंगभूमीवर आणली. मराठी बोलपटांमुळे रंगभूमीची पीछेहाट होऊ लागली असताना, रंगभूमीला ऊर्जितावस्था देण्याचे काम या ताज्या दमाच्या नाटकांनी केले.
– संजय वझरेकर

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fertility control order fco
Show comments