नैसर्गिक पद्धतीत खुड कोंबडी १० ते १२ पिल्लांची जोपासना करते. कृत्रिम पद्धतीत पिल्लांना ऊब कृत्रिम दाई(ब्रूडर) द्वारे दिली जाते. ही ब्रूडर पत्र्याची गोलाकार असून त्यामध्ये साधारणत: चार विद्युतबल्ब असतात. एका ब्रूडरखाली २५० ते ३०० पिल्लांना लागणारी ऊब निर्माण होते. हे ब्रूडर जमिनीपासून वर टांगतात. त्याखाली योग्य अंतरावर जमिनीवर पत्रा, जाड पुठ्ठा किंवा कार्डबोर्ड बसवतात. यास चिकगार्ड म्हणतात. चिकगार्डमुळे पिल्ले उष्णतेपासून दूर जात नाहीत व एकमेकांवर पडून गुदमरत नाहीत.
पिल्ले येण्यापूर्वी पिल्लाच्या घरांची (ब्रूडर हाऊस) तयारी करावी. घरे स्वच्छ धुवून र्निजतुकीकरण करावे. खाद्याची भांडी, पाण्याची भांडी, ब्रूडर व इतर उपकरणे बाहेर काढून, स्वच्छ धुवून त्यांचे र्निजतुकीकरण करावे. पिल्लांच्या घरातील भिंती, जमीन स्वच्छ धुवून त्यावर चुन्याची निवळी लावावी. जमीन कोरडी झाल्यास चार ते सहा इंच जाडीची गादी तयार करावी. त्यासाठी लाकडाचा भुस्सा, साळीचा भुस्सा, भुईमुगाचे टरफल इत्यादींचा वापर करावा.
पक्ष्यांची गादी नेहमी कोरडी राखावी. ओली झाल्यास त्यावर जंतू वाढतात. पक्षी रोगाला बळी पडतात. गादीवर वर्तमानपत्राचे कागद अंथरावे. यामुळे पिल्लांना गादीवर नीट चालता येते. त्यांच्या नाजूक पायांना जखमा होत नाहीत. पिल्ले लंगडी होत नाहीत. कागदावर खाद्याची व पाण्याची भांडी चाकाच्या आरीप्रमाणे रचना करून ठेवावीत. त्यामुळे पिल्लांना खाद्य, पाणी व ऊब सुलभरीत्या मिळते. सुरुवातीस कागदावर खाद्य द्यावे व नंतर खाद्याची भांडी ठेवावीत. आवश्यकतेनुसार वाढणाऱ्या पिल्लांना लागणारी अतिरिक्त जागा द्यावी. चिकगार्डचा उपयोग फक्त पहिल्या आठवडय़ात करावा.
पिल्ले जन्मल्यानंतर कृत्रिम दाईमध्ये पहिल्या आठवडय़ात ९५अंश फॅरेनहाइट तापमान (ऊब) लागते. त्यानंतर प्रत्येक आठवडय़ास तापमान पाच-पाच अंशाने कमी करावे. चार आठवडय़ांनंतर कृत्रिम उष्णता देणे बंद करावे. ब्रूडरमधील पिल्लांना प्रथम ग्लुकोज किंवा मीठ-साखरेचे पाणी पाजावे. त्यामुळे वाहतुकीतही ती जिवंत राहतात. तसेच ताणविरहाची औषधे उदा. व्हायमेरॉल, व्हेनलाईट दिल्यास ताण कमी होऊन मरतुक रोखता येते. पक्ष्यामधील विविध रोगांपासून रक्षणासाठी लसीकरणाचा कार्यक्रम राबवणे अत्यावश्यक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जे देखे रवी..  – निवृत्ती
माणसाला कर्मयोग शिकायचा असेल तर त्याने सरकारी किंवा महानगरपालिकेत नोकरी करावी. पगार तर मिळणारच असतो, पण आपण नोकरीदरम्यान जे करतो त्याचे काय फळ निर्माण होते ते जवळजवळ कधीच समजत नसल्यामुळे निष्काम कर्मयोगाचा गहन (!) परिचय होत राहतो. पहिल्या पहिल्यांदा आश्चर्य वाटते, खट्टू व्हायला होते. पुढे पुढे अंगवळणी पडते आणि मग निवृत्तीचा दिवस येऊन ठेपतो.
 माझ्या बाबतीत तर पगारही नव्हता. हजार रुपये मानधनावर मी ३० वर्षे दररोज निदान चार तास काम केले. माझा दिवस उजाडला १९९७ साली. अनेक विद्यार्थी आले गेले होते, पण माझ्या कार्यालयातल्या तीन व्यक्ती – सेक्रेटरी शुभा आणि दोन कर्मचारी मोरे आणि मनोहर हा दिवस यायच्या आसपास बेचैन दिसू लागले.
आमच्या रुग्णालयाचा अधिष्ठाता माझाच विद्यार्थी होता. तारीख आली तोवर काहीही पत्र आले नाही. शुभाला हे माहीत होते की मी निवृत्त झालो तर विभाग अनाथ होणार आहे.
नव्या नेमणुकीचा थांगपत्ता नव्हता. शस्त्रक्रिया इतरांनी सांभाळल्या असत्या, परंतु माझे प्राध्यापकपद लयाला गेल्यावर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असता.
मनोहर आणि शुभाची त्यावरून जुंपली. मनोहर म्हणाला, तू कशाला कोणाला काय बोलतेस? कामगार संघटनेचा स्पर्श झालेला हा म्हणाला, ‘आपल्या सरांची यांना कदर नाही. सर स्वत: संन्यासी. मरू देत शासनाला.’ शुभा गप्प बसली, परंतु अधिष्ठात्याला जाऊन भेटली.
तेव्हा दोन ओळीचे पत्र आले. तुमच्या निवृत्तीची तारीख आज आहे. (Super Annuation) उद्यापासून तुमचे पद संपेल. जवळजवळ ४० वर्षांच्या सहवासानंतर या कर्मत्यागाचा खासा अनुभव आला. खाली सही होती.
मी अधिष्ठात्याला जाऊन भेटलो. म्हणालो, ‘मी तर जातोच, पण विद्यार्थ्यांचे काय तेव्हा म्हणाले, ‘तुम्हाला एक वर्ष आणखी देतो.’ उपकार उपकार म्हणतात ते हेच! ‘तुम्ही तयार आहात का?’ हा प्रश्नही विचारण्यात आला नाही.
अशा तऱ्हेने माझा कर्मयोग एक वर्षांने वाढला. विद्यार्थ्यांमध्ये कुजबूज सुरू होती की आपल्या इतक्या वर्षांचा मास्तर आता करणार तरी काय?
पण मी बिलंदर बाप होतो. या रुग्णालयाला ४० वर्षांच्या सहवासानंतर मी इतक्या सहजासहजी सोडणार नव्हतोच. पुढची मोहीम म्या तथाकथित ‘योगी तोची संन्यासी’ या न्यायाने कधीच आखली होती.
 ती दारुण हसवणूक उद्यापासून.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – भयगंड : फोबिया
एक पालक दाम्पत्य आपल्या एकुलत्या एक ‘प्रिन्सला’ माझ्याकडे घेऊन आले. वडील बारीक, आई मजबूत स्थूल, उंच. औषध कोणाला? तुम्हाला का? असे वडिलांना मी विचारले. दोघांनी मुलाकडे बोट केले. मुलगा, उंची ५’.१०’’, वजन ७२ किलो. ‘मुलगा खूप घाबरतो, एकटा शाळेत जायलासुद्धा भितो. आता पुढच्यावर्षी कॉलेजमध्ये एकटा मी जाणार नाही. असे आत्तापासूनच सांगत असतो.’ रात्री झोपताना जवळ आई लागते. मित्रमंडळीत मिसळण्याऐवजी त्यांना टाळतो. मनाने निर्मळ, अभ्यासात हुशार, शाळेमध्ये नेहमी पहिल्या पाचात क्रमांक पटकविणारा पण कसल्यातरी अनामिक भीतीने पछाडलेला, वाडीतल्या, गल्लीतल्या मुलांच्यात खेळायलाही तयार होईना. दूरदर्शनवर वेगवेगळ्या खेळांच्या मालिका बघण्याची मोठी हौस! विशेषत: फुटबॉल, बॉक्सिंग, फाईटिंग अशा सिरीयल बघतो. अशी माहिती पालकांनी दिली. माझे उपचार सुचविण्याचे काम सोपे झाले. माझे रुग्ण पाहण्याचे नेहमीचे दिवस सोडून एक दिवस मुलाला विश्वासात घेऊन तपासले. त्याची लिंग, अंडाची वाढ अपुरी लक्षात आली. खूप खोलात न जाता, त्याचा स्वत:चा आत्मविश्वास वाढावा म्हणून, लहानपणी मी ऐकलेल्या एका लोकप्रिय गाण्याच्या ओळी सांगितल्या. ‘मन शुद्ध तुझे, गोष्ट आहे पृथवी मोलाची! तू चाल पुढे, तुलारं गडय़ा भीती कुणाची’ त्याच्या लिंगसमस्येची चिंता लवकरात लवकर दूर करण्याचे आश्वासन दिले. शास्त्रकारांचा सांगावा असा आहे की, उंच धिप्पाड शरीरबांध्यापेक्षा ओज, शुक्र, वीर्य हे नेहमी कोणत्याही कामाकरिता आत्मविश्वास देत असते.
सुवर्णमाक्षिकादि, चंद्रप्रभा, शृंग, पुष्टीवटी, आम्लपित्तवटी प्र. ३ दोनवेळा, आस्कंदचूर्ण रात्री १ चमचा, भोजनोत्तर अश्वगंधारिष्ट अशी औषधयोजना. सायंकाळी लवकर, कमी जेवण; त्यानंतर अर्धा तास फिरून येणे. सकाळी पुरेसा व्यायाम, अशा चिकित्सेने दीड महिन्यातच ‘फोबिया’ केव्हा गेला हे त्याचे त्यालाच कळले नाही. ‘भित्यापोटी ब्रह्मराक्षसावर’ हमखास उतारा ओजवर्धन!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – २९ ऑगस्ट
१८८० > ‘लोकनायक’ म्हणून सामाजिक कार्यासाठी अधिक परिचित असलेले माधव श्रीहरी अणे (बापूजी अणे) यांचा जन्म. साहित्य, तत्त्वज्ञान, इतिहास या विषयांच्या गाढ अभ्यासातून त्यांनी केलेले लिखाण विपुल, पण विखुरलेले आहे. त्यांच्या निवडक लेखांचे ‘अक्षरमाधव’ हे पुस्तक निघाले, तर ‘श्रीतिलकयशोर्णव’ या बापूजींनी रचलेल्या संस्कृत काव्यास साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता.
१८९९ > ‘हिंदूपंच’ या अफलातून व्यंग्य साप्ताहिकाचे एक संपादक व लोकहितवादींचे लेखनिक म्हणून काम केलेले वामन बाळकृष्ण रानडे यांचे अवघ्या ४५व्या वर्षी निधन. चटकदार विनोदी लेखनाखेरीज अभ्यासू चरित्रकथनवजा लिखाणही त्यांनी केले, ते ‘थोर पुरुषांची लहान चरित्रे’ म्हणून पुस्तकरूप झाले. अखेपर्यंत ते वृत्तपत्रांत कार्यरत होते.
१९०६ > ‘यमुनापर्यटन’ ही मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी लिहिणारे बाबा पद्मजी मुळे ऊर्फ बाबा पद्मनजी यांचे निधन. ‘स्त्रीविद्याभ्यास’, ‘व्यभिचारनिषेधक बोध’, ‘कुटुंबसुधारणा’,  ‘महाराष्ट्रदेशाचा संक्षिप्त इतिहास’  ‘कृष्ण आणि ख्रिस्त यांची तुलना’, ‘नव्या करारावर टीका’ असे ग्रंथ लिहिणारे पद्मनजी मराठी-ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक  होत.
– संजय वझरेकर

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hen puppy cultivation