महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील बऱ्याचशा भागात पाऊस अनिश्चित असल्याने तेथे जो काही पाऊस पडेल त्याचे पाणी जमिनीतच मुरू द्यावयाचे आणि पावसाळा सरता सरता सप्टेंबर महिन्यात आपल्या शेतात ज्वारी पेरावयाची अशी पद्धती अवलंबली जाते.  पावसाळ्यानंतर कोरडय़ा ऋतूत तयार होत असल्याने या ज्वारीचे दाणे चमकदार आणि डागविरहित असतात आणि तिला चांगला भाव मिळतो. चार महिने मुदतीच्या या पिकाला साधारणत ७०० मिलिमीटर पाणी लागते. महाराष्ट्राच्या काळ्या जमिनीत एक मीटर मातीच्या थरात सुमारे २५० ते ३०० मिलिमीटर पाणी साठविण्याची क्षमता  असते. त्यामुळे कोरडवाहू रब्बी ज्वारी पीक चांगले येण्यासाठी अगोदरच्या पावसाळ्यात ७०० ते ८०० मि.मी. पाऊस आणि आपल्या शेतात किमान अडीच मीटर खोल माती असेल तरच या पिकाला कणसे येऊन त्यात दाणे भरतात, नाहीतर कणसे येण्यापूर्वीच ते वाळून जाते आणि त्यापासून केवळ कडबा मिळतो. प्रस्तुत लेखकाने या परिस्थितीवर सुचवलेला उपाय होता ज्वारीच्या दोन ओळींमधील अंतर वाढविण्याचा. शेतकऱ्यांच्या शेतातल्या ज्वारी पिकात दोन ओळींमधील अंतर साधारणत ५० सेंटिमीटर असते आणि एका ओळीतल्या दोन रोपांमधले अंतर असते १५ सेंटिमीटर. माझ्या प्रायोगिक लागवडीत मी दोन ओळींमधले अंतर ठेवले होते १५० से.मी. या उपायामुळे या पिकातल्या रोपांची संख्या ६६ टक्क्यांनी कमी झाली. जमिनीतून पाणी काढून घेणाऱ्या घटकांची संख्या कमी झाल्यामुळे जमिनीत साठविलेले पाणी या पिकाला शेवटपर्यंत पुरले आणि या शेतातून हेक्टरी २५०० किलो एवढे धान्याचे उत्पन्न मिळाले. आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांना त्यांच्या ज्वारी पिकातून केवळ कडबाच मिळाला.
कणसांची खुडणी झाल्यावर आम्ही या पिकाच्या दोन ओळींमधली माती उकरून पाहिली असता आम्हाला असे आढळले, की हा मातीचा पट्टा दोन्ही बाजूंच्या ज्वारीच्या ओळींमधून आलेल्या मुळांनी व्यापून टाकलेला होता. म्हणजे दोन ओळींमधल्या १५० सेंटिमीटर पट्टय़ात साठवलेले पाणीही या पिकाने वापरले होते.                    
–  डॉ. आनंद कर्वे (पुणे)   
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजचे महाराष्ट्रसारस्वत        ३१ जानेवारी
१८९६ > कन्नड काव्यातील कर्तृत्वासाठी ‘ज्ञानपीठ’ मिळवणारे कवी दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांचा जन्म. मराठीत त्यांनी लिहिलेले ‘विठ्ठल संप्रदाय’ (१९६५) आणि ‘संतमहंतांचा पूर्ण शंभू विठ्ठल’ (१९८०) हे ग्रंथ पुढील संशोधकांना मार्गदर्शक ठरले, तर ‘संवाद’ (१९६५) या त्यांच्या मराठी गद्य-पद्य संग्रहाला न. चिं. केळकर ग्रंथ पुरस्कार मिळाला होता. ‘महाराष्ट्र तत्त्वचतुष्टय़ी’ (१९५९) या ग्रंथासह नऊ तत्त्वग्रंथ, एक एकांकिका संग्रह, १२ हून अधिक काव्यसंग्रह अशी कामगिरी मराठी मातृभाषा असलेल्या या कवीने अन्य भाषांत केली.
१९१९ > आदिवासींच्या पिळवणुकीवर ‘सावलीच्या उन्हात’ तसेच ‘चितेच्या प्रकाशात’ ही दीर्घकाव्ये लिहिणारे श्रीराम हरी अत्तरदे यांचा जन्म.
१९३१ > ‘संधिकाली या अशा.. ’, ‘पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे..’ , ‘कंठातच रुतल्या ताना..’ , ‘वाटे भल्या पहाटे..’ , ‘रसिका तुझ्याचसाठी..’ अशी उत्तमोत्तम गीते रचणारे कवी, कादंबरीकार, बालसाहित्यकार गंगाधर मनोहर महांबरे यांचा जन्म. मालवणच्या या सुपुत्राने एल्फिन्स्टन कॉलेजात ग्रंथपाल म्हणून कारकीर्द सुरू केली आणि पुढे काही मासिकांचे ते संपादक झाले. तब्बल १०० लहानमोठी पुस्तके त्यांनी लिहिली.
– संजय वझरेकर

वॉर अँड पीस : कफविकार : पथ्यापथ्य
कफ हा शरीराला बल देणारा आवश्यक भाग आहे. तुमची- आमची काम करण्याची ताकद, शरीरातील प्राकृत कफावर अवलंबून आहे. त्याची जेव्हा फाजील वाढ होते, त्या वेळी कफविकार होतो. शरीराला ताकद, स्थैर्य, वजन देणाऱ्या अवयवांची वा धातूंची निर्मिती कफापासून होत असते. रस, मांस, मेद, मज्जा आणि शुक्र तसेच मल व मूत्र या मलाची निर्मिती कफापासून आहे. जेव्हा कफाची विकृत वाढ होते किंवा त्यांचे कार्य बिघडते, कमीअधिक होते तेव्हा रसादि पाच धातू व दोन मल यांचे शरीरातील कार्यात कुठेतरी बिघाड होतो. याप्रमाणेच या धातूंचे व मलाच्या कार्यात बिघाड झाला. कफाचे कामात बिघाड होऊन कोणत्यातरी प्रकारचा कफविकार संभवतो.
स्निग्ध शीत, जड, मंद, ओलावा, मृदू, स्थैर्य हे ‘कफा’चे गुण आहेत. यांच्यातील कोणतेही गुण वाढले की कफविकार होतात. सर्दी, पडसे, कफाचे बेडके असणारा खोकला, स्थूलपणा, रक्तदाबवृद्धी, मधुमेह, टॉन्सिल्सची फाजील वाढ, गालगुंड, गंडमाळा, कान वाहणे, आमवात, क्षय हे सर्व कफ वाढल्यामुळे उत्पन्न होणारे विकार आहेत. कफाचा सामना करताना त्याची बिलकुल गय करू नये. कफ जरासा वाढला तरी शत्रू समजून त्याचा लगेच नायनाट करावा. त्याला संधी मिळाली की तो वाढतो व आटोक्याबाहेर रोग जातो. कफाचे प्रमुख स्थान छाती-फुफ्फुस आहे. तिथे फाजील कफ वाढला की श्वासोच्छ्वासाला त्रास होतो व त्यामुळे सर्दी, पडसे, खोकला, दमा, क्षय या विकारांचा तुम्हा-आम्हाला सामना करायला लागतो. कफविकार आनुवंशिकही आहे. फाजील कफामुळे वजनही वाढते.
 रोजच्या जेवणात पुदिना, आले, लसूण, ओली हळद अशी चटणी, सकाळ-संध्याकाळ तुळशीची दहा पाने चावून खावी. मीठ, हळद, गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. सायंकाळी लवकर व कमी जेवावे. परान्न टाळावे. गरम गरम सुंठयुक्त पाणी प्यावे. दीर्घ श्वसन व प्राणायाम नित्य करावा हे मी सांगावयास नकोच.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी.. स्वभाव
स्वभावाला औषध नाही असे म्हणतात, परंतु औषधालाही स्वभाव असतो हे तत्त्व कपिल मुनींनीच प्रथम सांगितले, म्हणूनच माणसाचा स्वभाव (प्रकृती) ओळखून त्याला त्याप्रमाणे औषध द्यावे असे.
आयुर्वेदाने सांगितले. नाहीतर ‘अहो त्यांनी दिलेल्या औषधाने भलतीच ‘Reaction आली’ असे होते. हे कपिल मुनी आकडय़ात बोलत. सुखदु:ख द्वेष ही त्रिसूत्री. तसेच एकंदरच कोठल्याही माणसात किती भाग आहेत तर छत्तीस असे त्यांनी लिहून ठेवले. म्हणूनच लग्न करताना जोडप्याचे किती गुण किंवा भाग जमतात असे बघण्याची पद्धत होती. ‘अहो छत्तीस गुण जमले आता वाट कसली बघता उडवा बार’ असे वाक्य ऐकल्याचे आठवते.  हल्ली सगळेच फार smart वधारे आणि ज्यादा झाले असल्यामुळे छत्तीस गुण जमत असून छत्तीसचा आकडा असे प्रकार घडत आहेत. कपिल मुनींनी प्रत्येक गोष्टीला गुण दिले.  माणसालाही दिले. कपिल मुनी मोठे काटकसरी होते तेव्हा इतकी विविधता दिसत असूनही त्यांनी मोठी कौशल्यपूर्ण काटछाट आणि भागाकार करत परत एक त्रिसूत्रीच तयार केली. प्रत्येक माणूस रज, तम आणि सत्त्व अशा तीनच स्वभावांनी मढलेला असतो असे निदान केले. आपला मेंदू आणि आपल्यातले स्वयंचलित मज्जातंतू आणि रसायने यांना या तीन गुणांची पाश्र्वभूमी असते. नाटकात मागे पडदा असतो त्याच्या समोर पात्रे नाटक वठवतात. हा पडदा म्हणजे आपल्यातले गुण आणि आपले वागणे म्हणजे हे नाटक. आपल्याकडे माणसाला तमोगुणी म्हटले की तो व्यसनी असावा असे चित्र निर्माण होते ते चुकीचे आहे. तमोगुणाचा द्योतक आळस आहे. काहीच करायचे नाही म्हणून पडून राहावयाचे शक्यतोवर काम टाळायचे आणि कोठल्याही बाबतीत यात काय त्यात काय असे टाकून बोलायचे म्हणजे तमोगुण. याच्या उलट कणभरही उसंत नाही, सारखी धावपळ, हे कर ते कर, हे बांध ते बांध, ही योजना कर ती दुसरी योजना यशस्वी कशी होईल, ते बघ एवढेच नव्हे तर मी स्वर्गात जाणार तेव्हा तिथल्या घराचा आराखडा तयार कर इथपर्यंत मजल जाते. आता राहिला सत्त्व गुण. हा शांतपणे बघत असतो. हा आळशी नसतो पण अचाटही नसतो. नुसताच बघत नाही तर आपली मर्यादा ओळखून कामाची आखणी करतो. याच्या कामात स्वार्थ कमी असतो आणि समाजाची जाण जास्त असते. हा स्वर्ग मिळवण्याच्या मागे नसतो. स्वर्ग ही परीकल्पना आहे हे त्याला उमजते. आणि जर स्वर्ग असेल तर तो इथेच अनुभवता येईल असे उमगून असतो. मूलत: शांत असल्यामुळे त्याला जग पारखायला वेळ मिळतो आणि म्हणून तो साक्षीभावाने बघत असताना या जगाच्या मागे निखळ चैतन्य आहे ते अनुभवले पाहिजे अशा विचारापर्यंत पोहोचतो.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How good crop will come of dryland rabbi jwari
Show comments