बंडखोर, स्वातंत्र्यसनिकांनी बादशाह बहादूरशाह जाफरला भारताचा सम्राट घोषित केले आणि बरेलीहून आलेल्या जनरल बख्त खानांना गव्हर्नर जनरल नेमले, त्यांनी दिल्लीची प्रशासकीय जबाबदारी घेतली. त्या काळात तिथे अनागोंदी माजलेली होती, प्रथम त्यांनी अवाजवी कर रद्द करून कर वसुलीची यंत्रणा चोख केली. यापूर्वी बादशाहाचा मुलगा खिजर आणि त्याचे सहकारी यांच्याकडे करवसुली करून सरकारी खजिन्यात ती जमा करण्याची जबाबदारी होती. प्रत्यक्षात हे लोक करवसुली करून त्यातला निम्याहून अधिक हिस्सा स्वत:च्या खिशात टाकीत असत. बख्त खानांच्या कारवाईमुळे कराची रक्कम दुपटीने वाढून सनिकांच्या वेतनाची व्यवस्था नियमित झाली. व्यापाऱ्यांना लुटण्याचे प्रकार त्या काळात राजरोस चालत. बख्त खानांनी त्यांना शस्त्रे बाळगण्याची मुभा देऊन शस्त्रे पुरवली, लुटारू पकडला गेल्यास त्याला हात तोडण्याची शिक्षा जाहीर करून लुटारूंवर जरब बसवली. बख्त खान कंपनी सरकारच्या फौजेत असताना त्यांचे सहकारी घोसखान आणि सिधारी सिंग हेही दिल्लीच्या बादशाहाच्या लष्करात सामील झाले. बख्तना अत्युच्च पदावर नेमल्यामुळे ते दोघे बख्तचा मत्सर करीत होते. ते दोघे बादशहाचे दोन असंतुष्ट पुत्र मिर्झा मुघल आणि खिजरला मिळून बख्तचे पाय कसे खेचता येईल याचे कारस्थान करायला लागले. दिल्लीत ब्रिटिशांनी आपले गुप्तहेरही पेरून ठेवले होते. जुलैअखेरीस बख्त खानांनी दिल्ली बाहेरच्या ब्रिटिशांच्या लष्करी छावण्यांवर हल्ले सुरू केले. बख्तनी आपल्या सनिकांना ब्रिटिशांच्याच गणवेशात त्यांच्यावर पाठवून त्यांची रसद घेऊन जाणारी ३०० घोडदळाची तुकडी गारद केली आणि ब्रिटिशांचे अनेक हल्ले परतावून लावले. १४ सप्टेंबर रोजी ब्रिटिशांनी काश्मिरी गेटजवळ बादशाहाच्या सन्यावर जोरदार हल्ला केला, बख्तनी बादशाहाला दिल्ली बाहेर जाण्याचा सल्ला दिला. पण वृद्ध बादशाहाने तो न मानल्याने २०सप्टेंबर १८५७ रोजी तो पकडला जाऊन ब्रिटिशांनी त्याला रंगून येथे पाठवून हद्दपार केले.
जनरल बख्त खान नाइलाजाने दिल्ली सोडून ते लखनौ, शाहजहानपूर येथील बंडखोर स्वातंत्र्यसनिकात सामील झाले. पुढे ते, स्वात येथे १८५८ साली मृत्यू होईपर्यंत अज्ञातवासात राहिले. दिल्लीतील लाल किल्ल्यातील वस्तुसंग्रहालयात बख्त खानांचा पुतळा उभारलेला आहे.
sunitpotnis@rediffmail.com