महाराष्ट्रातील ८२% जमीन कोरडवाहू म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.
वार्षकि सरासरी पाऊस हा त्या त्या ठिकाणी घेण्यात येणाऱ्या खरीप पिकास पुरेसा असतो. परंतु पाऊस अनियमितपणे पडत असल्याकारणाने पिकास पाण्याची गरज असेल त्यावेळी तो पडेलच असे नाही. यामुळे शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होतो.
शाश्वत शेतीसाठी शाश्वत पाण्याची गरज आहे. जर आपण पहिल्या पावसाचे पाणी खाचरामधील किंवा शेतजमिनीच्या दहाव्या भागात खड्डा करून साठवून ठेवले तर ते पाणी उरलेल्या ९०% पिकास देण्यासाठी वापरता येईल. याप्रमाणे संपूर्ण पावसाळ्यात पाण्याची उपलब्धता असेल. म्हणजे ज्यावेळेस पिकाला पाणी देण्याची गरज असेल त्या वेळेस शेतातच पाणी साठविलेले असेल. मग शेतकरी यावर शाश्वत पीक घेऊ शकेल.
अशा प्रकारची पाण्याची साठवण ईशान्य भारतात करतात. त्यास ऑन फार्म रिझव्‍‌र्हायर असे म्हणतात.
रब्बी पिकास पाणी कमी लागते. हे पीक जमिनीतील पावसाच्या पाण्याचा ओलावा, हिवाळ्यात पडणारे दवाचे पाणी यावर अवलंबून असते. जर शेवटचा पाऊस हा शेतातच साठवलेला असेल तर ते साठवलेले पाणी रब्बी पीकास उपयुक्त ठरेल.
जमिनीच्या दहाव्या भागात किती पाणी साठवायचे ते त्या त्या ठिकाणी पडणाऱ्या पावसावर व पिकावर अवलंबून राहील.
ज्या जमिनीमधून पाणी जिरून जात असेल त्या ठिकाणी प्लास्टिक अंथरल्यास दहाव्या भागात पाणी साठवले जाईल.
शेतजमिनीचा उतार व शेतातील ओघळी यांचा विचार करता समतल बांधाला समांतर किंवा उताराला आडवी पेरणी व मशागत केल्यास पाण्याचा अपधाव कमी होतो व मातीची धूप कमी होते. या प्रकारे पावसाच्या पाण्याची कार्यक्षमता वाढते व पिकाच्या वाढीस मदत होते.
चेक डॅम किंवा मातीचा बांध घालून वाया जाणारे पाणी अडवून त्यामधून समतल चराने किंवा समतल पाइपने शेतीला पाणी दिल्यास पिकाच्या वाढीस मदत होते.
तसेच प्रवाही सिंचनाने किंवा पावसाचे पाणी शेततळ्यामध्ये साठवून तुषार सिंचनाने पिकांना पाणी दिल्यास पाण्याची कार्यक्षमता वाढते व नेहमीपेक्षा पाणी कमी लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे देखे रवी..      
गुणांची करामत
आळस, अतिक्रियाशीलता आणि शांतपणा एकाच शरीरात जोपासले जातात यावर खरे तर विश्वास बसणे कठीण; पण निसर्गात पूरकत्व किंवा हातात हात घालून चालणे याला फार महत्त्व असते म्हणूनच हजारो-कोटय़वधी वर्षांत निसर्गाचा समतोल बिघडला नव्हता. माणूस जन्माला आला माकडापासून, पण आपल्या बुद्धीच्या जोरावर त्याने ज्या मर्कटचेष्टा आरंभल्या आहेत आणि लोभीपणा इतका वाढला आहे की, दहा दशलक्ष वर्षे आनंदात बागडणारा निसर्ग गेल्या दोनशे वर्षांत घायकुतीला आला आहे.
जे निसर्गाचे झाले त्याचीच प्रतिकृती माणसाच्या आयुष्यात घडते आहे. तमगुणांचे लक्षण आळस असले तरी झोप हेही या आळसाचेच रूप असते. ही झोप लागते म्हणून माणूस ताजातवाना होतो, तसेच रजोगुणाचे आहे. हालचाल केल्याशिवाय कोणाचे चालणार आहे, पण नुसतीच हालचाल करीत बसले आणि त्याचा अतिरेक झाला तर शीण होतो. हा शीण फार झाला तर झोप बिघडते आणि ताजेतवाने न उठता मरगळलेला माणूस जागा होतो. रात्रीचा अंधार हा तमोगुणाला पोषक असतो म्हणूनच रात्री झोपतात आणि दिवसा सर्वत्र ऊर्जेचा संचार वाढतो म्हणून रजोगुणाच्या आधारे काम करतात. हल्ली पहाटे तीन वाजता झोपायची आणि सकाळी दहा उठायची फॅशन आहे. पार्टीच मुळी रात्री बाराला सुरू होते मग झोपणार तरी कधी. विश्रांतीच्या वेळेला मनाला चैतन्य देण्यासाठी दारू पिऊन कृत्रिमरीत्या उत्तेजित होणे यामध्ये शरीरातल्या सगळ्या संस्थांची वाट लागते. असल्या पाटर्य़ामधून हल्ली पोरी पुरुषांना चितपट करीत त्यांच्या दीडपट पितात असे इंग्लंडमधला एक अहवाल सांगतो. बरे कोणी मर्यादेत वागले तर त्याला वाळीत टाकल्यासारखे करतात. आधीच गुणांची नीट वाटणी करून जगणे अवघड. त्यात हा सावळा गोंधळ.
अशा स्थितीत तम आणि रज गुण बिघडलेले असताना सत्वगुणाला धरून सारासार विचार करायला वेळच कोठे उरतो. लोभीपणा करीत ऊर फाटेपर्यंत ते पर्यंत काम करायचे त्यात आलेल्या तणावामुळे व्यसन करायचे कामाच्या पाटय़ा टाकून झाल्या की, रात्री पाटर्य़ा करायच्या आणि असल्या धांगडधिंग्याने लोकांना त्रास झाला आणि धाडी पडल्या की, आमच्या स्वातंत्र्यावर गदा आली असे म्हणायचे म्हणजे समाज श्रीमंत होत असला तरी रसातळालाही जात आहे, याची ही नांदी आहे.
रविन मायदेव थत्ते 
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस                                                       
कानाचे विकार
आयुर्वेदाच्या पांचभौतिक सिद्धान्ताची खरी परीक्षा कानाचे विकार बरे करताना आम्हाला घेता आली. आपले नाणे खणखणीत आहे, याची खात्री नाणे बाळगणाऱ्याला आवश्यक असते. कान हे पोकळीचे, आकाश महाभूतांचे आश्रयस्थान आहे. पृथ्वी, आप या तत्त्वांची फाजील वाढ कानाच्या यंत्रणेत झाली की कानाचे विकार होतात. त्या फाजील वाढीच्या विरुद्ध गुणांची द्रव्ये वापरली असता कान वाहणे, कानाला सूज येणे, कमी ऐकू येणे हे विकार सोप्या साध्या उपायांनी बरे होतात. आजपर्यंत शेकडो रुग्णांचे कान, त्यांच्या कानाची प्रत्यक्ष तपासणी न करता पण विकाराचा इतिहास व पांचभौतिक लक्षणे ऐकून यशस्वीपणे उपचार केले आहेत. आणखी वैशिष्टय़ म्हणजे ९९ टक्के रुग्णांना कानात टाकावयास कोणतेही औषध दिलेले नाही.
दिवसेंदिवस कान वाहणे, कमी ऐकू येणे व कानातून रातकिडय़ांसारखा किऽर्रऽऽ असा आवाज येणे असे रुग्ण, वाढत्या संख्येने चिकित्सकांकडे येत असतात. दिवसेंदिवस हवेतील प्रदूषण वाढत आहे. जीवनशैली बदलत आहे. बाहेरची जेवणे, चमचमीत खाणे-पिणे, रात्री उशिरा जेवणे, रात्रपाळी, घरातील, ऑफिसात  ‘एसी’, हेडफोनचा अनावश्यक वापर, जोरात बोलणे अशी अनेक कारणे कानाचे स्वास्थ्य बिघडवतात. वरील तीन विकारांमध्ये बहुधा कानांच्या हाडांना सूज येणे, त्या भागांना पुरेसा रक्तपुरवठा न होणे व शरीरात एकूण रक्ताचा पुरवठा कमी असणे असे संभवते. त्याकरिता रोजच्या जेवणात पुदिना, आले, लसूण, ओली हळद, मिरेपूड, तुळशीची पाने असे पदार्थ असावेत. कानात सतत कापूस ठेवावा. गार हवेपासून, वाऱ्यापासून बचावाकरिता मफलर वापरावा. मीठ, हळद, गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. कानात कसलेही तेल टाकू नये. तो गुन्हा-पाप आहे असे समजावे. आरोग्यवर्धिनी, लाक्षादि, त्रिफळा गुग्गुळ, पुनर्नवा मंडूर, शिलाजीत वटी व लघुसूतशेखर या गोळय़ा प्रत्येकी तीन, दोन वेळा, आठवणीने सुंठचूर्णाबरोबर घ्याव्यात
 वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत        
२ फेब्रुवारी
१८८४ > महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे (२३ खंडांचा पहिला  मराठी एन्सायक्लोपीडिया) निर्माते श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म. केतकरांनी साहित्यातून सुधारणावादी विचार  ‘ब्राह्मणकन्या’, ‘गावसासू’ ही पुस्तके, विचक्षणा, भटक्या या कादंबऱ्या, तसेच  ‘भारतीय समाजशास्त्रे’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला.
१९३० > बालभागवत, बालरामायण,  महाराष्ट्राचा बालबोध इतिहास अशी पुस्तके लिहून बालसाहित्यात महत्त्वाची भर घालणारे वासुदेव गोविंद आपटे यांचे निधन. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्वर्यू व ‘ज्ञानप्रकाश’चे संपादक अशीही त्यांची ओळख आहे.
१९४३ > लघुचरितांचे लेखक विष्णु पांडुरंग नेने यांचे निधन
१९५७ > कवयित्री, कथालेखिका, संशोधक, समीक्षक अरुणा रामचंद्र ढेरे यांचा जन्म. ‘प्रारंभ’, ‘मंत्राक्षर’ हे काव्यसंग्रह,  ‘अज्ञात झऱ्यावर’, ‘कृष्णकिनारा’ हे कथा संग्रह ‘रूपोत्सव’ (ललितलेख) आणि ‘मैत्रेयी’ ही कादंबरी अशी त्यांची पुस्तके.
१९८४ > इतिहास संशोधक विश्वेश्वर अंबादास कानोते यांचे निधन.
१९८७ > कथा-कादंबरीकार आणि ललित निबंध लेखक डॉ. अनंत वामन वर्टी यांचे निधन.
– संजय वझरेकर

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet number magic
Show comments