महानगरपालिका प्रत्येक नागरिकाने कचऱ्याचे वर्गीकरण करून तो वेगवेगळ्या बॅगात भरून महानगरपालिकेला द्यावा असा सल्ला देतात. जर ओला कचरा, फ्लॅस्टिक, काच, कागद असा वेगवेगळा कचरा ४-५ बॅगात ठेवून तो महानगरपालिकेला द्यायचे ठरवले तर या देशाच्या १२० कोटी लोकांकडून रोज ५०० कोटी बॅगा जमा होतील. त्याचे काय करायचे? म्हणजे ‘भीक नको, पण कुत्रा आवर’ अशी पाळी महानगरपालिकेवर येऊन पडेल. महानगरपालिका एकवेळ कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावेल पण रोज जमा होणाऱ्या या ५०० कोटी बॅगांचे काय करणार? हा झाला घरगुती कचरा. याशिवाय रुग्णालयांचा कचरा, कारखान्यांचा कचरा, शेतातला कचरा असा नाना प्रकारचा कचरा समाजात जमा होत राहतो. पत्र्याच्या डब्यातले थंड पेय प्यायल्यावर रिकामा होणारा डबा, औषधाची गोळी घेतल्यावर निकामी झालेली अल्युमिनियमची फॉइल, एकदा इंजेक्शन दिलेली सििरज, बॅटरीत वापरून झालेला सेल, संगणकाची हार्ड डिस्क, टीव्ही-रेफ्रिजरेटर विकत घेऊन तो घरी आणून बसवल्यावर त्याची पॅकिंग या सगळयांचे काय करणार? कचरा घन, द्रव व वायू अशा तीन प्रकारांतील असतो. मग त्याशिवाय घरातील, कारखान्यातील, ई-वेस्ट असे त्याचे आणखीन नाना प्रकार होतात. कचऱ्याची नीट विल्हेवाट लावली नाही तर तो भस्मासुर बनून त्याचा आरोग्याला मोठा उपद्रव निर्माण होतो. कचऱ्याच्या वर्गीकरणात घरातील ओला कचरा जर शेतावर, बागेत वापरला तर तो खत म्हणून उपयोगी पडतो. सोसायटीमध्येही त्यावर प्रक्रिया करून गांडूळ खत बनवता येते. बाकीचा कचरा म्हणजे रबर, प्लॅस्टिक, काच, कागद, कापड या गोष्टी कुजणाऱ्या नाहीत, शिवाय त्याचे पुनर्चक्रीकरण करता येत असल्याने त्या वाया जाणाऱ्या गोष्टी नाहीत. एकदा वापरलेले वंगण तेल पूर्वी फेकून देत, पण नंतर ते रिसायकल करून परत वापरता येऊ लागले. भविष्यात कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण हा मोठा उद्योग होणार आहे. फक्त वर्गीकरण केलेला कचरा प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये न साठवता वेगवेगळ्या बादल्यात ठेवला तर प्लॅस्टिकच्या बॅगांचे काय करणार हा प्रश्न उद्भवणार नाही.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी ,
मुंबई २२  
office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneetkutuhal finace from garbage
Show comments