आजच्या गुजरात राज्यातील चौथ्या क्रमांकाचे शहर राजकोट, हे ब्रिटिशराजच्या काळात महत्त्वाचे संस्थान होते. जामनगरचे राजे सताजी जडेजा यांचा नातू विभोजी याने १६२० साली हे राज्य स्थापन केले. या प्रदेशात पूर्वी प्रथम महमूद गझनवीचे आणि नंतर महमूद बेगडा याचे राज्य होते. जामनगरच्या फौजेचे मोगलांशी १५९० साली युद्ध झाले, त्यात विभोजीचे वडील मारले जाऊन विभोजीला कैद करून दिल्लीस नेण्यात आले. कैदेतून सुटका झाल्यावर विभोजी हा बादशाह शाहजहानच्या फौजेत भरती झाला. मोगल सन्यात उत्तम कामगिरी केल्यामुळे विभोजीला कलवाड, अरडोई वगरे बारा गावे इनाम मिळाली. विभोजीने आपला सहकारी राजू सांधी याच्या मदतीने या इनाम प्रदेशात नवे राज्य स्थापन केले, पण त्याच वेळी राजूचा मृत्यू झाला व त्याच्या नावाने विभोजीने आपल्या राज्याची राजधानी राजकोट वसविली. विभोजी यांची कारकीर्द सन १६२० ते १६३५ अशी झाली.
पुढे विभोजी यांचा मुलगा मेहरामनजी (प्रथम)ला मोगलांनी गुजरातची सुभेदारी देऊन काही प्रदेशाची जहागिरी दिली. १७२० साली जुनागढचा नवाब मासूम खानने आक्रमण करून राजकोट घेतले व त्याचे नाव बदलून ‘मासुमाबाद’ केले. मासूम खानाने मजबूत आणि प्रचंड मोठा किल्ला बांधून बारा वष्रे राज्य केल्यावर ठाकूरजी रणमाळजी जडेजाने १७३२ साली त्या राज्यावर परत अंमल बसवून राज्याचे व राजधानीचे नाव पूर्ववत ‘राजकोट’ असे केले. १७४६ साली गादीवर आलेल्या लाखाजी रणमाळजीच्या कारकीर्दीत जडेजा घराण्यातल्या लोकांमध्ये सतत संघर्ष होत राहिला व अखेरीस ठाकूर रणमाळजी (द्वितीय)ने १८०७ साली कंपनी सरकारशी ‘संरक्षण करार’ करून त्यांची तनाती फौज राखली.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुतूहल – खेचण साचा (ड्रॉ फ्रेम)
विपिंजण यंत्रामधून जो पेळू तयार होतो त्यामध्ये अनेक दोष अथवा त्रुटी असतात. त्यामुळे अशा पेळूपासून थेट सूत तयार केल्यास सुताचा दर्जा अत्यंत निकृष्ट होतो. या कारणासाठी या पेळूतील दोष नाहीसे करावे लागतात आणि हे कार्य खेचण साच्यामध्ये केले जाते. विपिंजण यंत्रामधून बाहेर पडणारा पेळू हा जाडीमध्ये असमान असतो. याशिवाय विपिंजण यंत्रातून बाहेर पडणाऱ्या पेळूमध्ये कापसाचे तंतू हे अस्ताव्यस्तपणे रचले गेलेले असतात आणि विपिंजण यंत्रात कापसाचे बहुतांश तंतू हे आकडय़ासारखे (हुक) वाकडे झालेले असतात.
खेचण प्रक्रियेमध्ये पेळूतील तंतूंचे आकडे काढून त्यांना सरळ करणे, तंतू एकमेकांस आणि पेळूच्या अक्षास समांतर करणे आणि पेळूची जाडी सर्व ठिकाणी एकसारखी करणे या प्रक्रिया केल्या जातात. यासाठी जे यंत्र वापरले जाते त्याला खेचण साचा असे म्हणतात.
खेचण साच्याचा मुख्य घटक म्हणजे खेचण रुळाची यंत्रणा ही होय. जुन्या खेचण साच्यामध्ये खेचण रुळांच्या चार जोडय़ा वापरल्या जात, तर आधुनिक खेचण साच्यामध्ये रुळांच्या तीन जोडय़ा वापरल्या जातात. एका जोडीमध्ये एकावर एक असे दाबाने बसविलेले दोन रूळ असतात. खालील रूळ हा लोखंडी असून वरील खेचण रुळावर रबराचे आवरण असते. यामुळे दोन्ही रुळांमध्ये कापूस घट्ट पकडला जातो. कापूस प्रथम रुळांच्या सर्वात मागच्या जोडीला भरविला जातो, तेथून तो पुढे पुढे जातो. खेचण रुळांच्या फिरण्याच्या गतीमध्ये फरक असतो. सर्वात मागची जोडी सर्वात हळू गतीने फिरते आणि जसजसे पुढे जाऊ तसतशी रुळांची गती वाढत जाते आणि सर्वात पुढच्या रुळांच्या जोडीची गती सर्वाधिक असते. यामुळे जसा पेळू एका जोडीकडून पुढच्या जोडीकडे जातो तसा तो खेचला जातो. या खेचण्यामुळे पेळूतील तंतू एकमेकांस व पेळूच्या अक्षास समांतर होतात आणि तंतूंचे आकडेही सरळ केले जातात.
खेचण साच्यास ६ ते ८ पेळू भरविले जातात आणि साच्यावरील एकूण खेच ६ किंवा ८ ठेवला जातो ज्यामुळे खेचण साच्यातून बाहेर पडणारा पेळू हा जवळपास भरविलेल्या पेळूएवढाच जाड असतो. अनेक पेळू एकत्र करण्याच्या प्रक्रियेस बहुपदरीकरण असे म्हणतात. हे अनेक पेळू एकत्र करून पेळू जाडीच्या बाबतीत एकसारखा होतो.
चं. द. काणे  (इचलकरंजी)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajkot state foundation