वनस्पतिजन्य तेल हे केवळ खाण्यासाठीच नव्हे तर औद्योगिक कच्चा माल म्हणूनही वापरले जाते. प्रचलित गळितधान्यांमध्ये वनस्पतीच्या एकूण शुष्कभाराच्या केवळ १० ते २० टक्केच तेल असते तर अल्गीच्या (जलशैवाले) काही जातींमध्ये त्यांच्या शुष्कभाराच्या ६० ते ७० टक्के तेल असते.
प्रयोगशाळेत असे दिसून आले आहे की अल्गी खूप झपाटय़ाने वाढतात व त्यामुळे त्यांच्या संवर्धनातून अगदी रोजच्या रोज विक्रीयोग्य माल बाजारात पाठविणे शक्य होईल. परंतु जलशैवालांपासून मोठय़ा प्रमाणावर तेलनिर्मिती करण्यात येणारी एक मोठी अडचण अशी आहे की त्यांचे संवर्धन पारदर्शक पण बंदिस्त अशा टाक्यांमध्येच करावे लागेल. कारण उघडय़ा जलाशयात आपल्या तलजनक जातींची शुद्धता आपण राखू शकणार नाही. बंदिस्त कक्ष उन्हात तापतात, त्यामुळे ते थंड करण्याचीही काहीतरी सोय करावी लागेल. तसेच या टाक्यांना बाहेरून सतत कार्बनडायॉक्साइड आणि खते पुरवावी लागतील. या सर्व बाबी विचारात घेतल्यास अशा प्रणालीचा भांडवली खर्च प्रतिहेक्टर सुमारे पाच कोटींच्या घरात जाईल असे वाटते. या भांडवली खर्चावरील व्याज, घसारा आणि चालू खर्च भरून काढून वर नफा कमवायचा असेल तर या प्रणालीतून दररोज प्रति हेक्टर एक टन इतके तेल मिळावयास हवे. एक हेक्टरवर पडणारा सूर्यप्रकाश आणि प्रकाशसंश्लेषणाची कार्यक्षमता विचारात घेता हे अशक्य वाटते.
या परिस्थितीवर मात करण्याचा एक उपाय आहे. स्पायरुलिना नामक एका नीलहरितशैवालाचे संवर्धन उघडय़ा जलाशयात १० आम्लविम्लनिर्देशांकाच्या पाण्यात केले जाते. इतक्या उच्च आम्लविम्लनिर्देशांकाच्या माध्यमात फक्त स्पायरुलिनाच जिवंत राहू शकते. आजच्या घडीस हा गुणधर्म कोणत्याच हरितशैवालात नाही, पण भराभर वाढणाऱ्या सूक्ष्मजंतूंमधील जनुकीय उत्परिवर्तनाच्या मोठ्या संभाव्यतेचा फायदा घेऊन अत्यंत उच्च आम्लविम्लनिर्देशांकात किंवा विशिष्ट क्षारांच्या द्रावणात तगून राहू शकतील आणि तरीही तेल निर्माण करतील अशी जलशैवाले विकसित केल्यास आपण त्यांचे संवर्धन उघडय़ा जलाशयात करू शकू. या उपायाद्वारे संवर्धनाचा भांडवली खर्च कमी करता येईल.
– डॉ. आनंद कर्वे (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा