पालघर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत पूर्व उच्च प्राथमिक तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन १२ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे. करोना संक्रमणाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने आवश्यक खबरदारीची उपाययोजना घेतल्या गेल्या आहेत. इयत्ता ५ वी करिता ६४५७ विद्यार्थी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी करिता ४०६९ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. आठ तालुक्यातील ५ वी करिता ७४ परीक्षा केंद्र व इयत्ता ८ वी करिता ५० अशा एकूण १२४ केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेसंबंधी क्षेत्रीय अधिकारी व परीक्षा केंद्र संचालक यांच्यासाठी सूचना पुस्तिका साहित्यासोबत देण्यात आलेल्या आहेत. परीक्षेच्या दिवशी तालुकास्तरावर भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. जिल्हा स्तरावर भरारी पथक स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आलेले असून करोना पाश्र्वाभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. त्याच पद्धतीने ११ ऑगस्ट रोजी जव्हार नवोदय विद्यालयाच्या सहावी इयत्तेसाठी प्रवेश परीक्षेचे आयोजन पालघर जिल्ह्याच्या तालुका मुख्यालय ठिकाणी करण्यात आले आहे. त्यादृष्टीने देखील आवश्यक उपाययोजनांची आखणी जिल्हा शिक्षण विभागाने केल्याचे सांगण्यात आले.