वसई: चुरशीच्या बनलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानानंतर विजयाची गणिते बदलली आहेत. भाजप, बहुजन विकास आघाडी आणि महविकास आघाडी या तीन प्रमुख पक्षांनी विजयाचा दावा केला असला वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे अतिशय अटीतटीची होऊन विजयी उमेदवाराचा विजय निसटता ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण १० उमेदवार रिंगणात होते. भाजपाचे हेमंत सावरा, बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील आणि महाविकास आघाडीच्या भारती कामडी या तीन पक्षात प्रमुख लढत होत आहे. महायुतीने विद्यामान खासदार राजेंद्र गावित यांचे शेवटच्या क्षणी कापलेले तिकीट, बहुजन विकास आघाडीने रिंगणात मोठ्या ताकदीने घेतलेली उडी आणि भाजपाने लावलेली ताकद यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली होती. सुरुवातीला महाविकास आघाडीने भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांचा जोर दिसत होता. दोन्ही पक्षांचा पाठिंबा मागणारे हितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडीतर्फे राजेश पाटील यांना रिंगणात उतरले. दुसरीकडे भाजपाने विद्यामान खासदार राजेंद्र गावित यांना गाफील ठेवून यांचे तिकीट कापले आणि डॉ. हेमंत सावरा यांना रिंगणात उतरवले. त्यांची नाराजी नको म्हणून गावित यांना भाजपात प्रवेश देऊन आमदारकीचे आश्वासन दिले. तिन्ही पक्षांनी जोरदार प्रचार केला असला तरी मतदानाच्या बदलेल्या आकडेवारीने सर्वांची धाकधुक वाढवली आहे.

हेही वाचा >>> उमेदवारांची भूमिका : पालघरचा विकास हेच ध्येय

पालघर लोकसभा मतदारसंघात ६३.९१ टक्के म्हणजे एकूण १३ लाख ७३ हजार मतदारांनी मतदान केले. त्यानुसार विजयी उमेदवाराला साडेचार ते पाच लाख मतांची गरज आहे. बहुजन विकास आघाडी या पक्षाची वसई विरारमध्ये निर्विवाद सत्ता आहे. त्यांची मते निर्णायक ठरतात. परंतु वसई विधानसभा मतदारसंघात सुमारे २ लाख, नालासोपाऱ्यात २ लाख ९१ हजार आणि वसई नालासोपाऱ्याचा काही भाग असलेल्या बोईसर मतदारसंघात २ लाख ४८ हजार मतदान झाले आहे. येथून आघाडी घेऊन जिंकण्याची बविआची रणनिती आहे. परंतु बविआची पारंपरिक मते मशाल किंवा भाजपाकडे वळल्यास बविआला धोका होऊ शकतो. वसईतील ख्रिास्ती, मुस्लीम आणि दलित मते निर्णायक ठरणार आहेत. दुसरीकडे डहाणू (७३ टक्के) विक्रमगड (७४ टक्के) येथे मोठ्या प्रमाणावर मतदान झाले आहे. या मतदारसंघात आदिवासी मतदारांचे प्राबल्य आहे. या ग्रामीण भागात भाजपाने मोठी रसद वापरल्याने मते कुणाकडे वळतात हा प्रश्न आहे. वाढवण बंदराचा मुद्दा शेवटच्या काही दिवसात गायब करण्यात भाजपाने यश मिळवले. ही बाब त्यांच्या पथ्यावर पडणारी आहे. सर्वच पक्षांनी या वाढलेल्या मतांमुळे आपल्या विजयाचा दावा केला आहे. वाढलेल्या १ लाख ७१ मतांनी सर्वांची धाकधूक वाढवली आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp bahujan vikas aghadi and maha vikas aghadi claim victory in palghar lok sabha constituency zws