विजय राऊत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कासा : पालघर जिल्ह्यातील केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेलगत असणाऱ्या डहाणू, तलासरी, जव्हार तालुक्यातील अनेक रुग्ण जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेण्यापेक्षा खानवेल सिलवासा या केंद्रशासित प्रदेशातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी पसंती देत आहेत. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव, तज्ञ डॉक्टर उपस्थित नसणे, उपचार करण्यास टाळाटाळ करणे, दुसऱ्या रुग्णालयात पाठवणे या बाबीमुळे सीमेलगत असलेल्या गावातील रुग्णांना सेलवास व खानवेल येथे असलेल्या रुग्णालयाचा मोठा आधार मिळत आहे.

पालघर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या दुर्गम आणि डोंगराळ जिल्हा आहे. जिल्हा आणि तालुका मुख्यालयापासून अनेक गावे दूर आहेत. या गावातील रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी यायचे झाल्यास त्यांना २५ ते ४० किमी पर्यत अंतर यावे लागते. इतके अंतर कापून आल्यानंतर सुद्धा उपचार मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे गंभीर आजारी, अपघातग्रत रुग्ण,गरोदर माता या केंद्रशासित प्रदेशातील सेलवास खानवेल येथे उपचारासाठी जाण्यास पसंती देतात. खानवेल चे शासकीय रुग्णालय आणि सेलवास येथील विनोबा भावे रुग्णालय हे अत्याधुनिक सुविधा आणि तज्ञ डॉक्टर असल्याने या ठिकाणी कितीही गंभीर रुग्ण असला तरीही एकाच ठिकाणी सर्व उपचार होतात. त्यामुळे रुग्ण या ठिकाणी जातात.

हेही वाचा… मतपेरणीसाठी पालघरमध्ये सत्ताधाऱ्यांचे असेही तंत्र !

पालघर जिल्ह्यातील केंद्रशासित प्रदेशाला लागून असलेले सायवन, उधवा, कळमदेवी, बेडगाव तसेच जव्हार तालुक्यातील साखरशेत, वावर-वांगणी, बोपदरी दाभाळे या भागातील रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी येण्यासाठी २५ ते ४० किमी पर्यंतचे अंतर पार करून यावे लागते. दुर्गम भाग असल्याने या ठिकाणी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्यवस्थित पोहचत नाही. जव्हार, कासा, तलासरी या ठिकाणी ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालये असली तरी अनेकदा या रुग्णालयतूनही गंभीर अपघाती रुग्ण, विषबाधा झालेले रुग्ण यांना उपचारासाठी सेलवास येथील विनोबा भावे रुग्णालयात पाठवले जाते. बरेचसे रुग्ण गुजरात राज्यातील वापी, वळसाड या ठिकाणीही जात होते. परंतु गुजरात राज्यातील रुग्णालये महाराष्ट्रातील रुग्णांवर उपचार करत नसल्याने सीमाभागातील रुग्णांना सेलवास आणि खानवेल मधील रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.

हेही वाचा… शहरबात : बिबट्याच्या वावरासंदर्भात अफवांचे पीक

जव्हार याठिकाणी १०० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय आहे. परंतु परंतु बरेचसे रुग्ण इकडे न येता परस्पर सेलवास, खानवेल येथील रुग्णालयात जातात. गंभीर अपघाती रुग्ण, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी विनंती केल्यास त्यांनाही सेलवास येथे पाठवण्यात येते. – रमेश मराड ( वैद्यकीय अधिकारी, जव्हार उपजिल्हा रुग्णालय)

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Border areas citizens of palghar district using health services silvassa of instead of maharashtra state government hospitals asj