पालघर : जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी सर्वांची असून आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध असून त्यांच्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन केले. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील राजीव गांधी मैदान येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागामार्फत राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते दूरदृष्य प्रणाली मार्फत बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. तर आदिवासी विकास मंत्री डाॅ. विजयकुमार गावित, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित आदी मान्यवर उपस्थित होते. आदिवासी आश्रम शाळांचा कायापालट करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी पूर्व परिक्षा केंद्र कार्यरत असल्याचे तसेच १०० विद्यार्थ्यांना पीएच डी साठी छात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी बांधवांच्या वस्ती सुधारणा योजने इतर अनेक योजना राबवल्या जात असून जिथे आदिवासींची लोकसंख्या ५० टक्क्यापेक्षा जास्त आहे. तिथे १७ संवर्गातील भरती ही स्थानिकांमधूनच करण्यात येईल असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. देशाच्या अर्थसंकल्पात आदिवासींसाठी पाचपट आर्थिक तरतूद वाढविली असून आदिवासी विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या मदतीने प्रत्येक पाडा हा रस्त्याने जोडणार आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रस्त्या अभावी वैद्यकीय सुविधा मिळण्यात अडचण येऊ नये, विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबु नये यासाठी पालघर आणि गडचिरोली या आदिवासी बहुल भागात प्राधान्याने रस्त्याचे जाळे विकसीत केले जाणार आहे. पालघर जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी याचा लाभ होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शासकीय रूग्णालय, उत्तम शाळा, पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून होत असल्याची माहिती श्री. फडणवीस यांनी दिली. शबरी योजनेची तरतूद 3 पटीने वाढविली असून प्रत्येक आदिवासी बांधवास पक्के घर मिळणार असून जिल्ह्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सोयीसुविधा पुरवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. बहुसंख्य आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पालघर जिल्ह्याची निर्मीती झाली झाली असली तरीही अनेक समस्यांनी ग्रासले असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते सोडवण्यासाठी व आदिवासी बांधवांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी आवश्यक असलेला निधी तातडीने वितरीत केला जाईल असे प्रतिपादन केले. आदिवासींच्या विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी केले.