वाडा: ग्रामीण भागांत एसटीची बस सेवा काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी सेवा कमी केल्यामुळे बेकायदा खासगी वाहनातील प्रवासी वाहतुकीला चांगलीच मोकळीक मिळाली आहे. त्याचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना बसला आहे. बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली आहे. बोईसर, जव्हार, डहाणू, पालघर, वाडा या ग्रामीण भागांत एसटी बस आगार आहेत. आगारातील बहुतांशी बसेसच्या फेऱ्या ठाणे, नाशिक, कल्याण, भिवंडी, अहमदनगर या शहरी भागांतच अधिक असतात. ग्रामीण भागात अत्यंत कमी उत्पादन मिळत असल्याचे एसटी बस प्रशासनाकडून सांगण्यात येते. परिणामी ग्रामस्थांना बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. ग्रामीण भागात जाणाऱ्या बहुतांश बस या वेळेवर सुटत नाहीत, ग्रामीण भागांत दिल्या जाणाऱ्या बस ह्या जुन्या असल्याने त्या नेहमीच रस्त्यातच नादुरुस्त होतात, फेऱ्यांचे वेळापत्रक बनविताना प्रवाशांना गृहीत न धरता पूर्ण सवलतीमध्ये प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळा गृहीत धरल्या जातात यामुळे एसटी तोटय़ात जाते, अशी प्रवाशांची तक्रार आहे. मात्र त्यावर उपाययोजना केली जात नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा