पालघर : जिल्ह्याच्या दुर्गम भागात रोजगाराची संधी मिळत नसल्याने जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणू तालुक्याचा पूर्व पट्टा आदी भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधींच्या शोधात स्थलांतर सुरू केले आहे. ग्रामीण आदिवासी भागातील शेतीची कामे आटोपल्यावर आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांनी रोजगारासाठी भिवंडी, वसई, ठाणे, नाशिक आणि दक्षिण गुजरात मधील वेगवेगळ्या ठिकाणी वीटभट्टी, बांधकाम अशा ठिकाणी कामासाठी स्थलांतर सुरू केले आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील दुर्गम गाव, पाडे ओस पडायला लागली आहेत. गावामध्ये फक्त वयोवृद्ध व्यक्ती आणि शाळेत जाणारी मुलेच दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रामीण दुर्गम भागात रोजगारासाठी काम मिळत नाहीत. बरेच आदिवासी शेतकरी हे फक्त पावसाच्या पाण्यावर शेती करतात. तर काही भूमिहीन शेतकरी इतरांच्या शेतावर मोलमजुरी चे काम करतात. भात शेतीची भात कापणी, झोडणी ही कामे आटोपली असल्याने सध्या हाताला रोजगार मिळावा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा या उद्देशान हजारो नागरिक आपल्या कुटुंबासह शहरी भागात स्थलांतर करत आहेत.

हेही वाचा : श्वान दंश उपचारासाठी पालघरच्या रुग्णाला पुन्हा ठाण्याची वारी; लस उपलब्ध असताना कर्मचारी, अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा

शहरी भागामधील विटभट्ट्या चालक दिवाळीच्या जवळपास ग्रामीण भागात दौरा करून आगाऊ रक्कम (उचल) देऊन मजूर निश्चित करून ठेवताना दिसतात. तर काही नागरिक शहरी भागात जाऊन बांधकाम किंवा हाताला मिळेल ते काम शोधण्यासाठी जातात. प्रत्येक नागरिकाला आपल्या गावातच रोजगार मिळावा यासाठी प्रशासनाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असली तरी रोजगार हमी योजनेतील दर कमी असल्याने तसेच रोजगार हमी योजनेतील केलेल्या कामाचा मोबदला विलंबाने मिळत असल्याने आगाऊ रक्कम देणाऱ्या व्यवस्थेकडे जाण्याचा या कामगारांचा कल अधिक असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा : पालघर : जिल्ह्यातील रेल्वे भुयारी मार्गाचे आराखडे ठरले अपयशी

“रोजगार हमीच्या मंजुरी घ्यायचं काम सध्या सुरू आहे, लवकरच मंजुरे मिळून कामाला सुरुवात होईल कायमस्वरूपी रोजगार मिळेल यासाठी प्रयत्न करू”, असे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी म्हटले आहे. “स्थानिक ठिकाणी कायम स्वरूपी रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे वीटभट्टी च्या कामाला जाणे भाग पडते. आम्ही चार कुटुंबे एकत्र जातो, तेथे खाण्या पिण्याची, राहण्याची व्यवस्था होत. पाऊस सुरू होण्यापूर्वी पुन्हा परत येऊ” असे जव्हार येथील सूरज गवते यांनी म्हटले आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In palghar district migration in tribal areas of jawhar mokhada in search for livelyhood css
Show comments