कासा :वातावरणातील वाढलेले तापमान तसेच मानवनिर्मित कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मोठ्या प्रमाणात वणवे लागत असून त्यामुळे वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेष म्हणजे यापैकी अनेक जंगलातील आगी मानवनिर्मित असून अजून पर्यंत आरोपींवर कारवाई करण्यास वनविभागाला अपयश येत आहे.
उन्हाळा सुरू झाला की जंगलामध्ये आगी लागण्याचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होते. गेल्या काही दिवसांपासून कासा, पालघर व वाडा वनपरिक्षेत्रामध्ये असलेल्या जंगलामध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी वणवा लागून तर काही ठिकाणी शेतकरी वन पट्ट्यामध्ये राब करत असल्याने जंगलामध्ये आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे सांगितले जाते.
जंगलामध्ये आग लागल्याने जंगलातील सूक्ष्म जीव, पशु-पक्षी, त्यांची घरटी व अंडी, सरपटणारे प्राणी यांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते तसेच जंगलातील लहान मोठ्या वनस्पती जळून खाक होत आहेत. मागील आठवड्यात महालक्ष्मी गड परिसरात आग लागून जवळपास सात हेक्टरवरील वनसंपत्ती आणि जैवविविधता जळून खाक झाली असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी अशाच प्रकारे जंगलामध्ये आग लागल्याचे प्रकार दिसून आले आहेत.
कासा वनपरिक्षेत्रामध्ये पोळा, सोमटा, नानिवली, वाडा-खडकोना या वनक्षेत्राचा विक्रमगड आणि पालघर तालुक्यातील भाग येतो. कासा परिक्षेत्रामध्ये मोठमोठे डोंगर असून घनदाट जंगलाची व्याप्ती जवळपास ५४०० हेक्टरवर आहे. या जंगलांमध्ये बिबटे, ससे , माकड असे विविध प्राणी तर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि विविध प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. परंतु उन्हाळा सुरू झाला की काही ठिकाणी वणवा लागून आगी लागतात. तर काही ठिकाणी शिकार करण्यासाठी मुद्दाम आगी लावल्या जातात. शेतकरी मिळालेल्या वनपट्ट्यामध्ये भाताचे रोप लावण्यासाठी राब म्हणजेच जमीन भाजतात. परंतु या सर्वांमुळे जंगलात मोठ्या प्रमाणावर आग लागते. आग लागल्यामुळे वैविध्यपूर्ण अशा वनस्पतींची व जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे आग विझवण्यासाठी पुरेशी साधन सामग्री नसल्याचे दिसून आले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी कासा वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे चार ब्लोवर आहेत. परंतु तीन वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या ब्लोवर चा स्फोट होऊन दोन वनरक्षक मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे हे ब्लोवर वापरण्याचे टाळण्याच्या सूचना आहेत. कासा वनपरिक्षेत्रामध्ये असलेल्या उंच डोंगरांमध्ये आग लागल्यानंतर कडे- कपारी असल्यामुळे आग लागलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना आगा विझवण्यासाठी वेळेत पोहचता येत नाही. त्यामुळे आग फोफावत जाते आणि आग विझवणे नियंत्रणाबाहेर जाते.
तरी जंगलामध्ये लागणारी आग रोखण्यासाठी ज्या व्यक्तीकडून मुद्दाम आग लावली जाते, त्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. वनांमध्ये आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्या तरी अद्याप एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.लागलेली आग वेळीच विझवता यावी यासाठी वनांमध्ये आग विझवणारी यंत्रणा उभी करण्याची मागणी वन्यजीवप्रेमी करत आहेत. कासा वनविभाग अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले की काही लोक शिकारीसाठी आग लावतात व वनपट्टे धारक शेतकरी राब करताना आगेची ठिणगी जंगलाकडे जाऊन आग लागू शकते तर दुसरीकडे या जंगलातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे काही वाहन चालक सिगारेट ओढून न विझवता ते जंगलाच्या बाजूने फेकून दिली जाते त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात आग लागत आहे.