पालघर : प्रत्येक गाव स्वच्छ होण्यासाठी ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापनाकरीता १ मे पासून जिल्ह्यात ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू ‘ हे विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात ओल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यापासून खत बनविण्यावर भर दिला जाणार आहे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामादरम्यान केले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या दृश्यमान स्वच्छतेसाठी व नागरिकांच्या वर्तणूक बदलासाठी स्वच्छता चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील घनकचरा व्यस्थापनासाकरिता पालकमंत्री यांच्या संकल्पनेतुन प्लास्टिक मुक्त, दुर्गंधी मुक्त व स्वच्छ सुंदर पालघर मोहीम सुरु करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम
जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यातील ८९८ गावापैकी ७४४ गावात घनकचरा व सांडपाणी व्यस्थापनाची कामे पूर्ण झाली आहेत. कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू हे अभियान राज्य शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या आदेशानुसार यशस्वी करू तसेच या अभियानात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन २६ एप्रिल रोजी स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमात मनोज रानडे यांनी केले आहे.
तालुक्याच्या सर्व गटविकास अधिकारी यांनी पंचायत समिती स्तरावर ग्राम पंचायत अधिकारी यांची कार्यशाळा, बैठक आयोजित करावी. ग्रामपंचायत अधिकारी यांनी बैठक घेऊन सर्व ग्रामस्थांना माहिती द्यावी. तसेच गावात दवंडी द्यावी. ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, सर्व कार्यालयाच्या सूचना फलकावर माहिती प्रसारित करण्यात याव्यात अशा सूचना सर्व ग्रामपंचायतीना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी दिल्या आहेत.
कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” या मोहिमेची पडताळणी तालुका स्तरावरून गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, जिल्हा सल्लागार, तालुकास्तरावरील समन्वयक व गट समन्वयक ओल्या कऱ्यापासून भरलेल्या नाडेप खड्डयाची पडताळणी करतील. अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारसकर यांनी दिली आहे.
मोहिमे करता उपाययोजना
सांडपाणी व्यवस्थापना अंतर्गत वैयक्तिक शोषखड्डे, सार्वजनिक शोषखड्डे, परसबाग इत्यादी तर घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कंपोस्ट (पीट) गांडूळ खत प्रकल्प, प्लास्टिक कचरा संकलन केंद्र इत्यादी उपाययोजना केल्या जात आहेत. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिलेल्या निर्देशानुसार, गावात तयार केलेल्या कंपोस्ट पिटच्या (नाडेप) माध्यमातून ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून खत निर्मितीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
अशाप्रकारे राबविली जाणार अभियान
हे अभियान १ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या पूर्वतयारीसाठी २७ ते ३० एप्रिल दरम्यान घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. घरगुती व सार्वजनिक स्तरावर वर्गीकरण केलेल्या ओल्या कचऱ्याचे २७ ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये संकलन करण्यात येईल. २९ ते ३० एप्रिल दरम्यान या मोहिमेची विविध माध्यमांचा वापर करीत प्रचार प्रसिध्दी करण्यात येईल. तसेच यशोगाथा प्रकाशित करून इतर गावांना प्रेरित करण्यात येणार आहे. अभियानाकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, संस्था, बचतगट महिला व शेतकरी गटांचा सहभाग घेऊन गावपातळीवर श्रमदान उपक्रम राबवून जनसहभाग घेतला जाणार आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी या मोहिमेचा शुभारंभ होईल. यावेळी स्थानिकस्तरावर लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती राहिल. १ ते १० मे या कालावधीत गावातून संकलीत केलेला ओला कचरा खड्ड्यात भरण्यात येईल. त्यापासून खत निर्मितीनंतर १५ सप्टेंबर पर्यंत नाडेप तयार झालेला खत उपसण्याची प्रक्रिया होईल.
राज्य शासनाच्या पाणीपुवठा व स्वच्छता विभाग यांचे आदेशानुसार या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक गावाने सक्रिय सहभाग घ्यावा. प्रत्येक कुटुंबाने घरामध्ये ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करावे. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत निर्मिती करावी तर प्लास्टिक किंवा इतर न कुजणारा सुका कचरा पुनर्प्रक्रियेसाठी देण्यात यावा. आपले गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने योगदान द्यावे, – मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी