पालघर : महायुतीच्या १५ घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे या दृष्टीने आयोजित केलेल्या संयुक्त कार्यकर्ता मेळाव्यामध्ये विद्यमान खासदार राजेंद्र गावित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचे सुरुवात केल्यानंतर कार्यकर्त्यांनी मेळाव्यामधून काढता पाय घेतला. त्यामुळे व्यासपीठावर बसलेल्या नेते मंडळींवर नामुष्की ओढावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महायुतीच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ विविध घटक पक्षांमधील कार्यकर्त्यांचे समन्वय साधता यावे या दृष्टिकोनातून राज्यभरात जिल्हास्तरीय समन्वय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मनोमिलन मेळाव्याला भाजपा तर्फे राणी द्रिवेदी, भरत राजपूत, पंकज कोरे, शिवसेनेमधून खासदार राजेंद्र गावित, प्रकाश निकम, राजेश शहा, कुंदन संखे, वसंत चव्हाण, जगदीश धोडी, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आनंद ठाकूर, आरपीआयमधून सुरेश बारशिंगे व इतर घटक पक्षांचे स्थानीय पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – पालघर साधू हत्याकांड; कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर

या मेळाव्यामध्ये जिल्हाभरातून दोन हजारपेक्षा अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग झाला होता. व्यासपीठावरून मार्गदर्शन करताना वेगवेगळ्या वक्त्यांनी परस्परांमध्ये यापूर्वी राजकीय कटूता असल्याचे मान्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून देण्यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. मात्र भाजपा नेत्यांच्या भाषणादरम्यान जय श्रीराम व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी असे वेगवेगळे नारे कार्यकर्त्यांकडून पुकारले जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये असलेली मतभिन्नता कायम असल्याचे दिसून आले. या मेळाव्यात सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून विजयासाठी एकत्र प्रयास करायला हवा, असे जवळपास सर्व नेत्यांनी आपल्या मार्गदर्शनादरम्यान सांगितले.

खासदार राजेंद्र गावित यांनी महायुतीच्या घटक पक्षांचे ध्येयधोरण वेगळे असले तरी सांघिकदृष्ट्या एकत्र येऊन आगामी निवडणुकीला सामोरे जायला हवे असे सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यास अपयश आल्याचे मान्य करत कार्यकर्त्यांनी विकास योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन केले. आपल्या राजकीय कारकिर्दीत काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि शिवसेना (शिंदे गट) असा प्रवास झाल्याने आपला अनेक पक्षांमधील कार्यकर्त्यांशी संपर्क असल्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी मिश्किलपणे उल्लेख केला. पावणेपाच वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या मेळाव्यात अवघा सव्वातास उलटल्यानंतर खासदारांच्या भाषणादरम्यान महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या घराकडचा रस्ता पकडला.

या मेळाव्यात भाषण करताना अनेक नेत्यांनी खासदारकीच्या उमेदवारांबाबत आपली मते मांडली. मात्र उमेदवार वरिष्ठांकडून निश्चित होईल असे वारंवार सूत्रसंचालक सांगत राहिले.

बहुजन विकास आघाडीचा सहभाग नाही

१५ पक्षीय महायुतीमध्ये बहुजन विकास आघाडीचा समावेश असल्याचा दावा भाजपाच्या सरचिटणीस व लोकसभा प्रभारी राणी द्विवेदी यांनी यापूर्वी केला होता. मात्र मनोमिलन मेळाव्यामध्ये बहुजन विकास आघाडीचा एकही स्थानिक अथवा जिल्हास्तरीय नेता फिरकला नसल्याचे दिसून आले.

हेही वाचा – शहरबात : होऊन जाऊ दे खर्च

माजी आमदारांना तिसरी रांग

बोईसरचे दोन वेळेचे आमदार विलास तरे यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश घेतला होता. मात्र या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांना तिसऱ्या रांगेत बसण्याची पाळी ओढावली.

या मेळाव्याच्या आरंभी सभेच्या ठिकाणी असलेल्या बहुतांश खुर्च्या कार्यकर्त्याने भरलेल्या होत्या. मेळावा विलंबाने सुरू झाल्याने अखेरच्या टप्प्यात कार्यकर्ते व पदाधिकारी घराकडे निघाले होते. मेळाव्याचे यश आरंभी असलेल्या कार्यकर्त्यांच्या संख्येवर अवलंबून असते. – खासदार राजेंद्र गावित

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Party workers turned their backs on the mp at the mahayuti meeting in palghar ssb
Show comments