बोईसर : पालघर तालुक्यातील सावरे गावात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. कौटुंबिक कलहातून  वारंवार होणाऱ्या भांडणामुळे दिर आणि नणंद यांनीच आपली वहिनी आणि पुतणीची निर्घुण हत्या करून त्यांचे मृतदेह जंगलातील ओहोळात फेकून दिले होते. याप्रकरणी दीर संदीप डावरे आणि नणंद सुमन करबट या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास पालघर तालुक्यातील सावरे गावानजीक असलेल्या ओहोळामधील पाण्यातील दगडाला बांधलेल्या अवस्थेत एक महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

हेही वाचा >>> पालघर : आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

पालघर तालुक्यातील सावरे हे अतिशय दुर्गम गाव असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दुर्वेस या गावापासून सुमारे ११ किमी अंतरावर वसले आहे. सावरे गावातील बरडे पाडा येथील जंगलातून वाहणाऱ्या ओहोळातील पाण्यात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास गावचे पोलीस पाटील यांनी मनोर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर तो वाणीपाडा येथील सुश्मिता प्रवीण डावरे या महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले. महिलेची अज्ञात व्यक्तीने हत्या करून मृतदेह ओहोळातील वाहत्या पाण्यातील दगडाला बांधून ठेवण्यात आला होता. तर महिलेची मुलगी मात्र गायब होती.

हेही वाचा >>> पालघर : नेहरोली गावातील एका बंद घरात आढळले तीन मानवी सापळे, हत्या झाल्याचा संशय

मयत सुश्मिता डावरे हि आपल्या दोन वर्षाच्या मुलीसोबत गावाबाहेर असलेल्या शेतघरात राहत होती, तर तिचा पती एका मच्छीमार बोटीवर बाहेरगावी कामाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पालघर जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागात घडलेल्या या हत्याकांडामुळे खळबळ माजली असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या नेतृत्वाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके बनवून तपास सुरु करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी मयत महिलेचा दीर संशयीत संदीप डावरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र  पोलिसी खाक्या दाखवताच कौटुंबिक वादातून सततच्या भांडणामुळे आपली वहिनी सुश्मिता डावरे आणि पुतणीची हत्या हत्या करून दोन्ही मृतदेह चार किमी अंतरावरील जंगलातील निर्जन भागातून वाहणाऱ्या ओहोळातील पाण्यातील दगडाला बांधून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले. यामध्ये बहीण सुमन करबट हिने देखील मदत केल्याचे आरोपीने कबुली दिली असून त्याने दाखवलेल्या जागेवरून चिमुकल्या पुतणीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.