विजय राऊत कासा : पालघर जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या ४४३ शाळांनी वीज बिल भरले नसल्यामुळे शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सुमारे ७० ते ७५ लाख रुपयांची ही वीज बिल थकबाकी असून २०१९ पासून शासकीय निधी न मिळाल्यामुळे हे बिल शाळेला भरता आलेले नाही, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. पालघर जिल्हा परिषदअंतर्गत तालुक्यांमध्ये एकुण २१३४ शाळा कार्यरत आहेत. शाळांचे वीज बिल हे व्यावसायिक दराने आकारले जाते. दर महिना हे बिल १२०० ते १५०० रुपयांपर्यंत येत असते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांचे वीज बिल भरण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीवर असते. याचबरोबर अनेक शाळांचे मुख्याध्यापक येणाऱ्या विविध निधीतून वीज बिल भरत असतात. २०१९ पासून ४४३ शाळांना शासकीय निधी मिळालेला नाही. वेतनेतर अनुदानही बंद आहे. यामुळे शाळांना कोणताही खर्च करणे अवघड झाले आहे. १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. त्याआधी या शाळांची वीजजाडणी पूर्ववत होणे आवश्यक होते. मात्र वीजपुरवठा खंडित असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत अंधारात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. अंधार असल्यामुळे डासांचाही प्रादुर्भाव होत असल्यामुळे त्याचा त्रास विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही सहन करावा लागत आहे. वीज नसल्यामुळे शाळांमधील दूरदर्शन संच, प्रोजेक्टर, संगणक अशी साधनेही धूळ खात पडल्याचे दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये लोकसहभागातून शाळा डिजिटल केल्या गेल्या आहेत. शाळांमध्ये वीज नसल्यामुळे ऑनलाइन वर्गासाठी शिक्षकांना मोबाइलचा वापर करावा लागत आहे. यामुळे सुविधा असूनही त्याचा फायदा घेता येत नाही, असे म्हटले जात आहे. दरम्यान, शासकीय निधी प्राप्त न झाल्यामुळे वीज बिल थकबाकी वाढली आहे. ही माहिती शासनदरबारी असतानाही वीज मंडळाने या शाळांची वीजजोडणी कापली आहे, याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येते. निधीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.शाळेत वीजपुरवठा नसल्याने मुलांना अंधारात शिक्षण घ्यावे लागते, शिक्षकांना शाळेत उपलब्ध डिजिटल साधनांचा उपयोग करता येत नाही. डास चावत असल्यामुळे मुले आजारी परत आहेत तरी शाळेत लवकरात लवकर वीजपुरवठा सुरू करावा. -सुभाष वळवी, चिखली पाडा, अध्यक्ष, शा. व्य. समिती.