प्लास्टिक टाक्या, शोषखड्डय़ांचा वापर, उपक्रमाची केंद्राकडून दखल
निखिल मेस्त्री
पालघर: जिल्ह्यातील बरवाडपाडा या ग्रामपंचायतीने घरांमधील सांडपाण्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. प्लॅस्टिक टाक्या आणि शोषखड्डे यांचा वापर यामध्ये करण्यात आला असून या उपक्रमाची दखल केंद्र शासनानेही घेतली आहे. हे नावीन्यपूर्ण कार्य भारत सरकारच्या ग्रामीण स्वच्छता विभागाच्या संकेतस्थळवर यशोगाथा म्हणून प्रसिद्ध केला आहे.
दादरा नगर हवेली व जव्हार तालुक्याच्या सीमेवर अतिदुर्गम भागात वसलेल्या बारवाडपाडा येथे १८९ कुटुंबांतील १०३९ लोकसंख्या आहे. गावातील सांडपाणी रस्त्यावर किंवा अन्यत्र सोडून देत असल्याने गावचे आरोग्य धोक्यात होते. त्यासाठी सरपंच अनिल मौळे व ग्रामसेवक प्रशांत सोनेरी यांनी तालुक्याच्या मार्गदर्शनाखाली शोषखड्डा संकल्पना अमलात आणली. खर्चीक बाबीऐवजी सहज उपलब्ध होणाऱ्या प्लास्टिक टाक्यांच्या माध्यमातून शोष खड्डा तयार करण्याची नावीन्यपूर्ण संकल्पना पुढे आली. ग्रामपंचायतीच्या निधीतून या प्लास्टिक टाक्या खरेदी करून लाभार्थीना वितरित केल्या. रोजगार हमीद्वारे नागरिकांना मजुरी म्हणून मिळालेल्या पैशातून टाक्याचे पैसे नागरिक ग्रामपंचायतीला परतफेड करणार आहेत. गावातील तब्बल १५६ कुटुंबांनी सांडपाणी व्यवस्थापनासाठी मनरेगा योजनेअंतर्गत वैयक्तिक शोषखड्डेसाठी अर्ज केला व ही कामे पूर्ण झाली. ३३ कामे प्रगतिपथावर आहेत. एका शोषखड्डय़ासाठी २७५० इतका खर्च येत आहे. प्लॅस्टिक टाक्या सिमेंट टाक्याच्या तुलनेत किफायतशीर, वाहतूक करण्यास सोप्या, १० वर्षांहून अधिक काळ टिकू शकतात आणि त्यांना स्वच्छ करणे सोपे आहे. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतुल पारसकर, जव्हार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर, सरपंच अनिल मौळे, ग्रामसेवक प्रशांत सोनेरी आदींनी ग्रामस्थांना उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले.
व्यवस्था अशी..
शोषखड्डय़ांमध्ये ५ ७५ ७५ फूट आकाराचे खड्डे तयार केले जातात. खड्डय़ाच्या मध्यभागी १००-लिटर क्षमतेची प्लास्टिकची टाकी ठेवली जाते.आजूबाजूला वाळू, विटा, दगड भुका टाकला जातो. सिमेंटच्या पिशव्या आणि मातीने टाकी झाकलेले असते. स्वयंपाकघर किंवा न्हाणीघर व घरातील इतर ठिकाणाहून निघणाऱ्या सांडपाणीची वाहिनी शोषखड्डय़ातील प्लास्टिकच्या टाकीला जोडलेला असते. टाकीमधील छिद्रामुळे पाणी हळूहळू जमिनीत मुरते. टाकीच्या तळाशी साचलेला काही प्रमाणात घनकचरा वेळोवेळी स्वच्छ केले जाऊ शकतात व हा खड्डा पुन्हा पुन्हा वापरता येतो.
कृती आराखडा
२.८० लाख रुपये खर्चून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी २०२१-२०२२ मध्ये जिल्हा कृती आराखडय़ात या गावाचा समावेश करण्यात आला आहे. अनेक संशोधने केल्यानंतर, सरपंच, ग्रामसेवक यांनी गावातील नागरिकांना सामुदायिक स्तराऐवजी वैयक्तिक स्तरावर निवडण्यास जनजागृती केली व त्यातून उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले. रोजगार हमी योजनेंतर्गत लाभार्थीनी शोषखड्डा निवडला.
स्वच्छ भारत मिशन ही योजना रोजगार हमीमध्ये रूपांतरित करून कमी खर्चाची टिकाऊ उपक्रम हाती घेतल्याने याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे पुढे हा उपक्रम जिल्ह्यातील गावांमध्ये राबविण्याचा संकल्प आहे.
– सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पालघर