जल जीवन मिशनअंतर्गत उभारलेल्या पाण्याच्या टाकीवर चढताना स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डहाणू तालुक्यातील सुखडआंबा गावातील शिरसोन पाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी बरोबर घडलेल्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. जिल्हा परिषद शाळेच्या पासून काही अंतरावर असलेल्या सुमारे ३० फूट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर शालेय विद्यार्थी चढले होते. सायंकाळी ४:३० च्या सुमारास या टाकीच्या बांधकामावरील काही भाग कोसळल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते.
या अपघातामधील जखमींना सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम नेण्यात आले होते. त्या ठिकाणाहून त्याला कासा उपजिल्हा रुग्णालयात आणले असता दोन मुलींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. हर्षला रघू पागी (११), इयत्ता सहावी आणि शिरसन संजना प्रकाश राव (१२), इयत्ता सातवी अशी असून रीना रशू फरारा (११) ही सहावीतील विद्यार्थिनी गंभीर जखमी आहे.
जल जीवन मिशन प्रकल्पाचे काम ठेकेदार हरेश बोअरवेल यांच्याकडे होते. मात्र, या कामात हलगर्जीपणा झाल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले असून पाण्याच्या टाकी उभारणीच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे उघड झाले आहे. चळणी सुकडआंबा ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सरिता भोई ग्रुप व ग्रामस्थांनी यांनी या घटना संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून या दोषी ठेकेदार, संबधित पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.