लोकसत्ता वार्ताहर

बोईसर : पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार होत असलेले वातावरणातील चढ-उतार आणि ढगाळ हवामानामुळे तयार होत आलेल्या आंब्याचे नुकसान होत असल्यामुळे बागातदार संकटात सापडला आहे. वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी आपल्या फळबागेत आंबा फळांना कागदी पिशव्यांचा आधार देऊन संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पालघर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात चढ-उतार होताना दिसत आहे. दिवसा उष्ण तापमान आणि पहाटेच्या वेळेला थंडी असे विषम हवामान तयार होऊन फळे गळणे, रोगराईची समस्या प्रामुख्याने जाणवू लागली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचे खूप कमी उत्पादन येण्याची शक्यता असून आर्थिकदृष्ट्या नुकसानीचा सामना करावा लागण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कोकणातील आंबा हा बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाला असून पालघर जिल्ह्यात आंबा फळे ही मे महिन्यात विक्रीसाठी तयार होत असल्याने कडक उन्हाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे आंबा फळांचे कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कागदी पिशवीचा आधार देण्याचा प्रयोग सुरू आहेत.

कागदी पिशव्यांमुळे आंब्याचे संरक्षण

डहाणू तालुक्यातील बोर्डी, घोलवड, बोरीगाव परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आंब्याच्या संरक्षणासाठी कागदी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. यामुळे जास्त उष्णता, वादळ, वारा, अवकाळी पाऊस इत्यादी कारणांमुळे फळाची गळती कमी होते, फळाचा आकार आणि वजन वाढते, तसेच डागविरहित फळे मिळतात. कागदी पिशव्यांमुळे आंब्याचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते आणि ते लवकर पिकण्यास मदत करतात. कागदी पिशव्या ह्या अतिशय स्वस्त दरात प्रति पिशवी एक रुपया या दराने बाजारात उपलब्ध आहेत. फळ गोटी ते अंडाकृती आकाराचे असताना, २५ x २० सेमी आकाराची कागदी पिशवी वापरणे गरजेचे आहे. पिशवी लावताना फळाच्या देठाला इजा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. कागदी पिशव्या दवबिंदू ,पक्षी, फळगळ, ऊन, वारा यांपासून संरक्षण करतात.

आंबा संरक्षण पिशव्यांचे फायदे

  • कागदी पिशवी मुळे फळमाशीवर नियंत्रण ठेवता येते.
  • कागदी पिशव्यांमुळे फळांची गळती कमी होते.
  • फळे पिशवीत श्वास घेऊ शकतात आणि कागदी पिशवी दवबिंदू पासून पाणीरोधक आहे.
  • कागदी पिशवीमुळे फळांना कडक उन्हामुळे, जंतूंमुळे, पक्ष्यांमुळे होणारे नुकसान टाळता येते.
  • फळांना रंग येण्यास, साखर वाढवण्यास, परिपक्वता आणि वजन वाढविण्यास मदत करते.
  • फळमाशी आणि इतर कीटकांपासून संरक्षण होते.
  • रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करण्याची गरज कमी होते.
  • एकसमान रंग तयार करण्यास आणि सावली टाळण्यास मदत करते.
  • विविध हवामान परिस्थितींमुळे होणारा अपव्यय टाळतो.
  • पिशवी आत स्थिर तापमान राखण्यास मदत करते ज्यामुळे फळांची वाढ जलद होते.

पालघर जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते जून चा पहिल्या आठवड्यात आंबा विक्रीसाठी तयार होतो. मे महिन्यात प्रचंड उष्णता असल्याने आंबा फळांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आंबा फळांचे उष्णतेपासून संरक्षण होण्यासाठी कागदी पिशव्यांचा वापर सुरू केला असून परिसरातील इतर शेतकरी हे याचे अनुकरण करत आहेत -सुदीप म्हात्रे, आंबा उत्पादक शेतकरी, बोरीगाव