पालघर : मुसळधार पावसाच्या शक्यतेवर सावधगिरीचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने रविवारी २ जुलै रोजी आपल्या २६ सेवा अचानकपणे शनिवारी सायंकाळी उशिरा रद्द केल्याची घोषणा केली. हवामान विभागाचा तसेच शासनाचा कोणत्याही प्रकारचा सतर्कतेचा इशारा नसताना पश्चिम रेल्वेने कोणत्या माहिती स्रोताच्या आधारे हा निर्णय घेतला हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पालघर जिल्ह्यात आज दुपारपर्यंत अनेक ठिकाणी लखलखित ऊन व किरकोळ पावसाच्या सरी झाल्याने गैरसोय होणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. पश्चिम रेल्वेने शनिवारी सायंकाळी उशिरा पाठवलेल्या ई-मेलद्वारे मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मेमू सेवेच्या आठ फेऱ्या, शटल गाडीच्या सहा फेऱ्या तसेच १२ उपनगरीय सेवा रद्द करीत असल्याची माहिती दिली. त्यामुळे आज बाहेर पडणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागले. असे असताना लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या व मालगाड्या सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसून आले. हेही वाचा - अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल हवामान विभागाने मुंबई, पालघर व ठाणे जिल्ह्यात आजच्या दिवशी तुरळक ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. तसेच गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला होता. हवामान विभागाचे वरिष्ठ अधिकारी के. एस होसालीकर यांनी पश्चिम रेल्वेने गाड्या रद्द करण्यासाठी घेतलेला मुसळधार पावसाचा आधार चुकीचा असल्याचे ट्विटदारे नमूद केले. रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या चुकीच्या माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयाबद्दल नापसंती व्यक्त करत गाड्या रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र याबाबत कोणताही बदल होऊ शकला नाही. हेही वाचा - पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर, पुल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आज दिवसभर पालघरसह अनेक भागांत काही लख्ख सूर्यप्रकाश पडला होता, तसेच दिवसभरात पावसाच्या किरकोळ सरी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने घेतलेला निर्णय अयोग्य असल्याची टीका रेल्वे प्रवाशांकडून केली जात असून यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. अनेक गाड्या रद्द असल्याने नंतरच्या गाड्यांना गर्दी पसरली होत. या संदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांच्याशी संपर्क केला असता या प्रकरणात माहिती घेऊन कळवतो, असे त्यांनी सांगितले.