रमेश पाटील, लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाडा: मध्यप्रदेश सरकारने कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय महिलांसाठी दरमहा एक हजार रुपये सहाय्य देणारी योजना सन २०२३ पासून सुरु केली आहे. अशा प्रकारची योजना महाराष्ट्र सरकारही लवकरच सुरु करणार असल्याची अफवा पसरवली गेल्याने या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील महिला तालुका मुख्यालयी असलेल्या टपाल कार्यालयात खाते उघडण्यासाठी गर्दी करीत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून येथील टपाल कार्यालयात महिलांच्या रांगा दिसत आहेत.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजना अंतर्गत मध्यप्रदेश सरकारने २८ जानेवारी २०२३ रोजी कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय घरातील महिलांसाठी दरम्यान १००० रुपये अर्थसहाय्य देणारी योजना घोषित केली. व ५ मार्च २०२३ पासून या योजनेचा प्रत्यक्ष लाभ दरमहा या राज्यातील महिलांना मिळू लागला. महिलांचे सक्षमीकरण करणे, त्यांना चांगल्या भविष्याकडे नेणे या उद्देशाने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ मध्यप्रदेश मधील लाखो महिलांना मिळाल्याने या राज्यात अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथील तत्कालीन भाजपा सरकारला पुन्हा चांगले यश मिळाले.

आणखी वाचा-अभिनेत्री बनण्याचं आमिष दाखवून शूट केले नग्न व्हिडीओ; पालघरमधील धक्कादायक प्रकार कसा झाला उघड?

महाराष्ट्र राज्यात महिलांसाठी अशाच प्रकारची योजना शिंदे सरकार सुरु करणार असल्याची अफवा वाडा तालुक्यात पसरवली गेल्याने वाडा येथील टपाल कार्यालयात सकाळपासूनच ग्रामीण भागातील महिला खाते उघडण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. खाते उघडण्यासाठी आलेल्या महिलांना खाते उघडण्याचे कारण विचारले असता, महिलांना लवकरच पैसे मिळणार आहेत असे या महिलांकडून सांगितले जात आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खात्यात दोनशे रुपये जमा करुन खाते उघडले जात असल्याने व खातेदारांना क्युआर कार्ड लगेच दिले जात असल्याने ही गर्दी दररोज वाढताना दिसत आहे.

१) खाते उघडणे गैर नाही

सध्या ज्या उद्देशाने महिला खाते उघडण्यासाठी टपाल कार्यालयात गर्दी करतात तो उद्देश जरी सद्या त्यांचा सफल झाला नाही तरी या महिलांची खाते ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ या भारत सरकारच्या बँकेत उघडली जात असल्याने सद्या राज्य व केंद्र सरकारकडून विविध प्रकारचे येणारे अनुदान व लाभाच्या योजनांचे पैसे याच भारत सरकारच्या बॅंक खात्यावर जमा होत आहेत. त्यामुळे या महिलांसाठी या खात्याचा उपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आणखी वाचा-६०० रस्ते कामांना दुबार मंजुरी; एकच काम  जिल्हा परिषदेसह  सार्वजनिक बांधकाम विभागही करणार; गैरप्रकार होण्याची शक्यता

२) इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडूनच लाभ

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लाभार्थी, राज्य सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचे लाभार्थी, राष्ट्रीय रोजगार हमी योजना, शेतकरी नुकसान भरपाई, घरकुल लाभार्थी अशा विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे मिळणारे पैसे ‘इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक’ (आय.पी. पी. बी.) या टपाल विभागाच्या बॅंकेत जमा होत आहेत. याच विभागाचे कर्मचारी लाभार्थ्यांना वितरित करीत आहेत.

‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ या बँकेत खाते उघडण्यासाठी तालुका मुख्यालयी टपाल कार्यालयातच आले पाहिजे असे नाही. खेडे गावात असलेल्या शाखा डाकघरमध्येही ही सुविधा उपलब्ध आहे. -प्रकाश मोरे, डाक निरिक्षक, उपविभाग जव्हार .

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women queue up in front of wada post office over rumors of ladli behan scheme mrj