-
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं अन् संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली.
-
मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःचा ठसा उमटवणारे हरहुन्नरी अशा नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे सगळ्याच कलाकारांना धक्काच बसला आहे.
-
चारवेळा राष्ट्रीय पुरस्कार, तीनवेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित केलेल्या नितीन देसाई यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
-
नितीन देसाई यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम सुरू केलं.
-
१९८७ साली आलेल्या गोविंद नेहलानी यांच्या ‘तमस’ आणि १९९० मधील दूरदर्शनच्या ‘चाणक्य’ या मालिकांसाठी नितीन देसाई यांनी सर्वप्रथम काम केलं.
-
इतकंच नव्हे तर भारताकडून ऑस्करसाठी पाठवल्या गेलेल्या ‘लगान’ आणि ‘सलाम बॉम्बे’ आणि ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटांसाठीही प्रोडक्शन डिझाईन म्हणून काम केलं.
-
याबरोबरच ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा मूळ सेटसुद्धा नितीन देसाई यांनीच तयार केला होता.
-
विधु विनोद चोप्रा यांच्या ‘परींदा’ आणि ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या दोन सुपरहीट चित्रपटांसाठीही नितीन देसाई यांनी काम केलं.
-
खासकरून ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’मधील कलादिग्दर्शनामुळे त्यांचं सर्वात जास्त कौतुक झालं अन् यामुळेच त्यांना खरी ओळख मिळाली.
-
या चित्रपटासाठी हिमाचल प्रदेशमधील दलहौसीसारखाच हुबेहूब सेट नितीन देसाई यांनी मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये उभारला.
-
हिमाचल प्रदेशचा सेटत्यावेळी मुंबईत तयार करणं अशक्य होतं. अशा परिस्थितीत नितीन देसाई यांनी मुंबईच्या फिल्म सिटीमधील एका तलावाजवळच सेट तयार केला.
-
हा सेट उभारण्यासाठी तेव्हा जवळपास ८० लाख रुपये खर्च झाले होते. त्यावेळी बऱ्याच लोकांनी विधु विनोद चोप्रा यांना नितीन देसाई यांना काम देण्याबद्दल सावध केलं होतं.
-
नितीन देसाई यांनी मात्र लोकांना गप्प केलं अन् ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ साठी पहिला उत्कृष्ट कलादिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला.
-
या चित्रपटादरम्यानच्या काही आठवणीही त्यांनी नुकत्याच सोशल मीडियायावर शेअर केल्या होत्या.
-
शिवाय रामोजी फिल्म सिटीइतकाच भव्य एन.डी स्टुडिओही त्यांनी कर्जतमध्ये उभारला होता. नितीन देसाई यांनी त्यांच्या याच स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. अद्याप यामागील नेमकं कारण समोर आलेलं नाही.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”