-
काश्मीर ते कन्याकुमारी आणि ईशान्येतील अरुणाचल ते पश्चिमेकडील गुजरातच्या कच्छपर्यंतचा प्रदेश पाहता भारताला हवामानाची शीतोष्ण उतरंड लाभलेली आहे. जैवविविधतेने व्याप्त आणि नटलेला हा सारा परिसर! पर्यावरण अभ्यासकांच्या मते १० लाखांवर विविधरंगी, औषधी गुणयुक्त वनस्पतींची संपदा भारतभूमीत आहे. पैकी जेमतेम साडेतीन लाखांवरच वृक्ष-फूल-फळांची ओळख सुस्पष्ट झाली आहे. उर्वरित वनस्पतींच्या नावांचा उलगडा बाकीच आहे. यातील अनेक वनस्पती कालौघात नामशेष झाल्या.
-
काही लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, त्या त्यांच्यातील बहुमोल उपयोगी गुणांचा लाभ उठवता-उठवता संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच! यातलीच एक प्रमुख आणि दुर्मिळातील दुर्मीळ झालेली वनस्पती आहे पिवळा, पांढरा व काळा पळस!
-
पिवळ्या-पांढऱ्या पळसाचे मूळ शोधत गेलो तर त्याचे संदर्भ रामायणातील संजीवनीसारखे वेदादी पौराणिक ग्रंथांमधून आढळतात. पिवळ्या पळसाचे फूल हे महादेवाला अत्यंत प्रिय, अशी श्रद्धावंतांची धारणा आहे.
-
शिशिर ऋतूच्या आगमनाची चाहूल लागताच पळसाची झाडे बहरू लागतात. याच दरम्यान, महाशिवरात्रही असल्याने बहरलेल्या पिवळ्या पळसाची फुले महादेवाच्या पिंडीवर अर्पण केली जात. त्यासंदर्भातील उल्लेख पौराणिक वेद आदी ग्रंथांमध्ये आढळतो. पळसावर काव्यही लिहिले गेले आहे. वेदांच्या काही ऋचाही पळसाचा संदर्भ देणाऱ्या आहेत.
-
पळसाच्या पाना-फुलांच्या वर्णनातून एखादी उपमाही दिली गेली आहे. ‘किंशुक’ या नावानेही काव्यातून पळसाचे रूपक मांडले आहे. ‘काय त्या झाडावर पोपट (शुक) बसला आहे?’ अशी पृच्छाच ‘किंशुक’ या शब्दातून केली आहे. शिशिरागमनाला उन्हाचा रखरखाट जाणवू लागताच रानोमाळी बहरू लागलेल्या पळसाकडे दुरून बघितले तर केशरी, पिवळी, पांढरी फुले त्यांच्या पाकळय़ांतील टोकदार वैशिष्ट्यांमुळे जणू पोपट बसल्यासारखी भासतात, असे ते रूपक किंशुकमधून मांडल्याचे दिसते.
-
परभणीतील चारठाणा येथील निवृत्त मुख्याध्यापक आणि वेद, संस्कृतचे अभ्यासक शिवाप्पा खके हे पिवळ्या पळसावरील सुभाषित अत्यंत लयीत म्हणून दाखवतात. त्यातले रूपक उलगडून दाखवतात.
-
ब्रह्मवृक्ष पलाशस्तवं श्रद्धां मेधां च देहि मे ।
वृक्षाधिपो नमस्तेस्तु त्वं चात्र सन्निधो भव ।।
या सुभाषितामध्ये पळसाचे माहात्म्य सांगताना त्याला ब्रह्मवृक्ष म्हणूनही संबोधले आहे. सुभाषितामध्ये पळसाचे नाव ‘पलाश’ म्हणून आले आहे. अर्थात हे संस्कृत नाम. पळसाला वृक्षातील राजाही म्हटले गेले आहे. त्याला श्रद्धा व मेधा- म्हणजे बुद्धी प्रदान करण्याचे आर्जव वरील सुभाषितामधून केले आहे. वेद, पुराणात पिवळ्या पळसाला त्रिपर्ण, पलाश, पलंकषा, पलंकषी, अशी नामाभिधाने आढळतात. -
इ.स. १८०० मध्ये भारतावर जेव्हा इंग्रजांचा अमल होता तेव्हा त्यांनी येथील जशी थंड हवेची ठिकाणे शोधली तशी त्या त्या ठिकाणच्या जैवविविधतेचाही अभ्यास केला. ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’ नावाचा एक वनस्पती-फुलांचा कोषच लिहिला. या ग्रंथांत अनेक दुर्मीळ वनस्पतींचा उल्लेख आढळतो. पिवळ्या पळसाला इंग्रजीत साजेसे ‘ब्युटिया मोनसपर्मा’ नाव आहे. हिंदीत पलश म्हटले आहे. धुळवडीला पारंपरिक रंग खेळण्याची परंपरा जपणाऱ्या बंजारा समाजात पळसाला केसुला म्हटले जाते.
-
पूर्वीच्या काळी धुळवडीला जे नैसर्गिक रंग खेळले जायचे त्यात केशरी, पिवळ्या, पांढऱ्या व काळ्या पळसाच्या फुलांचीच भुकटी असे. या फुलांच्या रंगांमध्ये उष्णता शामक घटक असल्याचे सांगितले जाते. या फुलांच्या भुकटीचे औषध म्हणून सेवनही केले जात असे.
-
अत्यंत औषधी गुणयुक्त, पिवळ्या-पांढऱ्या पळसाचे वर्णन जमिनीवरचे सोने म्हणून केले गेले आहे. अर्थात त्याला त्या वृक्षाचे बहुगुणी वैशिष्ट्यच कारणीभूत आहे. मात्र, पिवळ्या पळसाच्या मुळाशी सोने असल्याचा समज करून घेत त्यावर नाहक कुऱ्हाड चालवली गेली असावी आणि ही प्रजात लुप्त झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जाते. वस्तुत: पिवळ्या पळसात अनेक आजार दूर करणारे गुण आहेत. त्यामुळे त्याला सोने म्हणून संबोधले जात असे.
-
अलीकडे पर्यावरणाचा ऱ्हास हा जागतिक स्तरावरच चिंतेचा विषय झाला आहे. हवा, पाणी प्रदूषित होत आहे. दुर्मीळ आणि औषधीगुणयुक्त वनस्पती नामशेष होणे आणि निसर्गाचा समतोल राखण्यात हातभार लावणारी जैवविविधतेची साखळी तुटत जाणे हेदेखील त्यामागील एक कारण आहे.
-
हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी पावले उचलणे गरजेचे असल्याची जाणीव करून देणारे कोणीतरी मार्गदर्शक असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांचे मार्गदर्शन घेऊन दुर्मीळ वनस्पतींचे जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा धांडोळा घेणे क्रमप्राप्त आहे. याच उद्देशाने उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या पर्यावरण विभागाचे प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांचा एक वनस्पती उद्यान विकसित करण्यासाचा प्रयत्न करणे आहे. महाविद्यालयातील दुर्मीळ वनस्पतींचा ठेवा जतन करणे, त्यात आणखी भर घालून नामशेष होऊ पाहणाऱ्या वनस्पतींचे बीज संकलित करण्यासह रोप निर्मितीचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे.
-
प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी पिवळ्या पळसातील औषधी गुण हेरून त्याचे बीज मिळवून त्यापासून रोपे तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पिवळ्या पळसामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, मुतखडा, महिलांच्या मासिक पाळीची समस्या दूर करण्याची आणि बाळंतपणानंतर किंवा अति काबाडकष्टांमुळे शक्तिहीन झालेल्या स्नायूंना बळकट करण्याची क्षमता आहे. कामशक्तिवर्धक, तारुण्य वाढवणारे गुण त्यात आहेत. अतिसार, अंगदुखीसह कित्येक आजार आणि दुखण्यांमध्ये पळसाचे सर्व घटक उपयोगी ठरतात. पिवळ्या पळसाचा डिंकही अत्यंत गुणकारी मानला गेला आहे. त्याचे लाडू पूर्वी बाळंतपणानंतर महिलांचे स्नायू बळकट करण्यासाठी दिले जात. अशा जैवविविधतेतील बहुगुणी, नामशेष किंवा लुप्त होत जाणाऱ्या वनस्पतींचे जतन आणि संवर्धन करण्याचा प्रकल्प डॉ. पटवारी यांनी उदयगिरीत राबवला आहे.
-
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या एबीजी म्हणजे ‘असिस्टंट टू बोटॉनिकल गार्डन’ योजनेंतर्गत दुर्मीळ वनस्पती, बीजांचे जतन करण्याला प्रोत्साहन देणारा हा प्रकल्प आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय दिल्ली तर महाराष्ट्रात बोटॉनिकल सर्व्हे ऑफ इंडियाअंतर्गत असे प्रकल्प राबवण्यासाठी काही निधीही दिला जातो. वनस्पती उद्यान विकसित करणाऱ्या या योजनेसाठी महाराष्ट्रातून दोनच महाविद्यालयांची निवड झाली आहे. मराठवाड्यातून उदगीरचे महाराष्ट्र उदयगिरी हे एकमेव आहे. उदयगिरीत अनेक दुर्मीळ वनस्पतींचे जतन केले जात असल्याचे केंद्रस्तरावरून आलेल्या पथकाने पाहिले तेव्हा त्यात त्यांना कमतरता जाणवली ती पिवळय़ा पळसाची. दुर्मीळ झालेला का असेना पण पिवळा पळस मराठवाडय़ातच सापडेल, असे त्या पथकाने निदर्शनास आणून दिल्यानंतर पुन्हा नव्याने शोध सुरू झाला. महाशिवरात्रीनिमित्ताने महादेवाला प्रिय अशा पिवळय़ा पळसाच्या फुलांची चर्चा महिलांमध्ये सुरू झाली आणि पिवळा पळस उदगीरनजीकच्या जायभायचीवाडीत असल्याची वार्ता कानी आली. डॉ. पटवारी यांनी पिवळा पळस तग धरून असलेल्या शिवाराला भेट दिली आणि तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून वृक्षाचे जतन करण्याचे आवाहन केले. त्याच्या बियांचे आता संकलन सुरू झाले आहे.
-
मराठवाड्यात पिवळ्या, पांढऱ्यासोबतच काळा पळसही पूर्वी आढळायचा. जो आता दुर्मिळात दुर्मीळ झाला आहे. काळ्या पळसाला तिवस किंवा भुत्या पळसही म्हणतात. मराठवाड्यात बीडजवळील तागडगाव व उदगीरनजीकच्या जायभायाचीवाडी येथे पिवळ्या पळसाचे एखाद-दुसरे झाड आजही आढळते. केशरी-तांबडा, पिवळा, पांढरा अशा पळसाच्या विविध प्रजातींबाबत किंवा रंगांबाबत अभ्यासकांमध्ये मात्र काही मतमतांतरेही आढळतात. औरंगाबाद येथील वनस्पती अभ्यासक प्रा. मिलिंद गिरीधारी यांनी अभ्यासकांमधील मतमतांतरे मांडली. अनेक अभ्यासकांच्या मते माणसाच्या त्वचेचा रंग जसा अल्बिनो या पेशीतील दोषांमुळे बदलतो तसा काहीसा प्रकार केशरी, पिवळा व पांढऱ्या पळसातील रंगांबाबत आहे.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य