-
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने पाठिंबा दिल्यापासून देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. रिहानाच्या टि्वटनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग व पॉर्नस्टार मिया खलिफानेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना भारत सरकारवर टीका केली. त्यानंतर, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ट्विट करत ‘भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं’, अशा शब्दात आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटिंना फटकारलं. सचिनच्या या ट्विटनंतर जवळपास सर्वच भारतीय क्रिकेटपटूंनी ट्विटरद्वारे परदेशी सेलिब्रेटींना धारेवर धरलं. पण आता सचिनपासून कोहलीपर्यंत क्रिकेटपटुंनी केलेल्या या ट्विट्समागे बीसीसीआय आणि जय शाह यांचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. एकूणच यावरुन आता दोन गट पडल्याचं बघायला मिळत आहे…. पहिले बघुया ट्विटरद्वारे कोणी काय प्रतिक्रिया दिली ?
-
कॅरिबियन पॉप स्टार रिहानाने सर्वात आधी शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित एक बातमी शेअर केली. ही बातमी शेतकऱ्यांच्या निदर्शनाच्या जागेभोवती इंटरनेट बंद करण्याविषयी होती. रिहानाने ही बातमी शेअर केली आणि लिहिले की, "आपण याबद्दल का बोलत नाही? रिहानाने #FarmersProtest या हॅशटॅगसह हे ट्वीट केले."
-
त्यानंतर पॉर्न स्टार मिया खलिफानं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं. "मानवाधिकाराचं इथं उल्लंघन होत आहे. नवी दिल्लीच्या आसपासच्या परिसरात इंटरनेट बंद केलं आहे. दुसऱ्या ट्वीटमध्ये तिनं काही कलाकारांना टार्गेट करत म्हटलं आहे की, पेड अॅक्टर्स… मला खात्री आहे की, पुरस्कारांच्या मोसमात यांच्या नावाला डावललं जाणार नाही. मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे", असं तिनं म्हटलं.
-
रिहानाच्या ट्वीटनंतर पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही शेतकरी आंदोलनाविषयी ट्वीट केले. ग्रेटा यांनी ट्विटरवर लिहिले की, “आम्ही भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांसोबत एकतेने उभे आहोत." ग्रेटा थनबर्गला 2019 मध्ये अमेरिकन मॅगझिन टाईम्सने 'पर्सन ऑफ द इयर' म्हणून घोषित केले होते.
-
सचिन तेंडुलकर : भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक बनू शकतात, पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ते त्यांनीच ठरवावं. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले आहे. एक राष्ट्र म्हणून एकजूटीने राहण्याची गरज आहे.
-
विराट कोहली : या कठीण प्रसंगी आपण एकजूटीने राहण्याची गरज आहे. शेतकरी आपल्या देशाचा महत्त्वपूर्ण घटक असून या समस्येवर लवकरच तोडगा निघेल. तोपर्यंत आपण शांतता राखणे गरजेचे आहे.
-
अजिंक्य रहाणे : एकजूटीने कोणत्याही समस्येवर तोडगा निघतो. त्यामुळे एकजूटीने राहू आणि आपले अंतर्गत प्रश्न सोडवू.
-
रोहित शर्मा : जेव्हा आपण एकजुटीने उभे असतो तेव्हा देश कायमच मजबूत राहिला आहे. कठीण प्रसंगात समस्येचा तोडगा काढणे ही पहिली गरज आहे. भारताच्या विकासात शेतकऱ्यांची कायम महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. मला खात्री आहे आपण एकजुटीने नक्कीच या प्रश्नावर तोडगा काढू.
-
सुरेश रैना : देशात काही समस्या असतात. ज्या समस्यांची उत्तरे आज उद्या मिळू शकतात. परंतु याचा अर्थ असा होत नाही की बाहेरच्यांनी हस्तक्षेप करावा, अशा शब्दात रैनाने परदेशी सेलिब्रेटींना फटकारलं.
-
अनिल कुंबळे : जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून, भारत आपले अंतर्गत प्रश्न शांतपणे सोडवण्यास सक्षम आहे.
-
शिखर धवन : “एका निष्कर्षापर्यंत पोहोचणं सध्या आपल्यासाठी खूपच आवश्यक आहे. उद्याच्या भविष्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं.
-
हार्दिक पांड्या : एकजूटीने राहू…
-
गौतम गंभीर : बाहेरच्या शक्ती आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक दशकं त्यांनी आपल्यावर राज्य केलं. पण भारताने सगळ्यावर मात केली आणि पुढेही करेन. तुमची अब्जावधीची संपत्ती वापरा…सर्वश्रेष्ठ प्रयत्न करा तरी फरक पडणार नाही. कारण, हा नवीन भारत आहे.
-
तर, भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यावर टीका केली. जय शाह यांना टॅग करत "कृपया बीसीसीआयसोबत करारबद्ध असलेल्या क्रिकेटपटूंच्या अकाउंटवरुन ट्विट करु नका" असं श्रीनिवास यांनी म्हटलं आहे. तसंच, "अमित शाह यांना शेतकऱ्यांची लवकर भेट घ्यायला सांगा व काळा कायदा रद्द करायला सांगा" असंही श्रीनिवास बीवी यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
-
सचिन, कुंबळेपासून अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीपर्यंत शेतकरी आंदोलनावर क्रिकेटपटूंनी ट्विट्स कसेकाय केले असा सवाल करत यापाठीमागे बीसीसीआय असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी केला आहे. "प्रिय बीसीसीआय, कृपया आपल्या क्रिकेटपटूंना बळजबरीने शेतकरी आंदोलनावर ट्विट करायला लावू नका…हे खूप बालिश दिसतं", अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.
![US Illegal Immigrants deported](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Latest-Marathi-News-2025-02-06T085413.429.jpg?w=300&h=200&crop=1)
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा