-
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्ग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. यानंतर अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात सापडले आहेत.
-
याप्रकरणी वानखेडे यांनी मंगळवारी दिल्लीतील ‘एनसीबी’च्या मुख्यालयात उपमहासंचालकांसमोर आपली बाजू मांडली. मात्र, वानखेडे यांच्यावर झालेल्या कथित लाचखोरीच्या आरोपाची चौकशी करण्यात येणार आहे.
-
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर आणि त्यांच्या कुटुंबावर विविध आरोप केले आहेत.
-
या गंभीर आरोपांनंतर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला होता.
-
“आज काल बायका पण असं वागत नाहीत. हे किचनमधील पॉलिटिक्स, चोमडेपणा केल्यासारखं आहे. एक ट्विटरसारखं माध्यम आहे तर उद्या कोणीही उठून काहीही लिहील. आम्ही तुमचा सन्मान करतो. तर तुम्ही तसं वागा,” असा खोचक सल्ला क्रांतीने नबाव मलिक यांना दिला.
-
यानंतर आता क्रांतीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे.
-
“एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय, तुम्ही योग्य तो न्याय करा,” अशी विनंती क्रांतीने उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे केली आहे.
-
“माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे,” असे क्रांतीने पत्राच्या सुरुवातीला म्हटले आहे.
-
“छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करु नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करु नये हे त्या दोघांनी शिकवलं. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे. लढते आहे. सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत,” असे क्रांती रेडकर म्हणाली.
“मी एक कलाकार आहे. राजनीती मला कळत नाही आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही,” असेही क्रांतीने या पत्राद्वारे सांगितले. -
“आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लख्तर चार चौघात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करुन ठेवला आहे. विनोद करुन ठेवला आहे,” असेही तिने सांगितले.
-
“आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं,” असेही ती म्हणाली.
-
“एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खासगी हल्ले हे राजाकारणांच किती नीच स्वरुप आहे. हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे,” असे क्रांतीने सांगितले.
-
“आज ते नाही पण तुम्ही आहात. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो,” असेही तिने म्हटले.
-
“तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे…तुम्ही कधीच माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे,” असेही तिने या पत्रात म्हटले.
-
“एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय….तुम्ही योग्य तो न्याय करा,” अशी विनंतीही तिने उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
-
तसेच या पत्राच्या शेवटी क्रांतीने “आपली बहिण क्रांती रेडकर”, असा उल्लेख केला आहे.

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन