-
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची आत्मपरिक्षण बैठक रविवारी झाली.
-
या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सोमवारी गांधी कुटुंबाबद्दल महत्वाचं वक्तव्य केलं आहे.
-
गांधी कुटुंबाने काँग्रेसच्या नेतृत्वापासून बाजूला व्हावं आणि इतर एखाद्या व्यक्तीला संधी द्यावी असं रोकठोक मत सिब्बल यांनी व्यक्त केलंय.
-
पक्षाने आयोजित केलेल्या विचारमंथनाच्या कार्यक्रमासंदर्भातही सिब्बल यांनी थेट नाराजी व्यक्त केलीय.
-
पक्षाचं नेतृत्व हे फार संकुचित विचार करत असून त्यांना मागील आठ वर्षांमध्ये पक्षाची पडझड का होतेय याची कारण ठाऊक नसल्याचा टोला सिब्बल यांनी लगावलाय.
-
२०२० साली काँग्रेसमधील जी -२३ गटाने काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींकडे एका पत्राद्वारे पक्षाच्या कारभारासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या नेत्यांपैकी एक असणाऱ्या सिब्बल यांनी अनेकदा पक्षामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचं म्हटलंय.
-
गांधी कुटुंबाने काँग्रेसचं नेतृत्व सोडावं अशी मागणी करणारे सिब्बल हे पहिलेचे मोठे नेते आहेत.
-
“गांधींनी स्वेच्छेने बाजूला व्हावं कारण त्यांनी नियुक्त केलेलं मंडळातील लोक कधीच त्यांना तुम्ही नेतृत्व सोडा असं सांगणार नाही,” असं सिब्बल म्हणालेत.
-
‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिब्बल यांनी नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा पराभव झाल्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटलं नसल्याचं मत व्यक्त केलंय.
-
तसेच या पराभवानंतरही काँग्रेसमधील नेत्यांनी सोनिया गांधींकडेच नेतृत्व असावं यासंदर्भातील निर्णय घेतल्याचंही आपल्याला आश्चर्य वाटलेलं नाही असंही त्यांनी म्हटलंय.
-
काँग्रेसच्या कार्यकारी समितीबाहेरील बऱ्याच नेत्यांची मतं ही कार्यकारी समितीच्या मतांपेक्षा फार वेगळी आहेत, असं सूचक वक्तव्यही कपिल सिब्बल यांनी केलंय.
-
“कार्यकारी समितीच्याबाहेरही काँग्रेस पक्ष आहे. त्यांची मतंही ऐकून घ्यावीत. आमच्यासारखे अनेक नेते आहेत जे कार्यकारी समितीमध्ये नाहीत पण ते काँग्रेस पक्षात असून त्यांची मतं वेगळी आहेत. की आम्ही कार्यकारी समितीत नाही म्हणून आमच्या मतांचा फरक पडत नाही असं आहे का?”, असा थेट सवाल सिब्बल यांनी केलाय.
-
“काँग्रेस कार्यकारी समिती म्हणजेच संपूर्ण भारतामधील काँग्रेसचं प्रतिनिधित्व करते असं त्यांना वाटतं. मला नाही वाटत हे योग्य आहे,” असं सिब्बल यांनी स्पष्टच सांगितलंय.
-
“देशभरामध्ये काँग्रेसचे अनेक नेते आहेत. केरळ, आसाम, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरातमधील काँग्रेस नेत्यांची वेगळी मतं आहेत,” असं सिब्बल म्हणालेत.
-
“मी सर्वांच्यावतीने बोलू शकत नाही पण पूर्णपणे माझं वैयक्तिक मत मांडायचं झाल्यास किमान मला तरी ‘सब की काँग्रेस’ असा पक्ष हवाय तर काहींना ‘घर की काँग्रेस’ हवाय. अर्थात मला ‘घर की काँग्रेस’ नकोय,” असं सिब्बल यांनी स्पष्टपणे सांगितलंय.
-
“मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ‘सब की काँग्रेस’साठी झगडत राहील. या ‘सब की काँग्रेस’चा अर्थ केवळ एकत्र येणे हा नाहीय. तर ज्यांना देशामध्ये भाजपा नकोय अशा लोकांनी एकत्र येणे असा आहे.” असं सिब्बल म्हणालेत.
-
राहुल गांधींकडे अध्यक्षपद द्यावं अशी मागणी होत असल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता सिब्बल यांनी यावरही स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.
-
“काहींना वाटतं की काँग्रेस अमुक एका व्यक्तीशिवाय काहीच नाहीय. ही तीच लोक आहेत ज्यांना ‘सब की काँग्रेस’ ही ‘घर की काँग्रेस’शिवाय टिकू शकत नाही अशं वाटतं. हे एक आव्हान आहे. हे काही एखाद्या व्यक्तीविरोधातील धोरण नाहीय,” असं सिब्बल म्हणाले.
-
“आता राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत असं आम्ही मानतोय कारण त्या पदावर सोनिया गांधी आहेत,” अशी खोचक प्रतिक्रिया देत त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया असल्याची आठवण करुन दिलीय.
-
“राहुल गांधी पंजाबमध्ये गेले आणि त्यांनी चिन्नी हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. पण त्यांनी तो निर्णय कोणत्या अधिकाराने घेतला?,” असा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केलाय.
-
“ते (राहुल गांधी) पक्षाचे अध्यक्ष नाहीत तरी ते सर्व निर्णय घेतात. ते आधीच डी फॅक्टो अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते लोक पुन्हा राहुल यांना का नेतृत्व करायला सांगतायत?,” असंही सिब्बल यांनी म्हटलंय.
-
पक्ष नेतृत्वाने आता काय करायला हवं असं विचारलं असता आतापर्यंत पक्षाने आत्मपरिक्षण करायला हवं होतं असं मत सिब्बल यांनी व्यक्त केलंय.
-
“आतापर्यंत ‘चिंतन’ पूर्ण व्हायला हवं होतं आणि त्यांनी इतर कोणाकडे तरी नेतृत्व सोपवायला हवं होतं. इतर कोणाला तरी संधी द्या,” असं सिब्बल म्हणालेत.
-
“उदाहरण घ्यायचं झालं तर सुनिल गावस्कर एका दिवशी निवृत्त झाले. आता इथे आपण गावस्करबद्दल बोलत नाहीय. त्यानंतर सचिन आला आणि तो ही निवृत्त झाला. अगदी काल परवापर्यंत विराट कोहली भारताचा कर्णधार होता. क्रिकेट विश्वामध्ये या तिघांचीही नावं सुवर्ण अक्षरांनी लिहिली जातील. ते ही काळासोबत निर्णय घेत गेले. त्यामुळे अशा दिग्गजांनी एका वेळी आपल्याला बाजूला व्हावं लागेल हा विचार मनात ठेवत निर्णय घेतला तर पक्ष नेतृ्त्वालाही पायउतार होऊन इतर कोणाला तरी संधी द्यावी लागेल जो निवडून येईल आणि नियुक्त केलेला नसेल. त्या व्यक्तीला काम करण्याची संधी देण्यात यावी,” असं सिब्बल यांनी म्हटलंय.
-
गांधी कुटुंबाने काँग्रेसचं नेतृत्व सोडावं आणि इतर व्यक्तींना संधी द्यावी. हाच यासाठी योग्य वेळ आहे, असंही सिब्बल म्हणाले. (सर्व फाइल फोटो, सौजन्य : पीटीआय, एएनआय, द इंडियन एक्सप्रेस आणि सोशल मीडियावरुन साभार)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल