-
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पंजाब वगळता इतर चार राज्यांमध्ये मिळालेल्या विजयामुळे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून याचे परिणाम महाराष्ट्रातही दिसतील असा विश्वास व्यक्त करत आहेत. दरम्यान गोव्याच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईत स्वागत करत सेलिब्रेशन करण्यात आल्यानंतर आज ते नागपुरात दाखल झाले. यावेळी विमानतळावर फडणवीसांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी हजेरी लावत फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
गोव्याच्या निकालानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात येत असल्याने विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली होती. फडणवीस पोहोचताच विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर विमानतळापासून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरापर्यंत रोड शो काढण्यात आला. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
यानंतर नितीन गडकरींच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला. गोव्यात मिळालेल्या यशासाठी गडकरींनी फडणवीसांचं अभिनंदन करत तोंडभरुन कौतुक केलं. महत्वाचं म्हणजे पर्रीकरांच्या काळातही इतर पक्षांचं समर्थन घ्यावं लागत होतं असं ते मंचावरुन संबोधित करताना म्हणाले. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
फडणवीसांनीदेखील यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. ते म्हणाले की, “नागपूर शहरात आल्यानंतर जे भव्य स्वागत झालं त्याची मी कल्पनादेखील केली नव्हती. हे स्वागत मी स्वीकारलं ते प्रातिनिधिक स्वरुपातील असून हा विजय भाजपाचा आणि मोदींवरील विश्वासाचा आहे. कार्यकर्त्यांच्या मदतीने संधीचं सोनं करता आलं आणि हा विजय मिळाला”. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
“गडकरी प्रचारासाठी गोव्यात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांना गेल्यावेळी मी एकटा होतो, पण यावेळी देवेंद्र आणि मी असे दोघे आहोत. आम्ही दोघं मिळून सरकार स्थापन करु असं सांगितलं होतं. गोव्याच्या जनतेने प्रचंड आशीर्वाद दिले की कोणाची गरज पडलीच नाही,” असं फडणवीस म्हणाले. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
“गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड किंवा मणिपूर असो येथे भाजपाला मिळालेलं यश हे विकासाचं यश आहे. मोदींवरील विश्वासाला लोकांनी मत दिलं आहे. युक्रेनमध्ये जेव्हा भारतीय अडकले तेव्हा २० हजार लोकांना बाहेर काढण्याचा विक्रम सरकारने केला. या देशात विश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे,” असं फडणवीसांनी सांगितलं. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
“आमचे अनेक विरोधक देव पाण्यात घालून बसले होते. त्यांचं स्वप्न स्वप्नच राहिलं. काँग्रेm आणि इतर पक्ष जनतेपासून दूर गेले आहेत. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीने युती केली तेव्हा मी गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीची लढाई नोटाशी असल्याचं सांगितलं होतं. त्याचं नशीब बघा दोन पक्ष मिळून नोटापेक्षा कमी मतं मिळाली. एकाचंही डिपॉझिट राहिलं नाही,” अशी टीका यावेळी फडणवीसांनी केली.
-
“महाराष्ट्रातही परिवर्तनाची लाट आहे. भ्रष्टाचाराविरोधात भाजपाच्या लढ्यात सामान्य माणूस सोबत आहे. ही महाविकास आघाडी नसून महावसुली आघाडी आहे. यांचे दोन मंत्री जेलमध्ये आहेत. आता लढाई एका शिगेला पाहोचली आहे. आमच्या नेत्यांविरोधात खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. आमच्याविरोधात कितीही केसेस केल्या तरी भ्रष्टाचाराविरोधात बोलायचं थांबणार नाही. तुमचा चेहरा लोकांसमोर आणणार,” असा इशारा फडणवीसांनी यावेळी दिला.
-
“महाराष्ट्रात येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि विधानसभा निवढणुकीत भाजपा एकहाती सत्ता आणल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला.
-
गडकरींनीही यावेळी भाषण केलं. “पाच राज्यांमध्ये झालेल्या या महत्वाच्या निवडणुका होत्या. या निवडणुकांमध्ये भाजपाला नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष नड्डा यांच्या नेतृत्वात अभुतपूर्व यश मिळालं असून पक्षाचा आत्मविश्वास वाढवणारं आहे,” असं गडकरी म्हणाले. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “अनेकजण पाच राज्यांमध्ये निवडणुका कठीण असल्याचं बोलत होते. खासकरुन गोव्याच्या बाबतीतही बोललं जात होतं. मी १९९५ पासून तिथे काम करत आहे. अनुकूल स्थितीत असतानाही आपल्याला इतक्या जागा मिळाल्या नाहीत. पर्रीकर असतानाही आम्हाला इतराचं समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. पण यावेळी गोव्याच्या जनतेने भाजपाला पूर्ण बहुमत दिलं. प्रभारी म्हणून फडणवीसांकडे नेतृत्व होतं. फडणवीस आणि प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात गोव्यात अभुतपूर्व यश मिळालं असून यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो”.
-
यावेळी गडकरींना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर निशाणा साधत म्हटलं की, “गोव्यात अनेक पक्ष उतरले होते. भाजपाला अपशकून देण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कंबर कसली होती. रोज वर्तमानपत्रात मुलाखत देऊन भाजपाचा पराभव कसा करता येईल यासाठी प्रयत्न करत होते. पण गोव्याच्या जनेतेमध्ये त्यांचं काय स्थान आहे हे समोर आलं. यानिमित्ताने हीदेखील एक चांगली गोष्ट घडली”.
-
“महाराष्ट्रातही आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही”
“गोव्यात महाराष्ट्रातील कार्यकर्ते भेटले. फडणवीसांच्या नेतृत्वात काम केलेल्या या सर्वांचं मी अभिनंदन करतो. हा विजय आता थांबवणार नाही. ही विजयाची पताका एक दिवस महाराष्ट्रातही आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे,” असं गडकरी यावेळी म्हणाले. -
“नागपुरातही भाजपाला मोठं यश मिळवून द्या”
“नागपूर शहरात आपली परीक्षा होणार आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना बावनकुळे पालकमंत्री होते. त्यांनी शहरासाठी खूप काम केलं. मागील वेळी पालिकेत जे यश मिळालं त्यापेक्षा मोठं यश भाजपाला मिळवून देऊ असा संकल्प करुयात,” असं आवाहन गडकरींनी यावेळी केलं. -
“जात पंत, धर्म, भाषा, पक्ष यापलीकडे जाऊन आपल्या भविष्यासाठी भाजपावर विश्वास”
“उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात अभुतपूर्व यश मिळालं. जात पंत, धर्म, भाषा, पक्ष यापलीकडे जाऊन आपल्या भविष्यसाठी भाजपावर विश्वास दाखवला हेच या निवडणुकीतं वैशिष्ट्य आहे. मोदींच्या नेतृत्वात मोदी सरकारने मणिपूमध्ये केलेल्या कामावर जनतेने शिक्कामोर्तब केलं. आम्ही नक्कीच विकासासाठी भाजपासोबत राहू असं जनतेने सांगितलं आहे. जात पंत, धर्म भाषा यापेक्षा लोक आपलं भविष्य आणि विकासासाठी मत देतात हे स्पष्ट केलं आहे,” असं गडकरींनी सांगितलं. आपण जातीयवादाचं राजकारण नष्ट केलं आहे असंही ते म्हणाले. -
“हिंदुस्थानच्या राजकारणाला नवी दिशा”
“कार्यकर्ता हा जातीने, धर्माने नव्हे तर कार्याने, कतृत्वाने आणि गुणाने श्रेष्ठ असल्याच्या संकल्पनेवर आपला विश्वास आहे. विकासाच्या मुद्द्यावर काम केलं पाहिजे. आपला देश सुपर इकॉनॉमिक पॉवर कशी होईल हे मोदींचं स्वप्न असून त्यासाठीच आपण प्रयत्न करत आहोत. यावेळी कोणताही जातीयवाद, पक्षीय भेद न आणता सबका साथ, सबका विश्वास आपण मांडला आहे. यामधून हिंदुस्थानच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे,” असं गडकरींनी यावेळी सांगितलं. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)

Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?