-
राज्यात गेली दोन वर्षे लागू असलेले सर्व करोना निर्बंध मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. मुखपट्टीच्या सक्तीतून नागरिकांची सुटका झाली असून, यापुढे तिचा वापर ऐच्छिक असेल. हा निर्णय गुढीपाडव्यापासून लागू होईल़.
-
करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून मुखपट्टीसह विविध निर्बंध लागू होते. राज्य निर्बंधमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केली. या निर्बंधातून राज्यातील जनतेची शनिवारी गुढीपाडव्यापासून सुटका होईल.
-
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोना निर्बंधासंदर्भातील आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध राहणार नाहीत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
-
राज्यात करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने १४ मार्च २०२० पासून निर्बंध लागू केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाउन लागू केला. गेली दोन वर्षे करोनास्थितीनुसार लागू करण्यात येणाऱ्या निर्बंधाचा अर्थव्यवस्था आणि जनजीवनावर मोठा परिणाम झाला होता.
-
करोना साथ नियंत्रणात आल्यानंतरही लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी सरकारने उपनगरीय लोकलमध्ये प्रवासासाठी लसीकरण बंधनकारक केले होते. तसेच अधिक प्रमाणात लसीकरण झालेल्या मुंबईसह १४ जिल्ह्यांतील निर्बंध उठविण्यात आले होते. निर्बंध शिथिल करताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग, लसीकरण बंधनकारक करण्यात आले होते. तसेच राजकीय सभा, मैदाने, सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आली होती.
-
केंद्र सरकारने गेल्याच आठवडय़ात राज्यांना निर्बंध मागे घेण्याची सूचना केली होती. त्यानुसारच राज्य सरकारने करोना निर्बंध मागे घेतले आहेत. आता नागरिकांना मास्कशिवाय कुठेही फिरता येऊ शकेल.
-
मास्कची सक्ती रद्द करू नये, असे मंत्रिमंडळातील काही जणांचे मत होते. मात्र, साथरोग नियंत्रण कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन हे कायदे मागे घेतल्याने मास्कसक्ती करता येणार नाही, याकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे मास्क ऐच्छिक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
-
रेल्वे, बस अशा सार्वजनिक प्रवासासाठीही आता लसीकरण प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पासची गरज लागणार नाही.
-
दोन वर्षांनंतर प्रथमच कोणताही सण निर्बंधाशिवाय साजरा करता येणार आहे. गुढीपाडव्यापासून राज्य निर्बंधमुक्त होत असल्याने या नववर्षदिनी काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रांवर कोणतीही बंधने नसतील.
-
मैदानंही पूर्णपणे खुली करण्यात आली आहेत
-
हॉटेलमध्येही ग्राहकांची मर्यादा नसणार आहे.
-
चित्रपटगृह आता पुन्हा एकदा हाऊसफुल्ल होऊ शकतात. तेथील मर्यादा आणि लससक्तीही हटवण्यात आली आहे.
-
जीमदेखील आता पूर्ण क्षमेतेने सुरु करण्यास परवानगी आहे
-
सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळ्यात उपस्थितांच्या संख्येवर आता मर्यादा नाही
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही धुमधडाक्यात साजरी करता येणार आहे. जयंतीदिनी १४ एप्रिलला राज्यात ठिकठिकाणी मिरवणुका निघतात. मिरवणुकांवर निर्बंध नसतील.
-
तसेच मुस्लीम बांधवांना दोन वर्षांनंतर रमजान उत्साहात साजरा करता येईल.
-
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व नागरिकांनी करोनाशी लढताना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वाचे आभार मानले.
-
या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथांच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभात उत्साहाला मुरड घातली. पोलीस यंत्रणा, महापालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने करोनाशी दिवस-रात्र लढा दिला, याचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांचे आभार मानले.
-
खबरदारी आवश्यक
निर्बंध मागे घेण्यात येत असले तरी भविष्यात करोनाचा धोका उद्भवू नये, यासाठी खबरदारी घ्यायला हवी त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, करोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी आपली आणि इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल़े -
(All – File Photos)

Crime News : पुण्यात चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना पोलिसांनी केली अटक