-
एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नसल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर हेच सरकार आलं असतं याचा पुनरुच्चार केला. तसंच आता पाचही वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री नसेल असा टोला लगावला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी आरे कारशेडचा मुद्दाही उपस्थित केला. जाणून घ्या त्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाची १६ विधानं…
-
“ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन केलं आणि ज्यांनी हे सरकार स्थापन केलं त्यांच्या मते तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. मग हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो. माझ्यात आणि अमित शाह यांच्यात शिवसेना-भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ वाटून घेण्याचं ठरलं होतं. तसं झालं असतं तर आज अडीच वर्ष झाली आहेत. जे काही घडलं ते सन्मामाने झालं असतं. या जोडगोळीने अशाच पद्धतीने अडीच वर्ष पूर्ण केलं असतं. मग त्यावेळी नकार देऊन आता भाजपाने असं का केलं?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.
-
पुढे ते म्हणाले की, “शिवसेना तुमच्यासोबत अधिकृतपणे सोबत होती. लोकसभा, विधानसभेत आम्ही एकत्र होतो. निवडणुकीच्या आधी हेच ठरलं होतं. मग मला कशाला मधे मुख्यमंत्री होण्यास भाग पाडलं. तसं घडलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता”.
-
“जे आता भाजपासोबत जाऊ इच्छित आहेत किंवा गेलेत त्यांनी हा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी शब्द मोडला आणि अशा पद्धतीने पाठीवर वार करुन पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणत आहेत. तर तसा हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही,” असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
-
“अमित शाह यांनी मातोश्रीवर दिलेला शब्द पाळला असता तर हे सरकार शानदारपणे आलं असतं. अडीच वर्ष झाली आहेत. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचा किंवा भाजपाचा मुख्यमंत्री झाला असता,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
-
“मी तर तेव्हाही सांगितलं होतं की, पहिला शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर एक पत्र तयार करुन त्यावर मुख्यमंत्र्याची सही, पक्षप्रमुख म्हणून माझी सही आणि आज शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असून आमच्यात ठरलेल्या कराराप्रमाणे या दिवशी पायउतार होईल असा मजकूर लिहिला असता. हे पत्र मंत्रालयाच्या दाराशी होर्डिंग करुन लावा म्हणजे हा करार कोणापासून लपून राहिला नसता असंही सांगितलं होतं,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
-
“माझ्याशी अशा पद्धतीने वागले याचं दु:ख झालं आहे. माझ्या पाठीत सुरा खुपसला. मला दिलेला शब्द पाळला असता तर निदान अडीच वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री झाला असता. आता पाचही वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री नसणार आहे. यात भाजपाला आणि त्यांच्या मतदाराला काय आनंद आहे माहिती नाही,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
“अशा विचित्र पद्धतीने शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला उतरवून स्वत: मुख्यमंत्री होण्याचा जो अट्टहास केला आहे हा आवडला की नाही हे जनतेने ठरवायचं आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही,” असंही ते म्हणाले.
-
लोकशाहीच्या चारही स्तभांनी लोकशाही वाचवण्यासाठी पुढे आलं पाहिजे. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडत चालला आहे. लोकशाही कोसळली तर या स्तभांना काही अर्थ नाही अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
-
“आपल्याकडे गुप्त मतदानाची पद्दत आहे. पण ज्याने मतदान केलं आहे त्यालाच आपला प्रतिनिधी गुप्त पद्धतीने कुठे फिरत आहे याची माहिती नाही. मतदाराला आपण मत देऊन निवडून आणलेल्या प्रतिनिधीला पुन्हा मागे बोलवण्याचा अधिकार हवा,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.
-
“माहिमच्या मतदाराने टाकलेलं मत सूरत, गुवाहाटी, गोवा असं फिरायला लागलं आणि मतदारालाच जर ते मत कुठून कुठे फिरतंय कळालं नाही तर देशात लोकशाही कुठे आहे?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.
-
“स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली, पण लोकशाहीचे धिंडवडे उडत आहेत ते थांबवायला हवं. मतदारांच्या मताचा बाजार मांडला जात असेल तर ते घातक आहे. लोकशाहीचे धिंडवडे थांबवण्याची गरज आहे. ज्याने मत दिले त्याचा बाजार असा मांडला गेला तर ते चुकीचे आहे. मतदाराचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल,” अशी भीती उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
-
आरेच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी रात्रीस खेळ चाले हे त्यांचं ब्रीदवाक्य झाल्याचा टोला लगावला.
-
“आज तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल. मला दु:ख झालंय ते म्हणजे माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा निर्णय त्यांनी बदलला त्याने मला दुख झालं आहे. रात्रीस खेळ चाले, हे त्यांचं आता ब्रीदवाक्य आहे. एका रात्रीत आरेमध्ये झाडांची कत्तल झाली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्याला कांजूरमार्गचा पर्याय सुचवला. कामावर स्थगिती दिली. मी पर्यावरणवाद्यांच्या सोबत आहे. संभ्रम निर्माण होतो, तेव्हा ती गोष्ट टाळलेली बरी असं माझं मत आहे”, असं ते म्हणाले.
-
“माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. कांजूरमार्गचा जो प्रस्ताव आम्ही दिला, त्यात कुठेही अहंकार नाही. मुंबईकरांच्या वतीने माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की आरेचा आग्रह रेटू नका. जेणेकरून पर्यावरणाची हानी होईल. आत्ता तर तिथे झाडं तोडून झाली आहेत. पण मधल्या काळात तिथे बिबट्या फिरतानाचा फोटो समोर आला होता. म्हणजे तिथे वन्यजीव आहेत. मला धोका हा वाटतो की आत्ता तुम्ही आरेचा भाग घेतल्यानंतर तिथे रहदारी सुरू झाल्यावर आजूबाजूच्या पर्यावरणातलं वन्यजीवन धोक्यात येईल. असं करता करता मग आता तिकडे काहीच नाही म्हणत अजून पुढे जाल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
“आम्ही मुंबईतलं जवळपास ८०० एकरचं जंगल राखीव करून टाकलं आहे. कांजूरमार्गची जमीन महाराष्ट्राची आहे. ती महाराष्ट्राच्या, मुंबईच्या हितासाठी वापरा. आरेचा मर्यादित वापर होणार होता. कांजूरला कारशेड गेल्यानंतर ती मेट्रो बदलापूर-अंबरनाथपर्यंत जाऊ शकेल”, असं ते म्हणाले.
-
“गेल्या ८-१० दिवसात मला अनेकांचे मेसेज आहे. सोशल मीडियावरुन अनेकांच्या भावना कळाल्या. त्याबद्दल मी ऋणी आहे. एखाद्याने पद सोडल्यावर लोक रडतात असं क्वचित होतं. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रूंशी कधी गद्दारी, हरामखोरपणा करणार नाही,” असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलं.
-
(Photos: Video Screengrab)

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’