-
सलग आठ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वर्धा जिल्ह्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळले आहे.
-
ग्रामीण भागाची चांगलीच दैना उडाली असून सर्वच तालुक्यात अतिवृष्टी होत असल्याने शंभरावर खेड्यांचा संपर्क तुटला आहे.
-
अनेक गावांत घरांची पडझड तसेच काही गावांतील नागरिकांना पुरामुळे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
-
संततधारेचा आजचा सलग सातवा दिवस होता, त्यामुळे एकप्रकारे अस्मानी संकटाचाच सामाना वर्धा जिल्ह्याला करावा लागत आहे.
-
हिंगणघाट महसूल मंडळात रविवारी रात्री २११ मि.मी. अशी विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली.
-
महकाली नगरात पाणी शिरल्याने वीस कुटुंबास सुरक्षितस्थळी हलविणे सुरू आहे.
-
सेलूत बाभुलगाव पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प पडली तसेच अनेक घरे पाण्याखाली आली.
-
समुद्रपूर तालुक्यात बारा तासांपासून वृष्टी सुरू असल्याने जाम ते समुद्रपूर, वडगाव ते पिंपळगाव, साखरा ते मंगरूळ, कोरा ते नंदोरी, समुद्रपूर ते वायगाव, सेवाग्राम ते समुद्रपूर मार्ग बंद पडले.
-
वीसपेक्षा अधिक गावे पाण्याने वेढलेली असल्याचे प्रशासनाने सांगितले.
-
आर्वीत वर्धमनेरी पुलावरून पाणी वाहू लागल्याने सुरक्षेसाठी दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे, तसेच शिरपूर रस्ता बंद पडला आहे.
-
पोथरा नदीच्या पुराने सावंगी, पिंपळगाव व अन्य सात गावांचा संपर्क तुटला आहे.
-
पवनार येथील जुन्या पुलावरून आज सकाळी पाणी वाहने सुरू झाले.
-
सेलू तालुक्यात चाणकी ते कोपरा पुलावरून पाणी वाहू लागले तसेच महामार्गाच्या कामामुळे हमदापूर येथील घरात पाणी शिरले.
-
तर, बोर नदीला पूर आल्याने गावात पाणी शिरत असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे ते म्हणाले.
-
सिंदी, दिग्रस,पाळसगाव, दहेगाव, पहेलांपुर गावांचा संपर्क तुटला आहे.
-
देवळीत सोनोरा ढोक गावात पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांना अन्यत्र हलविण्यात येत आहे तसेच भदाडी नदीला पूर आल्याने तातडीने मदत पाठविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
-
लाल नालाच्या पाच तसेच निम्न वर्धा प्रकल्पाच्या सर्व एकतीस दारातून आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू झाला.
-
पुढील काही काळ धोक्याचा असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे म्हणाल्या.
-
अतिवृष्टीचे संकट लक्षात घेऊन जिल्ह्यातील शाळांना सुटी देण्याची मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
-
शासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षक, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
-
चिंचोली नाल्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प पडल्याचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.
-
वाड्या, वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना घर सोडून अन्य सुरक्षितस्थळ गाठावे लागत आहे.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख