-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत शिवनेरी किल्ल्यावर आपल्याला एक रोमांचकारी अनुभव सांगितला. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असणाऱ्या सुबोध भावेने राज ठाकरेंची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी अंगावर काटा आणणारा हा अनुभव सांगितला.
-
“१९९४ सालची ही गोष्ट आहे. मी माझ्या कार्यालयात बसलो होतो. डायरीत शिवजयंतीचे कार्यक्रम लिहिले होते. ‘सामना’चे बाजीराव दांगट आणि त्यांचे भाऊ माझ्याकडे आले. बाळासाहेब फार वर्षांपूर्वी शिवनेरीला आले होते, त्यानंतर ठाकरे घराण्यातील कोणी आलेलं नाही, तर तुम्ही या असा आग्रह त्यांनी केला. मी त्यांना व्यग्र असल्याचं सांगत डायरी दाखवत होतो. माझे सगळे कार्यक्रम आखले असल्याने शक्य नाही असं मी त्यांनी सांगत होतो,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.
-
“रात्री मी घरी आल्यानंतर काय झालं माहिती नाही. मी दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यालयात आलो, सर्व कार्यक्रम रद्द केले आणि तिथे शिवनेरी असं लिहिलं,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.
-
“शिवजयंतीच्या आदल्या दिवशी मी जुन्नरला गेलो. सकाळी ४ वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली,” अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.
-
“तेथील खोलीत गेल्यानंतर भिंतीवर कोणीतरी हळद आणि कुंकू टाकलं होतं, त्याकडे पाहत होतो. तितक्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि “इथेच शिवाजी महाराजांचा जन्म झाला” असं सांगितलं. मी मागे वळून पाहिलं असता कुणीच नव्हतं,” अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली.
-
“मी काही वेळ एकाच जागी स्तब्ध झालो. यानंतर मी किल्ल्यावरुन खाली आलो. डोक्यावर पाण्याच्या बाटल्या ओतल्या आणि शांत बसून राहिलो. त्यानंतर मी गड उतरण्यास सुरुवात केली,” असं त्यांनी सांगितलं.
-
“त्या घटनेनंतर मी तीन ते चार वेळ शिवनेरीला गेलो, पण पुन्हा असं झालं नाही,” असा प्रसंग राज ठाकरेंनी सांगितला.
-
मी ते कार्यक्रम का रद्द गेले, शिवनेरीला का गेलो? ते कसं झालं हे मला काही माहिती नाही असंही त्यांनी सांगितलं.
-
(Photos: Video Screengrab)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…