-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
-
जयंत पाटील म्हणाले, “सरकारच्या चहापानाबाबत विरोधीपक्षनेते यांच्याबरोबर बैठक सुरु होती. तेव्हा अचानक सुप्रिया सुळे यांचा फोन आला आणि शरद पवारांनी बोलावलं आहे, असं सांगितलं. तेव्हा यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.”
-
“सर्वांनी झालेल्या घटनेबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. यातून मार्ग काढण्याची विनंती केली आहे. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
-
सहानभुती निर्माण करण्यासाठी ही भेट होती का? या प्रश्नावर जयंत पाटील यांनी सांगितलं की, “अचानकपणे ते येऊन भेटले आहेत. कोणाचा काय उद्देश होता, यावर आज सांगणं अवघड आहे. पण, सर्वांनी दिलगीरी आणि खंत व्यक्त केली आहे. तसेच, सर्वांनी एकत्र यावं, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आमची फारशी चर्चांही झाली नाही.”
-
विरोधी पक्षनेते पदाबाबत काँग्रेस, शिवसेना आणि आमची चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी असेल, तर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाईल. अधिवेशन चालू झाल्यावर विरोधी पक्षनेते पदावर निर्णय होईल, अशी माहिती राष्ट्रवादी जयंत पाटील यांनी दिली.
